नि.पं.पाटील विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा
पळासखेडे मिराचे दि १७ जुलै २०२५(प्रतिनिधी ) नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे शाळेत मातृहृदयी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पवार हे होते. सर्वप्रथम कै.आचार्य बापूसो. गजाननराव गरुड व कै. अण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष , संस्था संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक जे.आर.पाटील यांनी कै. आचार्य बापूंना अभिप्रेत असलेला विद्यार्थी याबद्दल मत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षक एस. जे. सोनवणे यांनी मनोगतात संस्थेची स्थापना व व्याप्ती याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी अध्यक्ष भाषणात कै.आचार्य गजाननराव बापूंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक व सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील,चंद्रशेखर काळे,अब्दुल नबी तांबोळी,डी. पी .पाटील, संजू पवार,.शालिक पाटील,अशोक माळी,बळीराम माळी,लता पाटील हे मान्यवर उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्षाली प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक – हितेश वर्जन चव्हाण तृतीय क्रमाक – ओम संतोष चौधरी यांनी मिळविला. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 50 शालेय गणवेश वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने ,सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जी.पी. पाटील यांनी केले तर आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले.
शिवक्रांती मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
संगीत खुर्चीसह विविध स्पर्धांना बालकांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कुंभारी सिम, दिवपिंपरी ता. जामनेर :जामनेर तालुक्यातील कुंभारी सिम, दिवपिंपरी येथे शिवक्रांती मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावातील नागरिक, महिला, युवक तसेच बालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गणेशोत्सव काळात मंडळाच्या वतीने गणपती बाप्पाची भक्तिभावाने आरती व पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांसाठी विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये संगीत खुर्ची या विशेष कार्यक्रमासह विविध खेळ व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. बालकांसह युवक व ग्रामस्थांनी या कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमादरम्यान सहभागी झालेल्या स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने कार्यक्रमस्थळी आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विविध स्पर्धांमधून सहभागींचे मनोरंजन करण्याबरोबरच गावातील नागरिकांमध्ये एकोपा आणि सामाजिक सलोखा वाढविण्याचा संदेश देण्यात आला. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता त्यातून सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळावी, तसेच गावातील युवक व नागरिकांनी एकत्र येऊन उत्सव साजरा करावा, या उद्देशाने शिवक्रांती मित्र मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचे उपस्थित ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
ऋषीपंचमीनिमित्त अंबिलहोळ येथे प्रकाश पाटील यांचा शेतकऱ्यांशी संवाद
अंबिलहोळ : प्रतिनिधी ऋषीपंचमीनिमित्त अंबिलहोळ येथील केशव बाबा व रामदेव बाबा यांच्या धार्मिक स्थळी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमाला परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी भंडाऱ्यासाठी उपस्थित असलेल्या ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेत त्यांच्या अडचणींबाबत चर्चा केली. यानंतर प्रकाश पाटील यांनी केशव बाबा व रामदेव बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच अंबिलहोळ ग्रामस्थ आणि पक्षाच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची भेट घेऊन विविध स्थानिक विषयांवर चर्चा केली. याप्रसंगी जितेंद्र नाईक (खडकी), दौलत पवार, गोकुळ चव्हाण, रामचंद्र नाईक, विजय चव्हाण, भानुदास चव्हाण यांच्यासह अंबिलहोळ येथील ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
रक्षा खडसेंकडून मिझोरामच्या क्रीडा परिसंस्थेचा आढावा
