नि.पं.पाटील विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा
पळासखेडे मिराचे दि १७ जुलै २०२५(प्रतिनिधी ) नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे शाळेत मातृहृदयी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पवार हे होते. सर्वप्रथम कै.आचार्य बापूसो. गजाननराव गरुड व कै. अण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष , संस्था संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक जे.आर.पाटील यांनी कै. आचार्य बापूंना अभिप्रेत असलेला विद्यार्थी याबद्दल मत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षक एस. जे. सोनवणे यांनी मनोगतात संस्थेची स्थापना व व्याप्ती याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी अध्यक्ष भाषणात कै.आचार्य गजाननराव बापूंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक व सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील,चंद्रशेखर काळे,अब्दुल नबी तांबोळी,डी. पी .पाटील, संजू पवार,.शालिक पाटील,अशोक माळी,बळीराम माळी,लता पाटील हे मान्यवर उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्षाली प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक – हितेश वर्जन चव्हाण तृतीय क्रमाक – ओम संतोष चौधरी यांनी मिळविला. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 50 शालेय गणवेश वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने ,सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जी.पी. पाटील यांनी केले तर आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले.
भुसावळमध्ये तरुणाचा खून; १७ वर्षीय अल्पवयीन संशयित ताब्यात
पाटील मळा परिसरातील घटनेने खळबळ; आईशी बोलण्याच्या कारणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील पाटील मळा परिसरात गुरुवारी, १० सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास एका तरुणावर हल्ला करून त्याचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत तुषार गोविंदा सोनवणे (वय ३५) यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, तुषार सोनवणे हे एका महिलेच्या आईशी बोलत असल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर हल्ल्यात झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत १७ वर्षीय अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. अल्पवयीन असल्याने त्याची ओळख कायद्यानुसार जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, या हत्येमागील नेमके कारण काय होते, वाद नेमका कशामुळे झाला आणि हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम काय आहे, याबाबत पोलीस तपास सुरू आहे. आईशी बोलण्याच्या कारणावरून वाद झाल्याची माहिती ही प्राथमिक स्वरूपाची असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे पाटील मळा परिसरासह भुसावळ शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
ज्ञानगंगा विद्यालयात विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
जामनेर येथील ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दि.०९-०९-२०२६ रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आरबीएसके टीम द्वारे सर्व शालेय इ.५ वी ते इ.१२ वी च्या सर्व उपस्थित विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यावेळी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी सर्व डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.त्यावेळी डॉ. राजेश सोनवणे(तालुका वैदयकीय अधिकारी जामनेर यांनी सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सर्व टीमच्या वतीने करण्यात आली.त्यावेळी डॉ. राजेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.डॉ.जितेंद्र वानखेडे,डॉ.अनिता राठोड, प्रियंका वानखेडे, हर्षा गवळे, या सर्व टीमने एकूण ७७६ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून विद्यार्थ्यांना मेडिसिन चे वाटप करण्यात आले.त्यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री राजेंद्र सोनवणे यांनी मार्गदर्शन करताना सर्व विद्यार्थ्यांनी “आरोग्य हीच धनसंपदा” या नुसार स्वतःचे आरोग्य सांभाळावे व डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे आपली दैनंदिन दिनचर्या सुनिश्चित करावी असे आव्हान केले.सदर आरोग्य तपासणीस शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.
