रक्षाबंधन अखेरचं ठरलं! भरधाव ट्रकने दुचाकीला उडवलं; बहीण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर | प्रतिनिधी
रक्षाबंधनाचा सण आटोपून कामानिमित्त बाहेर निघालेल्या बहीण-भावावर काळाने घाला घातला. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांच्यासोबत असलेली आई आणि चिमुकला पुतण्या गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी साडे दोनच्या सुमारास घडली.
आजारी मावस बहिणीला भेटण्यासाठी निघाले होते
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणी घोबाळे यांची मावस बहीण नंदिनी भोसले आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी रेणापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी प्रतीक क्षीरसागर, त्यांची बहीण कल्याणी घोबाळे, आई आणि चिमुकला पुतण्या असे चौघे दुचाकीवरून लातूरहून रेणापूरकडे निघाले होते.
रक्षाबंधनाचा सण नुकताच आटोपला होता. कुटुंबीयांसोबत सण साजरा केल्यानंतर आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी निघालेल्या या कुटुंबावर काही अंतरावरच नियतीने घाला घातला.
रुग्णालयाजवळच भीषण अपघात
दुचाकी रेणापूर ग्रामीण रुग्णालयाच्या काही अंतरावर पोहोचली असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, प्रतीक क्षीरसागर आणि कल्याणी घोबाळे यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रकने दोघांना जवळपास शंभर फूट अंतरापर्यंत फरफटत नेल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
आई आणि चिमुकला पुतण्या गंभीर जखमी
या अपघातात माया क्षीरसागर आणि चिमुकला साई क्षीरसागर गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नागरिकांनी आणि स्थानिकांनी तातडीने मदत करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रक्षाबंधनासाठी माहेरी आल्या होत्या कल्याणी
मृत कल्याणी घोबाळे या काही दिवसांपूर्वी मुंबईहून माहेरी आल्या होत्या. रक्षाबंधनाचा सण साजरा केल्यानंतर आजारी असलेल्या मावस बहिणीला भेटून त्या पुन्हा मुंबईला जाणार होत्या. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. रेणापूरकडे जात असताना झालेल्या भीषण अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
रक्षाबंधनाच्या आनंदानंतर अवघ्या काही तासांतच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, ट्रकचा वेग किती होता आणि चालकाच्या निष्काळजीपणाची भूमिका होती का, याबाबत तपास केला जात आहे.
रक्षाबंधनाचा सण आनंदात साजरा करून आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी निघालेल्या बहीण-भावाचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने रेणापूर परिसरात शोककळा पसरली आहे.

error: Don't Try To Copy !!