साई ऐझॉल केंद्राला भेट; खेळाडू व प्रशिक्षकांशी साधला संवाद, ईशान्य भारतातील क्रीडा प्रतिभेला अधिक संधी देण्यावर भर ऐझॉल, दि. १५ सप्टेंबर २०२६ : केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी ऐझॉल येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) केंद्राला भेट देत मिझोराममधील क्रीडा पायाभूत सुविधा, खेळाडूंचे प्रशिक्षण आणि क्रीडा विकासाचा आढावा घेतला. यावेळी मिझोरामचे क्रीडा व युवा सेवा मंत्री पु. लालंघिंगलोवा हमार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी रक्षा खडसे आणि मिझोरामचे क्रीडा व युवा सेवा मंत्री यांच्यात राज्यातील क्रीडा विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वय अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा झाली. तसेच SAI केंद्रातील खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांशी रक्षा खडसे यांनी संवाद साधला. खेळाडूंचा प्रशिक्षण अनुभव, विविध स्पर्धांमधील सहभाग आणि भविष्यातील उद्दिष्टांबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे सहाय्यक संचालक श्री. शिवम यादव यावेळी उपस्थित होते. ईशान्य भारतातील युवा खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षणासोबतच क्रीडा विज्ञान, पुनर्वसन, पोषण आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यावर रक्षा खडसे यांनी भर दिला. खेलो इंडिया उपक्रमातून क्रीडा सुविधांना बळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील क्रीडा संस्कृती अधिक व्यापक करण्यासाठी तसेच तळागाळातील प्रतिभावान खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ‘खेलो इंडिया’ उपक्रमाच्या माध्यमातून विविध प्रयत्न सुरू आहेत. मिझोरामसह ईशान्य भारतातील क्रीडा प्रतिभेला या माध्यमातून अधिक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर रक्षा खडसे यांनी भर दिला. ऐझॉल येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रशिक्षण केंद्रात खेलो इंडिया अंतर्गत सिंथेटिक हॉकी टर्फ आणि प्रकाशयोजना उभारण्याचा प्रकल्पही क्रीडा पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. लालरेम्सियामी हमारझोटे यांचे उल्लेखनीय उदाहरण मिझोराममधील क्रीडा प्रतिभेचे उदाहरण म्हणून लालरेम्सियामी हमारझोटे यांचा उल्लेख करण्यात आला. थेंझॉल येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अकादमीत प्रशिक्षण घेतलेल्या लालरेम्सियामी या मिझोरामच्या पहिल्या महिला ऑलिम्पियन आणि पहिल्या आशियाई क्रीडा पदकविजेत्या ठरल्या आहेत. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांची अर्जुन पुरस्कार २०२५ साठी निवड झाली आहे. ईशान्य भारतात मोठी क्रीडा प्रतिभा आणि मजबूत क्रीडा संस्कृती आहे. क्रीडा सुविधा, दर्जेदार प्रशिक्षण तसेच केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वय अधिक मजबूत करून या प्रतिभेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे नेण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे रक्षा खडसे यांनी यावेळी अधोरेखित केले.
गणेशोत्सवानिमित्त निळकंठ विद्यालयात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
‘फुगे फोडणे’ स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उत्साहाच्या वातावरणात रंगला उपक्रम जामनेर : प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक अशा ‘फुगे फोडणे’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. फुगे फोडण्याच्या या मनोरंजक खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये चुरस निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मनोरंजनासोबतच खेळाडूवृत्ती, शिस्त आणि सांघिक भावना जोपासण्याची संधी मिळाली. स्पर्धा सुरळीतपणे पार पडण्यासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांच्या सहकार्यामुळे स्पर्धेचे नियोजन व्यवस्थितपणे करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक जयप्रकाश पाटील, पर्यवेक्षक राजेंद्र पाटील, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख जी. पी. पाटील यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांसह क्रीडा कौशल्यांना वाव मिळत आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाडूवृत्ती, आत्मविश्वास, सांघिक भावना आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होत आहे.
माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याविरोधात गंभीर आरोप; पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शस्त्राचा धाक दाखवून जबरदस्तीने मद्यपान करण्यास भाग पाडल्याचा तरुणीचा आरोप; शैलेश पाटील यांच्यावरही गुन्हा भिवंडी : कल्याणचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांच्याविरोधात एका तरुणीने केलेल्या तक्रारीवरून भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात संबंधित महिलेने गंभीर आरोप केले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, संबंधित तरुणीच्या पती-पत्नीमधील वादात मध्यस्थी करण्याच्या बहाण्याने तिला बापगाव परिसरातील एका फार्महाऊसवर नेण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तेथे शस्त्राचा धाक दाखवून धमकावण्यात आले तसेच जबरदस्तीने मद्यपान करण्यास भाग पाडण्यात आले, असा दावा संबंधित महिलेने केला आहे. त्यानंतर दोघांनी तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप तिने तक्रारीत केल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात महिलेने काही डिजिटल पुरावे आणि संभाषण उपलब्ध असल्याचा दावा केल्याचेही वृत्त आहे. तक्रार दाखल करण्यासाठी काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी मदत केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची पडघा पोलिसांकडून चौकशी सुरू असून, तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासाच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे. गुन्हा दाखल होणे म्हणजे आरोप सिद्ध झाले असा अर्थ होत नाही, त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित आरोपांकडे तक्रारीतील दावे म्हणून पाहणे महत्त्वाचे आहे. या प्रकरणामुळे कल्याण-भिवंडी परिसरात राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांच्या तपासातून या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती आणि पुढील कारवाई स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
जामनेरचे सुपुत्र इंजि. विनोद पाटील यांचा ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्काराने सन्मान जलसंपदा प्रकल्पांमधील उल्लेखनीय कार्याची दखल; जळगावातील अभियंता दिन कार्यक्रमात मानाचा गौरव
जामनेर : प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथील सुपुत्र तथा महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंता इंजि. विनोद प्रकाश पाटील यांचा अभियंता दिनानिमित्त ‘भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या उत्कृष्ट अभियंता गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. जळगाव येथे १५ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.इंजि. विनोद पाटील यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून सन २००३ मध्ये बी.ई. (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जलसंपदा क्षेत्रात कार्य करण्यास सुरुवात केली. सन २००४ ते २००७ या कालावधीत त्यांनी जिल्हा परिषद, नाशिक येथे कनिष्ठ अभियंता म्हणून काम केले. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांची सहाय्यक अभियंता श्रेणी-२ म्हणून निवड झाली.सन २००७ ते २०१० या कालावधीत त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात कार्य केले. त्यानंतर महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक येथे प्रशिक्षण पूर्ण केले. सन २०११ ते २०१५ दरम्यान धुळे पाटबंधारे विभागांतर्गत जामखेडी मध्यम प्रकल्प, ता. साक्री येथे सहाय्यक अभियंता म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.सन २०१५ ते २०२३ या कालावधीत वाघूर धरण प्रकल्प, जळगाव येथे त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. वाघूर उपसा योजनेअंतर्गत जळगाव, जामनेर व गारखेडा शाखेतील गुरुत्वीय नलिकेद्वारे वितरण प्रणाली, तसेच गाडेगाव व हिवरखेडा येथील पंपहाऊसच्या कामांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देणे, वितरण प्रणालीची कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करणे, प्रत्यक्ष क्षेत्रीय भेटी देऊन कामांवर लक्ष ठेवणे तसेच विविध तांत्रिक अडचणींवर मार्ग काढणे, या कार्याची विशेष दखल पुरस्काराच्या गौरवपत्रात घेण्यात आली आहे.तसेच ‘१०० कोटी वृक्ष लागवड अभियान’ मध्ये सक्रिय सहभाग घेत शेतकऱ्यांमध्ये पाण्याबाबत जनजागृती करणे आणि शेती उत्पादन वाढीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचे कामही त्यांनी केले आहे.