गोरनाळे येथे बैल पोळ्याचा मान उखर्डू काशिनाथ पाटील यांच्या बैलास
पोलीस पाटील गोपाल मुळे यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने पूजा; ग्रामस्थांची मोठी उपस्थिती वाकडी, ता. जामनेर, दि. ११ सप्टेंबर २०२६ :शेतकरी बांधवांचा पारंपरिक आणि श्रद्धेचा सण असलेल्या बैल पोळ्यानिमित्त गोरनाळे येथे सालाबादप्रमाणे यंदाही उत्साहात बैल पोळा साजरा करण्यात आला. यावेळी श्री. उखर्डू काशिनाथ पाटील यांच्या बैलास पोळ्याचा मान देण्यात आला. गोरनाळे गावचे पोलीस पाटील श्री. गोपाल सुकदेव मुळे यांच्या हस्ते श्री. उखर्डू काशिनाथ पाटील यांच्या बैलाची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. त्यानंतर बैलास पोळ्याचा मान देण्यात आला. यावेळी मा. सरपंच श्री. आत्माराम दयाराम पाटील, मा. तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री. दिनकर नीना कोळी, PSI महाजन साहेब, पोलीस मुकेश पाटील यांच्यासह गावातील नागरिक, शेतकरी व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोळ्यानिमित्त मानाच्या बैलाला आकर्षक सजावट करण्यात आली होती. पारंपरिक पद्धतीने पूजा, सणाचा उत्साह आणि ग्रामस्थांची उपस्थिती यामुळे गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्याच्या जीवनात बैलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्षभर शेतीच्या कामात शेतकऱ्याला साथ देणाऱ्या या मुक्या जीवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा म्हणून बैल पोळा साजरा केला जातो. या सणाच्या माध्यमातून शेतकरी आणि बैल यांच्यातील अतूट नाते अधोरेखित होते. गोरनाळे येथे वर्षानुवर्षे जपली जाणारी ही परंपरा पुढील पिढ्यांनीही कायम ठेवावी आणि आपल्या ग्रामीण संस्कृती व परंपरांचा अभिमान बाळगावा, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.
उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे अत्याधुनिक ३०० एम.ए. क्ष-किरण यंत्र दाखल!
जामनेर परिसरातील गोरगरीब रुग्णांना मिळणार अद्ययावत आरोग्य सुविधा; इतर शहरांमध्ये जाण्याची धावपळ होणार कमी जामनेर (प्रतिनिधी) : जामनेर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल पडले आहे. उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे नवीन ३०० एम.ए. (300 mA) क्ष-किरण (X-Ray) यंत्र दाखल झाले असून, त्यामुळे परिसरातील रुग्णांना क्ष-किरण तपासणीची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल सांगळे यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे क्ष-किरण यंत्र चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयामार्फत उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे हस्तांतरित करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र चौधरी, एन.क्यू.ए.एस. (NQAS) नोडल अधिकारी डॉ. स्वप्नील कळसकर तसेच डॉ. दीपक जाधव यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. यंत्राच्या मंजुरीपासून ते हस्तांतरणापर्यंत सातत्याने पाठपुरावा करणारे उपजिल्हा रुग्णालय, जामनेरचे क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी श्री. राहुल कोडवते तसेच उपजिल्हा रुग्णालयातील संपूर्ण कर्मचारीवर्गाचेही अभिनंदन होत आहे. गोरगरीब रुग्णांना मोठा फायदा या ३०० एम.ए. क्ष-किरण यंत्रामुळे जामनेर व परिसरातील रुग्णांना आवश्यक क्ष-किरण तपासणीची सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना तपासणीसाठी इतर शहरांमध्ये किंवा खासगी केंद्रांवर जाण्याची गरज कमी होणार असून, त्यांचा वेळ व प्रवासाचा खर्चही वाचण्यास मदत होईल. अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर रुग्णांना स्थानिक पातळीवरच आवश्यक निदानात्मक तपासणीची सुविधा मिळणार असल्याने जामनेरच्या आरोग्य व्यवस्थेला यामुळे आणखी बळकटी मिळणार आहे. अधिकृत अभियंत्यांकडून इन्स्टॉलेशननंतर सुविधा कार्यान्वित सदर क्ष-किरण यंत्र अधिकृत अभियंत्यांमार्फत योग्य पद्धतीने इन्स्टॉल व कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यानंतर ही सुविधा रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल. लवकरच भव्य लोकार्पण सोहळा यंत्राचे इन्स्टॉलेशन व कार्यान्वित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माननीय नामदार श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते या नवीन सुविधेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय परिवाराकडून देण्यात आली आहे. जामनेर परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या दृष्टीने ही सुविधा निश्चितच महत्त्वाची ठरणार असून, उपजिल्हा रुग्णालय, जामनेरच्या आरोग्यसेवेला यामुळे नवी ताकद मिळणार आहे. – उपजिल्हा रुग्णालय परिवार, जामनेर
जामनेर शहरात पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांचे पेट्रोलिंग
व्यापारी व नागरिकांशी साधला थेट संवाद; कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थेचा घेतला आढावा जामनेर | प्रतिनिधी : जामनेर पोलीस ठाण्याचा नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांनी गुरुवारी शहरातील विविध भागांत प्रत्यक्ष पेट्रोलिंग करत व्यापारी आणि नागरिकांशी संवाद साधला. शहरातील कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा त्यांनी आढावा घेतला. पेट्रोलिंगदरम्यान पोलीस निरीक्षक बोऱ्हाडे यांनी शहरातील प्रमुख भागांना भेट देत व्यापारी व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. संशयास्पद व्यक्ती, हालचाल किंवा कोणतीही अनुचित घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असेही पोलीस निरीक्षक बोऱ्हाडे यांनी सांगितले. पेट्रोलिंगदरम्यान मंत्री गिरीश महाजन यांची भेट दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे या मार्गावरून जात असताना पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याठिकाणी थांबून पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्याशी संवाद साधला. यावेळी शहरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या सुरक्षेसह विविध विषयांवर चर्चा झाली. मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित नागरिकांशीही संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जामनेर शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या पेट्रोलिंगचे महत्त्व असून, नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रत्यक्ष पेट्रोलिंगमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी मिळण्यास मदत होणार असून, नागरिकांमध्येही सुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.
भुसावळ-लोहार बसमध्ये महिलेची १५ ग्रॅम सोन्याची पोत लंपास!
जामनेर बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने पोत केली लंपास; जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल जामनेर | प्रतिनिधी :भुसावळ ते लोहार बसने प्रवास करत असताना महिलेच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना जामनेर बसस्थानक परिसरात घडली. याप्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नोंदीनुसार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.१० वाजता फिर्यादी विजय वामन पाटील (वय ४७, व्यवसाय – शेती, रा. शिवाजी नगर, जामनेर; मूळ रा. सोनाळा, ता. जामनेर, जि. जळगाव) हे आपल्या आई सुशीलाबाई वामन पाटील यांच्यासह भुसावळ ते लोहार बसने प्रवास करीत होते. बस जामनेर बसस्थानकात थांबली असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत सुशीलाबाई यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. काही वेळाने पोत गळ्यात नसल्याचे लक्षात आल्यानंतर विजय पाटील यांनी याबाबत जामनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घटना बसस्थानक परिसरात घडल्याने पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तसेच तांत्रिक तपास आणि उपलब्ध माहितीच्या आधारे अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पोलिस नोंदीनुसार, या प्रकरणात अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ/९७१ प्रतापसिंग मथुरे, जामनेर पोलिस ठाणे करीत असून, तपास सुरू आहे.
