नि.पं.पाटील विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा
पळासखेडे मिराचे दि १७ जुलै २०२५(प्रतिनिधी ) नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे शाळेत मातृहृदयी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पवार हे होते. सर्वप्रथम कै.आचार्य बापूसो. गजाननराव गरुड व कै. अण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष , संस्था संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक जे.आर.पाटील यांनी कै. आचार्य बापूंना अभिप्रेत असलेला विद्यार्थी याबद्दल मत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षक एस. जे. सोनवणे यांनी मनोगतात संस्थेची स्थापना व व्याप्ती याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी अध्यक्ष भाषणात कै.आचार्य गजाननराव बापूंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक व सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील,चंद्रशेखर काळे,अब्दुल नबी तांबोळी,डी. पी .पाटील, संजू पवार,.शालिक पाटील,अशोक माळी,बळीराम माळी,लता पाटील हे मान्यवर उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्षाली प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक – हितेश वर्जन चव्हाण तृतीय क्रमाक – ओम संतोष चौधरी यांनी मिळविला. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 50 शालेय गणवेश वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने ,सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जी.पी. पाटील यांनी केले तर आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले.
वाकडी येथे बसस्थानक परिसरासह अवैध धंदे दारुचा व सट्टाचा महापूर
वाकडी.ता.जामनेर.दि.२१ /०८/२६ वाकडी बसस्थानक सह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारुचा महापूर सुरू असून यात अनेकांचे संसार उद्धवस्त झाले,बसस्थानक परिसरात खुले आम अवैधधंदे बोकाळाले असतांनाही याबाबत काही दिवस दारु बंद झाली होती परंतु विक्रेत्यांवर पोलीसांकडून कुठलेही कार्यवाही होत नसल्याने गावातील नागरिक ञस्त झाले आहे, महिला वर्ग शालेय विध्यार्थी हैराण झाले आहे गावात गेल्या अनेक दिवसांपासून गावांच्या चारही बाजूंनी अवैध दारुची खुलेआम विक्री होत असून यात अनेक जवान तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहे , मुली-बाळीचे संसार उद्धवस्त होत आहे, बराच मुली विधवा झाल्या आहेत, त्याचे संसार उघड्यावर पडले आहे नवीन निवडुन आलेल्या सरपंच व सभासदांना च्या वतीने गावातील दारू बंद व्हावी यासाठी पहूर पोलिस ठाणे येथे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लेखी ठराव दिला, काही वेळा पुरती वाकडी येथील दारुवाल्याचे धाबे दणाणले होते, परंतु पुन्हा देशी दारूचा महापूर बसस्थानक परिसरात चालू आहे,त्याच्यावर कोण्याच्याही लगाम नाही, किंवा दचक नाही, बसस्थानक परिसरात देशी, इंग्लिश,गावठी, दारूचा महापूर चालू आहे, दारू विक्रेत्यांवर पोलीसांच्या वचक दिसून येत नाही असे गावकरी मधून चर्चा करताना दिसत आहेत ,अवैध दारू विक्रेत्यांनी धुमाकूळ घातला आहे त्यावर वरिष्ठ स्तरांवर जाऊन कार्यवाही व्हावी अशी मागणी गावकरी करीत आहेत.