सन २०२३ मध्ये कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर ते सध्या गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव येथे कार्यरत आहेत.सायकलिंग आणि ट्रेकिंगचीही आवडअभियांत्रिकी क्षेत्रातील कार्यासोबतच इंजि. विनोद पाटील यांना सायकलिंग व ट्रेकिंगची विशेष आवड आहे. सन २०२१ मध्ये त्यांनी २००, ३००, ४०० आणि ६०० किलोमीटरचे बी.आर.एम. पूर्ण करून ‘सुपर रॅंडोनिअर्स’ हा किताब मिळविला आहे.३०० विद्यार्थ्यांना दिले मार्गदर्शनसन २०२१ ते २०२५ या कालावधीत त्यांनी अभियांत्रिकीच्या सुमारे ३०० विद्यार्थ्यांना इंटर्नशिप प्रशिक्षण दिले. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी वर्ग-१ व वर्ग-२ अधिकारी म्हणून शासन सेवेत दाखल झाल्याचे गौरवपत्रात नमूद करण्यात आले आहे.जलसंपदा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, शेतकऱ्यांसाठी केलेले प्रयत्न, विद्यार्थ्यांना दिलेले मार्गदर्शन आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत जळगाव जिल्हा शासकीय अभियंता सहकारी पतपेढी मर्यादित, जळगाव यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.जामनेर तालुक्यातील हिवरखेडा गावच्या सुपुत्राचा ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्काराने झालेला सन्मान हा संपूर्ण जामनेर तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली असून, त्यांच्या या गौरवाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राज्यातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा एल्गार; जळगावात काळ्या फिती लावून निषेधास सुरुवात
समान काम समान वेतन, सुधारित वेतनश्रेणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन; मागण्या मान्य न झाल्यास १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा जळगाव : राज्यातील दुय्यम न्यायालयांमध्ये कार्यरत तब्बल ३४ हजार न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाशी संबंधित कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली असून, शासनाने मागण्यांची दखल घेऊन सकारात्मक निर्णय न घेतल्यास १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे.या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याला १६ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात सुरुवात झाली. न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी हातावर काळ्या फिती बांधून शासनाच्या धोरणांविरोधात निषेध नोंदवला. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचे हे पहिले पाऊल उचलण्यात आले आहे.समान काम समान वेतनाची प्रमुख मागणीन्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातील प्रमुख मागणी ‘समान काम, समान वेतन’ ही आहे. यासोबतच सुधारित वेतनश्रेणी लागू करणे, सेवाविषयक विविध प्रश्न निकाली काढणे आणि प्रलंबित मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घेणे, अशा विविध मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांसंदर्भात कर्मचारी संघटनेकडून शासनाचे लक्ष वेधण्यात येत आहे.टप्प्याटप्प्याने आंदोलनकर्मचाऱ्यांनी आंदोलनाची सुरुवात काळ्या फिती लावून निषेध नोंदवण्यापासून केली आहे. शासनाकडून मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर १७ नोव्हेंबरपासून राज्यातील दुय्यम न्यायालयांमधील कामकाज बंद ठेवून बेमुदत संप करण्याचा इशारा देण्यात आला आहे.न्यायालयीन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यताराज्यातील दुय्यम न्यायालयांमध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी कार्यरत असल्याने बेमुदत संप झाल्यास न्यायालयीन प्रशासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. विविध प्रकरणांशी संबंधित कागदपत्रे, नोंदी, कार्यालयीन प्रक्रिया आणि इतर न्यायालयीन प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शासनाने आंदोलनाची दखल घेऊन चर्चेद्वारे प्रश्न सोडवावा, अशी भूमिका कर्मचारी संघटनेकडून मांडण्यात येत आहे.जळगाव जिल्हा न्यायालयाच्या आवारात काळ्या फिती लावून सुरू झालेल्या आंदोलनातून कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी एकजूट दाखवली आहे. आता शासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते आणि प्रस्तावित बेमुदत संप टाळण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे राज्यातील न्यायालयीन कर्मचारी तसेच न्यायालयीन कामकाजाशी संबंधित नागरिकांचे लक्ष लागले आहे.
जामनेरमध्ये ट्रान्सफॉर्मर बदलला; राजकीय ‘व्होल्टेज’ वाढलं!