अवघ्या काहीच दिवसात बाप्पा आपल्या घरी येणार आहेत यानिमित्त खास पोस्ट
गणपतीची मुर्ती कशी असावी ???* बरेच जण आता आपल्या घरी बाप्पाला आणण्यासाठी मूर्ती बुकिंग करायला जातात तर त्यामध्ये काय पाहिलं जावं याची थोडक्यात माहिती खालील प्रमाणे 👇👇👇👇👇👇 १) गणपती १ फुटांपेक्षा जास्त मोठी मुर्ती नसावी,२) मुर्ती एका व्यक्तीला सहज उचलुन नेता व आणता आली पाहिजे,३) सिंहासनावर किंवा लोडाला टेकुन बसलेल्या विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम.४) साप, गरुड, मासा, किंवा युद्ध करतांना व चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये,५) शिवपार्वती च्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये,कारण शिव पार्वती ची पुजा लिंगस्वरुपातच केली जाते शास्त्रात मुर्ती निषिद्ध आहे,६) गणेश मुर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणूनये,७) गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मुर्ती मधे देवत्व येत नाही,तोवर ती केवळ माती समजावी.विधीवत प्राणप्रतिष्ठा करावी,८) मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याअगोदर काही कारणास्तव मुर्ति भंग झाल्यास अजिबात घाबरू नये, त्या मुर्तीस दहीभात नैवेद्य दाखवून त्वरीत विसर्जन करावे, व दुसरी मुर्ती आणुण प्रतिष्ठापना करावी, मनात कोणतेही भय व शंका आणुनये.९) कुटुंबात किंवा नात्यात मृत्यु झाल्यास सुतकात घरातील व्यक्ती ऐवजी, शेजारी, मित्रमंडळी यांचे करवी पुजा नैवेद्य दाखवून घ्यावा,गणपती विसर्जनाची घाई करू नये,१०) गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद व मद्य मांसाहार अजिबात करू नये,११) गणपती ला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो, केवळ आंबट व तिखट पदार्थ नसावेत, दही+साखर+भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे,१२) कोकणात मालवण भागात गौरी सणाला गौराईला मटणाचा नैवेद्य दाखवला जातो, ही अत्यंत विकृत प्रथा आहे, गौरी ही साक्षात आदिशक्ती पार्वती आहे, पार्वतीला निषिद्ध पदार्थांचा नैवेद्य दाखवून राक्षसी उपासना करू नका, मुर्ख प्रथा बंद कराव्यात,१३) *विसर्जन मिरवणूक काढतांना टाळ मृदंग अभंग म्हणत परमात्म्याला निरोप द्या,**अश्लील नृत्य व गाणी वाजवून विकृत चाळे करू नका !* आणि वरील गोष्टी जर जमणार नसतील तर गणपती बसवून त्याची विटंबना करू नका 🙏 🌷 *गणपती बाप्पा मोरया*🌷
1 महिना साखर खाणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या थक्क करणारे फायदे
आजकाल आपल्या रोजच्या आहारात साखरेचे (Added Sugar) प्रमाण खूप वाढले आहे. चहा, कॉफी, मिठाई, बिस्किटे, केक, कोल्ड ड्रिंक्स आणि अनेक पॅकबंद अन्नपदार्थांमध्ये साखरेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. जर एखाद्या व्यक्तीने सलग 30 दिवस म्हणजेच 1 महिना साखर न खाण्याचा किंवा तिचे प्रमाण अत्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला, तर शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. सुरुवातीच्या काही दिवसांत गोड खाण्याची तीव्र इच्छा (Sugar Cravings) होऊ शकते, परंतु हळूहळू शरीर या बदलाशी जुळवून घेते. 1 महिना साखर सोडल्यास शरीरावर काय परिणाम होतात, ते खालीलप्रमाणे: Effects Of Quitting Sugar On Body : 1 महिना साखर सोडण्याचे प्रमुख फायदेगोड खाण्याची सवय कमी होते : सुरुवातीचे काही दिवस वारंवार गोड खावेसे वाटू शकते. परंतु हळूहळू शरीराला कमी साखरेची सवय होते. यानंतर फळांसारखे नैसर्गिक गोड पदार्थही पूर्वीपेक्षा जास्त गोड आणि चवदार वाटू लागतात. वजन कमी होण्यास मदत : गोड पदार्थांमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते. कोल्ड ड्रिंक्स, मिठाई, बेकरी प्रॉडक्ट्स आणि साखरेचे पेय बंद केल्याने शरीरात जाणाऱ्या अतिरिक्त कॅलरीज थांबतात, ज्यामुळे वजन वेगाने कमी होण्यास मदत होते. दिवसभर टिकून राहणारी ऊर्जा : जास्त गोड खाल्ल्यानंतर शरीरात अचानक एनर्जी वाढल्यासारखी वाटते, पण थोड्याच वेळात रक्तातील साखर वेगाने खाली येते आणि थकवा जाणवतो. साखर बंद