गरिबीला हरवत यशाचे शिखर गाठले! रिक्षाचालकाच्या कन्या ममता नाईक यांची महाराष्ट्रभर कर्तृत्वाची गगनभरारी
मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सत्कार जळगाव | प्रतिनिधी : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर आयुष्यातील प्रत्येक अडथळ्यावर मात करता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे जामनेर तालुक्यातील खडकी गावातील रिक्षाचालक रंगलाल फत्रू नाईक यांच्या कन्या ममता रंगलाल नाईक. अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे येत त्यांनी क्रीडा, शिक्षण आणि समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून अल्पवयातच राज्यभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ममता नाईक या स्पोर्ट्स टीचर, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या, बेस्ट स्पोर्ट्स टीचर तसेच सेल्फ डिफेन्स कोच म्हणून कार्यरत आहेत. कराटे, सेल्फ डिफेन्स, योग आणि विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण देत त्या शेकडो विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि देशप्रेमाची भावना रुजवत आहेत. विशेष म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना त्या निःशुल्क प्रशिक्षण व मार्गदर्शन देत असून, ग्रामीण भागातील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देऊन त्यांना सक्षम बनविण्याचे कार्य सातत्याने करत आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत २३ जुलै २०२६ रोजी पुणे येथे आनंदी फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपट अभिनेत्री पूजा वाघ यांच्या हस्ते त्यांना “महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२६” प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, विद्यार्थ्यांसाठीचे समर्पण आणि सामाजिक बांधिलकीची पोचपावती मानला जात आहे. याच वर्षात त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करत ज्ञानदीप सामाजिक संस्थेतर्फे “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६” तसेच “अटल बिहारी वाजपेयी सेवा रत्न सन्मान २०२६” देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. अवघ्या एका वर्षात तीन प्रतिष्ठित राज्यस्तरीय पुरस्कार मिळविण्याची ही उल्लेखनीय कामगिरी त्यांच्या अथक परिश्रमांची आणि समर्पणाची साक्ष देणारी ठरली आहे. “माझ्या यशामागे माझ्या आई-वडिलांचे कष्ट, गुरूंचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचे प्रेम आहे. प्रत्येक मुलगी आत्मविश्वासाने उभी राहावी, प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला क्रीडा शिक्षणाची संधी मिळावी आणि आपल्या गावातील युवकांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करावीत, हेच माझे ध्येय आहे,” असे ममता नाईक यांनी सांगितले. रिक्षाचालकाच्या कन्येने मिळवलेले हे यश केवळ त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित नसून खडकी गाव, जामनेर तालुका, जळगाव जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळे अनेक ग्रामीण भागातील मुली, युवक आणि विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळत असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. “जिद्द असेल तर परिस्थिती कधीच आडवी येत नाही,” हे ममता नाईक यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे. जामनेर येथे एका कार्यक्रमा निमित्ताने ममता हजार असताना ,मंत्री गिरीश महाजन यांना मताच्या राज्यस्तरीय पुरस्काराची माहिती कळताच,मंत्री गिरीश महाजन यांनी ममता ला स्टेज वरती बोलावून तिचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
पाळधी जिल्हा परिषद शाळेत नव्याने सुरू झालेल्या 5 वी वर्गातील विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी मोफत मार्गदर्शिकांचे वाटप.
पाळधी जिल्हा परिषद शाळेत नव्याने सुरू झालेल्या 5 वी वर्गातील विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी मोफत मार्गदर्शिकांचे वाटप. पाळधी ता. जामनेर : जिल्हा परिषद केंद्र शाळा पाळधी येथे आज दिनांक २५ जून २०२६ रोजी इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी प्रत्येकी ४०० रुपये किमतीची नवोदय मार्गदर्शिका मोफत वितरित करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांची योग्य तयारी करता यावी, या उद्देशाने शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. मार्गदर्शिकेमुळे विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेचा अभ्यास अधिक सोपा व प्रभावी पद्धतीने करता येणार आहे.यावेळी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत मनापासून आभार मानले. शाळेच्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडूनही कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा नेहमीच अशा शैक्षणिक उपक्रमांना प्राधान्य देत असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.“गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या यशासाठी जिल्हा परिषद केंद्र शाळा पाळधी सदैव कटिबद्ध!” 📖✨
जामनेर न्यायालयात विधी सेवा व कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न
जामनेर : तालुका विधी सेवा समिती जामनेर व तालुका वकील संघ जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी व फौजदारी न्यायालय, जामनेर येथे 19 जून 2026 रोजी दुपारी 2 वाजता विधी सेवा शिबिर तथा कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश माननीय श्री. एम. एन. जैस्वाल उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. अनिलदादा सारस्वत, तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. पी. एन. देशमुख, अध्यक्ष श्री. के. पी. बारी, सचिव ॲड. डी. बी. गोतमारे यांच्यासह अनेक विधीज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमात ॲड. एन. टी. चौधरी यांनी उपस्थित पक्षकारांना ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसंदर्भातील कायद्याची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. डी. व्ही. राजपूत यांनी केले. त्यांनी ज्येष्ठ नागरिक कायदा तसेच अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याविषयी थोडक्यात मार्गदर्शन केले. यानंतर सरकारी वकील ॲड. शेळके यांनी अंमली पदार्थांशी संबंधित कायदे आणि त्याचे सामाजिक परिणाम याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सह दिवाणी न्यायाधीश माननीय वाय. एस. आखरे यांनी ज्येष्ठ नागरिक कायदा, अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा तसेच विविध विधी सेवा योजनांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शक भाषणाने शिबिराचा समारोप झाला. या शिबिरास जामनेर तालुका वकील संघाचे सर्व विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थित होते. उपस्थितांनी शिबिराचा लाभ घेत समाधान व्यक्त केले.