नागरिकांच्या विजेच्या प्रश्नावरून श्रेयाची ‘करंट वॉर’! भाजपचा पाठपुराव्याचा दावा; नगरसेवक जावेद मुल्ला म्हणतात—‘आम्हाला श्रेय नको, विकास हवा!’ जामनेर : शहरातील नागरिकांच्या विजेच्या समस्येवर उपाय म्हणून काही भागांमध्ये कमी क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बदलून मोठ्या क्षमतेचे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा असतानाच, या ट्रान्सफॉर्मरच्या कामाचे श्रेय नेमके कुणाचे, यावरून जामनेरच्या राजकीय वर्तुळात मात्र चांगलाच ‘करंट’ निर्माण झाला आहे. एकीकडे सत्ताधारी भाजपकडून या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचा दावा करण्यात येत आहे. नागरिकांना वारंवार भेडसावणारी विजेची समस्या लक्षात घेऊन संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा केल्यामुळेच मोठ्या क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम मार्गी लागल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. आता या ट्रान्सफॉर्मरच्या उद्घाटनाचीही वेळ आल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक जावेद मुल्ला यांनी या दाव्यापेक्षा वेगळी भूमिका मांडली आहे. नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेत आपणच संबंधित ट्रान्सफॉर्मरसाठी पाठपुरावा केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, ‘आम्हाला श्रेय घ्यायचे नाही, आम्हाला विकासकामात रस आहे,’ अशी भूमिका जावेद मुल्ला यांनी व्यक्त केली आहे. कुणाच्या पाठपुराव्याने आला ट्रान्सफॉर्मर? ट्रान्सफॉर्मर आला, क्षमता वाढली; मात्र आता राजकीय प्रश्न उभा राहिला आहे—या कामासाठी नेमका कुणी पाठपुरावा केला? भाजपकडून एका बाजूला श्रेयाचा दावा केला जात असताना, जावेद मुल्ला यांच्याकडूनही पाठपुराव्याची भूमिका मांडण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या विजेच्या प्रश्नाला आता राजकीय श्रेयवादाची किनार लागल्याचे चित्र आहे. नागरिकांचा सवाल मात्र वेगळाच! राजकीय दावे-प्रतिदाव्यांपेक्षा नागरिकांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे वीजपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी सुटणार का? कमी दाब, वारंवार वीज खंडित होणे आणि क्षमतेअभावी निर्माण होणाऱ्या अडचणी प्रत्यक्षात कमी झाल्या, तर त्याचा थेट फायदा नागरिकांना होणार आहे. श्रेय कुणाचेही असो… नागरिकांना हवा आहे सुरळीत वीजपुरवठा! जामनेरमध्ये ट्रान्सफॉर्मर बदलला; पण त्याचबरोबर राजकीय वातावरणाचे ‘व्होल्टेज’ही वाढले आहे. आता उद्घाटनाच्या फितीपेक्षा नागरिकांचे लक्ष नवीन ट्रान्सफॉर्मर किती प्रभावी ठरतो आणि विजेची समस्या कितपत सुटते, याकडे लागले आहे. वीजेचा करंट कमी करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर आला… पण श्रेयाच्या राजकारणामुळे जामनेरमध्ये ‘हाय व्होल्टेज’ सुरू झालंय!