केल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते आणि दिवसभर उत्साह टिकून राहतो. दातांचे आरोग्य सुधारते : साखरेमुळे तोंडात घातक बॅक्टेरिया वाढतात, जे आम्ल (Acid) तयार करून दातांना कीड (Cavity) लावतात. 1 महिना साखर बंद केल्याने दातांचे आरोग्य उत्तम राहते. त्वचेमध्ये सुधारणा आणि पिंपल्स कमी : जास्त साखरेच्या सेवनामुळे शरीरात दाह (Inflammation) वाढतो, ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. साखर सोडल्याने त्वचा अधिक ताजी आणि चमकदार दिसू लागते. आहाराच्या उत्तम सवयी : 1 महिना साखर न खाल्ल्याने आपल्याला कळून येते की आपण रोज किती अनावश्यक गोड खात होतो. यामुळे पॅकबंद पदार्थांवरील ‘Added Sugar’ चे लेबल वाचण्याची आणि संतुलित आहार घेण्याची चांगली सवय लागते. जर तुम्हाला मधुमेह (Diabetes) किंवा इतर आरोग्य समस्या असतील, तर आहारात असा कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.🩺आरोग्य हीच खरी संपत्ती!
पाळधी बायपासवर भीषण अपघात; कंटेनर पलटी, दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू
जळगाव : पाळधी ते तरसोद बायपास महामार्गावर बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरचा अचानक ताबा सुटल्याने कंटेनर रस्त्यावर पलटी झाला. याचवेळी दुचाकीवरून जाणारा दोनगाव बुद्रुक येथील एक तरुण कंटेनरखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर पाळधी बायपासमार्गे जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. काही क्षणांतच कंटेनर रस्त्यावर पलटी झाला. त्याचवेळी दुचाकीवरून जाणारा तरुण कंटेनरच्या खाली आल्याने हा भीषण अपघात घडला. अपघातात दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे बायपास मार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. कंटेनरचा ताबा नेमका कोणत्या कारणामुळे सुटला, तसेच अपघातामागे इतर कोणते कारण होते का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या दुर्दैवी घटनेत तरुणाचा मृत्यू झाल्याने दोनगाव बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. टीप : मृत तरुणाचे नाव अधिकृतरीत्या उपलब्ध नसल्याने ते नमूद केलेले नाही.
वाकडी परीसरात महिनाभरापासून पावसाचा खंड; मका, कपाशीसह पिके धोक्यात
वाकडी.ता.जामनेर.दि.०९/०९/२६वाकडी परिसरात जवळपास एकमहिन्यापासून पावसाने दडी मारल्याने बहरात आलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मक्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, कडधान्य पिकांचीही फुलगळ झाल्याने उत्पादनाची आशा मावळली आहे.कोरडवाहू शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा आधार असलेल्या कपाशी पिकालाही फुलपाती गळतीचा फटका बसत असून,आगामी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांची माती झाल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे, पावसाच्या प्रतीक्षेत झोकात आलेल्या मक्याला पाण्या अभावी दाणे भरले नाहीत, परिणामी दाणे विरहित कणसे आता जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, कडधान्य पिके बहरात आल्यानंतर फुलगळती झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे, कपाशीवरही फुलपाती गळती सुरू आहे,खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत,एक महिन्यांपासून पाऊस नाही, यावर शेतकऱ्यांच्या समस्यांचा परिस्थितीजन्य आवाज उठवून त्याचे वेळेवर निराकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत,शासनाने योग्य वेळी मदत केल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार नाही,अशी शेतकरी बांधव करीत आहेनिसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या पदरी दरवर्षी कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ येतो,मात्र, शेतमालाला योग्य भाव मिळाल्यास शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने जीवन जगता येईल,यंदा तर खरीप हंगाम हातचा गेल्याचे चित्र आहे, शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी,अशी चर्चा शेतकरी करीत आहेत.