भुसावळमध्ये 30 हजारांची लाच घेताना सहकार विभागातील अधिकारी व दोन लेखापरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
जळगाव, दि. 15 जून : भुसावळ येथील सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संबंधित एका प्रकरणात सहकार अधिकारी व दोन लेखापरीक्षकांना 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी भुसावळ शहरात करण्यात आली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला सावकारी व्यवसायासाठी आवश्यक परवाना काढायचा होता. त्यासाठी संबंधित कार्यालयात अर्ज केल्यानंतर परवाना मंजूर करून देण्यासाठी सहकार अधिकारी विजय विनायक गारूड (वर्ग-3) यांनी 20 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. तपासादरम्यान सुरेश जनार्दन विसपुते आणि हेमंत प्रकाश काळे या प्रमाणित लेखापरीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांसाठी व स्वतःसाठी मिळून 30 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.सोमवारी भुसावळ शहरातील नाहाटा चौफुली परिसरात सापळा कारवाईदरम्यान सुरेश विसपुते यांनी तक्रारदाराकडून 30 हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर एसीबीने त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी विजय गारूड, सुरेश विसपुते आणि हेमंत काळे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.
सजगता : राष्ट्रवादी काँग्रेसचा शिक्षण विभागाकडे पाठपुरावा सुरु,महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ दूर करण्याची मागणी
जळगाव : शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने यंदाच्या नवीन वर्षाच्या प्रवेशांमध्ये अगदी सुसूत्रता व काटेकोर धोरणाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश यापूर्वीच दिलेले असल्याने स्थानिक स्तरावर शाळा-कॉलेज व संस्थानी गोंधळाची परिस्थिती निर्माण करू नये,यासाठी शिक्षण सहसंचालक कार्यालयाने महाविद्यालय निहाय झोनल ऑफिसर नियुक्त करावे,अशी मागणी करत राष्ट्रवादी युवती काँग्रेस व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने संयुक्तरित्या प्रशासनाला साकडे घातले आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश कार्यक्रम संयोजक तथा रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षा कु.भाग्यश्री विवेक ठाकरे,जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष मोनालिका पवार व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज,१५ जून (सोमवार) रोजी येथील उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.पराग मसराम व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण यांची भेट घेऊन यंदाच्या नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने ठरवून दिलेल्या सुटसुटीत व पारदर्शक धोरणाची अंमलबजावणी काटेकोर होण्यासाठी उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी निवेदन देत मागणी केली. याबाबत व्हावी काटेकोर अंमलबजावणी : १. शासनाने ०४ जानेवारी २०१६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट देताना विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क वसूल करण्यात येऊ नये,अशा स्पष्ट सूचना असताना जिल्ह्यातील काही संस्था विद्यार्थ्यांकडून २०० ते ५०० रुपये घेत असल्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे तक्रारी आल्या असल्याने अशा प्रकारचे बेकायदा पैसे वसुल करू नये असे जिल्ह्यातील सर्व संस्थांना तात्काळ आदेश व्हावेत. २. शासनाने ०८ जुलै २०२४ रोजी निर्गमित केलेल्या निर्णयानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दुर्बल घटक,सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग तसेच इतर मागासवर्गीय या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचा १०० टक्के लाभ मंजुरीचा निर्णय झालेला असल्याने म्हणजे सरसकट मोफत शिक्षण मिळणार असल्याने प्रवेशावेळी मुलींना शुल्कासाठी वेठीस धरण्यात येऊ नये. ३. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मागणीप्रमाणे गेल्या वर्षी केलेल्या उपाययोजनेप्रमाणे मुलींना सरसकट मोफत प्रवेश देण्याच्या संदर्भात त्या-त्या महाविद्यालयांसाठी ‘नोडल ऑफिसर’ नेमण्याची तातडीने कार्यवाही करण्यात यावी.याबाबत केलेल्या कार्यवाहीची महाविद्यालय निहाय नेमण्यात आलेल्या झोनल ऑफिसरची माहिती सर्वांना सोयीसाठी जाहीर करण्यात यावी अशी मागणी दोन्ही विभागाशी निगडित अधिकाऱ्यांकडे पदाधिकाऱ्यांनी केली. शिष्टमंडळात यांचा होता सहभाग :शिक्षण विभागाच्या दोन्ही कार्यालयांच्या प्रमुखांशी बैठक करतांना सकलीन शेख रफिक,प्रांजल सुनील सोनार,श्रद्धा छगन सोनवणे,मानसी भास्कर ठाकरे,प्रिन्सि राकेश दारा,कीर्ती अरुण कुलकर्णी आदीविद्यार्थ्यांचा शिष्टमंडळात सहभाग होता.