आयटीआय प्रवेशद्वाराबाहेरील कचरा संकलन केंद्र हटवा; अभाविपचा आंदोलनाचा इशारा
जळगाव : प्रतिनिधी शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयच्या प्रवेशद्वाराबाहेरील कचरा संकलन केंद्र तातडीने हटविण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. आयटीआय परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा साचत असून, त्यातून दुर्गंधी तसेच डास-माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप अभाविपने केला आहे. आयटीआय परिसराच्या आसपास जवळपास सहा महाविद्यालये असून, दररोज हजारो विद्यार्थी या मार्गाने ये-जा करतात. प्रवेशद्वारालगतच कचरा साचत असल्याने विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे अभाविपचे म्हणणे आहे. विशेषतः पावसाळ्यात साचलेल्या कचऱ्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून साथीचे व संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, अशी चिंता संघटनेने व्यक्त केली आहे. या समस्येबाबत महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, असा आरोप अभाविपने केला आहे. कचरा संकलन केंद्रामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने दखल घेऊन हे केंद्र अन्यत्र हलवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, मागणीची दखल घेऊन तातडीने कारवाई न झाल्यास उद्या आयटीआयच्या प्रवेशद्वाराबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिला आहे. त्यामुळे आता मनपा प्रशासन या प्रश्नावर कोणती भूमिका घेते, याकडे विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
₹2 हजारांवरील UPI व्यवहारांवर 0.4% MDR; 15 ऑक्टोबरपासून नवे नियम
पेट्रोल, रेल्वे, दूरसंचार, विमा यांसारख्या निवडक सेवांसाठी ₹5 निश्चित MDR; ग्राहकांकडून थेट शुल्क वसूल करता येणार नाही नवी दिल्ली : देशभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या डिजिटल पेमेंट प्रणालींपैकी एक असलेल्या UPI व्यवहारांच्या शुल्करचनेत महत्त्वाचा बदल होणार आहे. 15 ऑक्टोबर 2026 पासून निवडक Person-to-Merchant (P2M) UPI व्यवहारांवर Merchant Discount Rate (MDR) लागू करण्यात येणार आहे. नव्या नियमांनुसार ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या पात्र व्यापारी व्यवहारांवर साधारणपणे 0.4 टक्के MDR आकारला जाईल. मात्र, हा शुल्कभार ग्राहकाकडून थेट वसूल करता येणार नाही. ₹2 हजारांपर्यंतचे UPI व्यवहार पूर्वीप्रमाणेच शुल्कमुक्त नव्या नियमांमध्ये ₹2,000 पर्यंतच्या पात्र P2M UPI व्यवहारांवर MDR लागू होणार नाही. त्यामुळे दैनंदिन स्वरूपातील किराणा, हॉटेल, दुकान किंवा इतर छोट्या खरेदीसाठी ₹2,000 पर्यंत UPI पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना या बदलाचा परिणाम होणार नाही. NPCIच्या माहितीनुसार, UPI P2M व्यवहारांपैकी 95 टक्क्यांहून अधिक व्यवहार ₹2,000 किंवा त्यापेक्षा कमी रकमेचे आहेत. त्यामुळे बहुतांश दैनंदिन व्यवहार या शुल्काच्या कक्षेबाहेर राहतील. ₹2 हजारांपेक्षा जास्त व्यवहारांवर 0.4 टक्के MDR ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या पात्र Person-to-Merchant व्यवहारांवर 0.4 टक्के MDR लागू होईल. उदाहरणार्थ, ₹3,000 च्या व्यवहारावर 0.4 टक्के दरानुसार ₹12 MDR होईल, तर ₹50,000 च्या व्यवहारावर ₹200 MDR होऊ शकतो. मात्र, मोठ्या व्यवहारांसाठी