एसीबी कारवाईनंतरही वावडदा किट वाटप केंद्र सुरूच; आर्थिक गैरव्यवहार व चौकशीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
JBN महाराष्ट्र NEWSप्रतिनिधी जामनेर जळगाव : वावडदा (JBN महाराष्ट्र NEWS प्रतिनिधी जामनेर ) येथील शासकीय किट वाटप केंद्रावर नुकत्याच झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईनंतरही संबंधित केंद्र पुन्हा सुरू करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार, लाभार्थ्यांची कथित लूट तसेच प्रशासनाच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनानुसार, दि. ४ जून २०२६ रोजी वावडदा येथील शासकीय किट वाटप केंद्रावर एसीबीने कारवाई करून १०० रुपयांची लाच स्वीकारताना एका तरुणीला अटक केली होती. तिच्याकडून २६ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणातील संबंधित मालक किंवा जबाबदार व्यक्तींवर कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तक्रारदारांनी असा आरोप केला आहे की, चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर, एरंडोल, भुसावळ, चोपडा, जामनेर, मुक्ताईनगर आदी भागांतील केंद्रे बंद ठेवून केवळ वावडदा व धरणगाव केंद्रांवरच जिल्हाभरातील लाभार्थ्यांना केवायसीसाठी बोलावले जाते. केवायसीच्या नावाखाली लाभार्थ्यांकडून प्रत्येकी ५० रुपये प्रमाणे तीन फॉर्मसाठी १५० रुपये घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.तसेच, लाभार्थ्यांना किटचे साहित्य त्याच दिवशी देणे अपेक्षित असताना त्यांना पुन्हा काही दिवसांनी बोलावून त्याच प्रक्रियेसाठी पुन्हा पैसे आकारले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. काही दलालांकडून घरपोच सेवेच्या नावाखाली प्रत्येकी ५०० ते १५०० रुपये वसूल केले जात असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. निवेदनात केंद्रांवरील सुविधांच्या अभावाचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना उन्हात तासन्तास उभे राहावे लागत असून पिण्याचे पाणी, सावली किंवा बसण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.याशिवाय, संबंधित कंत्राटदाराला यापूर्वी ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते, तरीही त्याच्याच माध्यमातून पुन्हा काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एसीबी कारवाईनंतर अवघ्या काही दिवसांतच ऑनलाइन केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आल्याने संपूर्ण प्रकरणाची आर्थिक चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असताना काही केंद्रांवर वाटप प्रक्रिया सुरू असल्याने आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.हे निवेदन संतोष ज्ञानेश्वर पाटील, कैलास सुरेश ताडे, मंगल युवराज पाटील, प्रविण शिवाजी मराठे, जितेंद्र बारी व महबूब सिंग राजपूत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहे. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
जामनेर येथे अत्याधुनिक जी. एम. फिजिओथेरपी सेंटर व नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण
जामनेर येथे अत्याधुनिक जी. एम. फिजिओथेरपी सेंटर व नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण जामनेर (प्रतिनिधी): जामनेर शहरातील न्यू रुबीस्टार हॉस्पिटलच्या वतीने अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज जी. एम. फिजिओथेरपी सेंटर तसेच नव्या सुसज्ज रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे जामनेर व परिसरातील नागरिकांना अधिक दर्जेदार, आधुनिक आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. न्यू रुबीस्टार हॉस्पिटलने आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि प्रशिक्षित तज्ज्ञांच्या माध्यमातून जी. एम. फिजिओथेरपी सेंटर सुरू केले आहे. या केंद्रामध्ये विविध शारीरिक व्याधी, दुखापतीनंतरचे पुनर्वसन, सांधेदुखी, मणक्यांचे आजार तसेच इतर फिजिओथेरपी उपचार आधुनिक पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याचबरोबर रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीची सेवा मिळावी यासाठी नव्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचेही लोकार्पण करण्यात आले. या रुग्णवाहिकेमुळे गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार केंद्रात पोहोचविणे अधिक सोयीचे होणार असून आरोग्यसेवेची गुणवत्ता आणखी उंचावणार आहे. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उपचार सेवा आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोन यांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना सक्षम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या न्यू रुबीस्टार हॉस्पिटलच्या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या स्तुत्य उपक्रमासाठी न्यू रुबीस्टार हॉस्पिटलच्या संपूर्ण व्यवस्थापन, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाचे नागरिकांनी अभिनंदन केले असून, भविष्यातही अशाच दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
भुसावळ रेल्वे मंडळ अंतर्गत विविध विकास कामांसंदर्भात डीआरएम कार्यालय, भुसावळ येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आढावा बैठक घेतली…
मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ अंतर्गत रेल्वे विभागातील विविध विकास कामे व समस्यांसंदर्भात डीआरएम कार्यालय, भुसावळ येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत तसेच डीआरएम श्री. पुनित अग्रवाल यांच्या समवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्व रेल्वे स्थानकांवरील तसेच भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्रगतीपथावर असलेल्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच “पाचोरा–जामनेर” पीजे रेल्वे विस्तारीकरण प्रकल्प आणि “भुसावळ ते खंडवा” तिसरी व चौथी रेल्वे लाईन साठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेबाबतही चर्चा करण्यात आली. रावेर लोकसभा क्षेत्रातील नांदुरा, मलकापूर, बोदवड, वरंगाव, निंभोरा, सावदा व रावेर आदी प्रमुख स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसुविधांसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. रेल्वे प्रकल्पांमुळे शेतजमिनी बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या अडचणींचीही दखल घेण्यात आली असून, त्या प्रश्नांचे लवकरात लवकर निराकरण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी स्पष्ट सूचना दिल्या.
सिंदखेडराजा ते पाचाड दरम्यान राष्ट्रमाता जिजाऊ महाअभिवादन यात्रेचे आयोजनराजमाता जिजाऊ यांचे माहेरचे वंशज शिवाजीराजे जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक यात्रा
जामनेर, प्रतिनिधी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दिनांक १५ ते १७ जून २०२६ दरम्यान “राष्ट्रमाता जिजाऊ महाअभिवादन यात्रा २०२६” चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थळ असलेल्या ऐतिहासिक सिंदखेडराजा येथून यात्रेला प्रारंभ होणार असून किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील त्यांच्या समाधीस्थळी यात्रेची सांगता होणार आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे माहेरचे वंशज तथा जाधव घराण्याचे वारसदार शिवाजीराजे जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही ऐतिहासिक यात्रा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतील शिवभक्त, इतिहासप्रेमी, शिवकार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होणार आहेत. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांचा जागर, शिवचरित्राचा प्रचार-प्रसार आणि स्वराज्याच्या मूल्यांचे संवर्धन हा या यात्रेचा प्रमुख उद्देश आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागांना जोडणारी ही यात्रा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक एकात्मतेचा संदेश देणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यासह जामनेर तालुक्यातील सर्व शिवप्रेमी, शिवभक्त, युवक, महिला तसेच विविध सामाजिक संघटनांनी या ऐतिहासिक महाअभिवादन यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यात्रा समन्वयक राहुल चव्हाण व कैलास पाटील यांनी केले आहे. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कार्याचा गौरव आणि स्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहासाचे स्मरण करून देणारी ही यात्रा राज्यभरातील शिवप्रेमींसाठी एक ऐतिहासिक पर्व ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