MDRची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ₹75,000 किंवा त्याहून अधिक रकमेच्या व्यवहारावर MDR कमाल ₹300 प्रति व्यवहार इतकाच राहील. म्हणजे व्यवहाराची रक्कम त्यापेक्षा जास्त असली तरी MDR ₹300 पेक्षा अधिक आकारला जाणार नाही. ग्राहकाच्या खात्यातून 0.4 टक्के रक्कम कापली जाणार का? या नव्या नियमाबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, MDR हा व्यापारी बाजूवरील शुल्क आहे. ग्राहकाच्या UPI पेमेंटमधून स्वतंत्रपणे 0.4 टक्के रक्कम कापण्याची तरतूद या चौकटीत नाही. केंद्र सरकारनेही व्यापाऱ्यांनी हा खर्च ग्राहकांवर टाकू नये, याबाबत बँकांना व संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे “₹2,000 पेक्षा जास्त UPI पेमेंट केले की ग्राहकाच्या खात्यातून 0.4 टक्के अतिरिक्त पैसे कट होतील”, असा सरसकट दावा चुकीचा ठरतो. पेट्रोल, रेल्वे, विमा, दूरसंचार सेवांसाठी ₹5 निश्चित MDR काही विशिष्ट व्यापारी श्रेणींसाठी 0.4 टक्क्यांऐवजी प्रति पात्र व्यवहार ₹5 निश्चित MDR ठेवण्यात आला आहे. यामध्ये रेल्वे, दूरसंचार, विमा आणि इंधन (पेट्रोल/डिझेल) यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. या श्रेणीतील ₹2,000 पेक्षा जास्त पात्र UPI व्यवहारांवर ₹5 MDR लागू होईल. मात्र, हा MDR व्यापाऱ्याच्या बाजूचा शुल्क असून, त्याचा अर्थ ग्राहकाने प्रत्येक पेट्रोल किंवा रेल्वे व्यवहारावर ₹5 अतिरिक्त देणे असा होत नाही. व्यक्ती-ते-व्यक्ती UPI व्यवहारांवर परिणाम नाही एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला UPIद्वारे पैसे पाठवले, म्हणजेच Person-to-Person (P2P) व्यवहार केला, तर या नव्या MDRचा त्यावर परिणाम होणार नाही. व्यक्ती-ते-व्यक्ती UPI व्यवहार पूर्वीप्रमाणेच शुल्कमुक्त राहतील. छोट्या व्यापाऱ्यांनाही दिलासा नव्या चौकटीत छोट्या व्यापाऱ्यांसाठीही सवलतीची तरतूद आहे. UPI QR कोडद्वारे महिन्याला ₹1 लाखांपर्यंतची रक्कम स्वीकारणाऱ्या पात्र छोट्या व्यापाऱ्यांना MDRमधून सूट देण्यात आली आहे. यामुळे छोट्या दुकानदारांवरील अतिरिक्त व्यवहारखर्चाचा परिणाम कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शेअर्स आणि म्युच्युअल फंडसह भांडवली बाजारातील व्यवहारांसाठी स्वतंत्र दर सामान्य P2M व्यवहारांपेक्षा काही आर्थिक व्यवहारांसाठी स्वतंत्र MDR रचना करण्यात आली आहे. भांडवली बाजाराशी संबंधित पात्र UPI व्यवहारांसाठी 0.02 टक्के MDR निश्चित करण्यात आला असून, त्यावरही ₹300 प्रति व्यवहार कमाल मर्यादा ठेवण्यात आली आहे. 15 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी NPCIने जाहीर केलेली ही सुधारित MDR चौकट 15 ऑक्टोबर 2026 पासून लागू होणार आहे. त्यामुळे मोठ्या रकमेचे UPIद्वारे व्यापारी व्यवहार करणाऱ्या व्यवसायांना त्यांच्या पेमेंट व्यवस्थेत या बदलाची तयारी करावी लागणार आहे. दुसरीकडे, ₹2,000 पर्यंतचे P2M व्यवहार आणि P2P व्यवहार शुल्कमुक्तच राहणार असल्याने सामान्य UPI वापरावर व्यापक परिणाम होणार नाही. थोडक्यात :• ₹2,000 पर्यंतचे पात्र P2M UPI व्यवहार — MDR नाही• ₹2,000 पेक्षा जास्त पात्र P2M व्यवहार — 0.4% MDR• ₹75,000 व त्यावरील व्यवहार — कमाल ₹300 MDR• रेल्वे, दूरसंचार, विमा, इंधन इ. निवडक श्रेणी — ₹5 निश्चित MDR• व्यक्ती-ते-व्यक्ती UPI व्यवहार — शुल्कमुक्त• पात्र छोट्या व्यापाऱ्यांना — MDRमधून सूट• ग्राहकांकडून MDR थेट वसूल करण्याची तरतूद — नाही


