नि.पं.पाटील विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा
पळासखेडे मिराचे दि १७ जुलै २०२५(प्रतिनिधी ) नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे शाळेत मातृहृदयी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पवार हे होते. सर्वप्रथम कै.आचार्य बापूसो. गजाननराव गरुड व कै. अण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष , संस्था संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक जे.आर.पाटील यांनी कै. आचार्य बापूंना अभिप्रेत असलेला विद्यार्थी याबद्दल मत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षक एस. जे. सोनवणे यांनी मनोगतात संस्थेची स्थापना व व्याप्ती याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी अध्यक्ष भाषणात कै.आचार्य गजाननराव बापूंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक व सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील,चंद्रशेखर काळे,अब्दुल नबी तांबोळी,डी. पी .पाटील, संजू पवार,.शालिक पाटील,अशोक माळी,बळीराम माळी,लता पाटील हे मान्यवर उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्षाली प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक – हितेश वर्जन चव्हाण तृतीय क्रमाक – ओम संतोष चौधरी यांनी मिळविला. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 50 शालेय गणवेश वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने ,सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जी.पी. पाटील यांनी केले तर आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांची धडक कारवाई
हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई; ११ अजामीनपात्र वॉरंट तामील पाचोरा : आगामी गणेशोत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पडावा तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पाचोरा पोलिसांनी सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी पहाटे ३ ते सकाळी ६.३० वाजेपर्यंत पाचोरा शहर तसेच ग्रामीण हद्दीत व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ५ पोलीस अधिकारी, २५ पोलीस अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाचा सहभाग होता. या कारवाईदरम्यान पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, शरीर व मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल असलेले आरोपी तसेच अवैध धंद्यांशी संबंधित संशयितांच्या ठिकाणी अचानक तपासणी व झडती घेण्यात आली. ५५ रेकॉर्डवरील आरोपींवर कारवाई कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी अभिलेखावरील एकूण ५५ गुन्हेगारांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य अथवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणारी कृती करू नये, याबाबत त्यांना कडक समज देण्यात आली. हद्दपार गुन्हेगारावर गुन्हा दाखल पाचोरा शहरातून हद्दपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार मुख्तार शेख उर्फ धाड्या हा पोलिसांना हद्दीत आढळून आला. त्याच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली. ११ अजामीनपात्र वॉरंट तामील न्यायालयात प्रलंबित असलेल्या विविध प्रकरणांतील ११ अजामीनपात्र वॉरंट (NBW) पोलिसांनी यशस्वीरीत्या तामील केले. त्यामुळे प्रलंबित आरोपींवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. अवैध दारू विक्रीवर धाड पोलिसांनी प्रोहिबिशन रेड अंतर्गत अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्धही कारवाई केली. या कारवाईत २२ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोवंश वाहतूक व बेकायदेशीर शस्त्राविरुद्धही कारवाई मोहिमेदरम्यान अवैध गोवंश वाहतुकीप्रकरणी एक कारवाई, तर आर्म्स ॲक्टअंतर्गत बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी एक कारवाई करण्यात आली. पोलिसांचा स्पष्ट इशारा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या, कायदा हातात घेणाऱ्या तसेच अवैध धंदे चालविणाऱ्या असामाजिक घटकांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पाचोरा पोलिसांकडून देण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात अशाच प्रकारे धडक तपासणी, कॉम्बिंग ऑपरेशन आणि पोलिसांचे पेट्रोलिंग यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आठवणीतला ऑफलाइन काळ आणि आजचं ऑनलाइन जीवन…
जामनेर प्रतिनिधी | JBN महाराष्ट्र NEWS एक काळ असा होता, जेव्हा मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हतं; पण माणसांकडे एकमेकांसाठी भरपूर वेळ होता. आज सगळं काही ऑनलाइन झालंय, मात्र त्या जुन्या आठवणींची ऊब अजूनही मनाला सुखावते…एक काळ असा होता, जेव्हा माणूस खरंच ‘ऑफलाइन’ जगायचा. मोबाईल नव्हता, टीव्ही नव्हता, इंटरनेट नव्हतं आणि प्रत्येक क्षण सोशल मीडियावर दाखवण्याची गरजही नव्हती. घरात एखादा फोन असला तरी तो श्रीमंतांच्या घरातच असायचा. गरिबाच्या घरात साधेपणा होता; पण त्या साधेपणातही समाधान होतं.रात्र झाली की घरातला दिवा लावून सगळे एकत्र बसायचे. उन्हाळा असला की घराबाहेर मोकळ्या हवेत गप्पा रंगायच्या. अंगणात किंवा ओट्यावर बसून शेजारी-पाजारी सुख-दुःखाच्या गोष्टी सांगायचे. कुणाच्या घरात एखादा पाहुणा आला की तो फक्त त्या घराचा पाहुणा राहत नसे, तर संपूर्ण गल्लीचा पाहुणा व्हायचा.बालपण म्हणजे खेळ, माती आणि मित्रांची संगत…त्या काळात मनोरंजनासाठी मोबाईलची गरज नव्हती. कबड्डी, खो-खो, लगोरी, चोर-पोलीस, डब्बा ऐसपैस, लंगडी असे कितीतरी खेळ मुलं मनापासून खेळायची. सकाळी घरातून बाहेर पडलेलं मूल संध्याकाळी आईने आवाज दिल्यावरच घरी परतायचं.कधी पतंग उडवायची, कधी सायकलवरून गावभर फिरायचं, तर कधी मित्रांसोबत मैदानात तासन्तास खेळायचं. पडल्यावर खरचटलं तरी पुन्हा उठून खेळायला सुरुवात व्हायची. त्या खेळांमध्ये शरीराची ताकद वाढायची आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे मैत्रीची नाती घट्ट व्हायची.सण म्हणजे आनंदाचा खरा उत्सव…दिवाळी, पाडवा, भाऊबीज, पोळा अशा सणांची वर्षभर आतुरतेने वाट पाहिली जायची. दिवाळीत वर्षातून एकदा फटाके फोडण्याची मजा काही वेगळीच होती. मामाच्या गावाला जाणं, नातेवाईकांना भेटणं, एकत्र फराळ करणं आणि घराघरात जाऊन शुभेच्छा देणं—हा सगळा आनंद प्रत्यक्ष अनुभवता यायचा.आज एका क्लिकवर शुभेच्छा पाठवता येतात; पण पूर्वी शुभेच्छा देण्यासाठी माणसं स्वतःच्या पायाने एकमेकांच्या घरी जायची. त्या भेटीतला आनंद, आपुलकी आणि जिव्हाळा वेगळाच होता.लग्न असो वा छोटासा आनंद… सगळे सहभागी व्हायचेगावात कुणाच्या घरात लग्न असेल तर पंधरा दिवस आधीपासूनच तयारी सुरू व्हायची. घरातील मंडळींबरोबर शेजारी-पाजारीही कामाला लागायचे. कुणी स्वयंपाकात मदत करायचं, कुणी पाहुण्यांची व्यवस्था करायचं, तर कुणी इतर जबाबदाऱ्या सांभाळायचं.माणसांमध्ये टिकून होती ती आपुलकी, जिव्हाळा आणि एकमेकांसाठी उभं राहण्याची भावना.पण काळ बदलला…ऑफलाइन जग ऑनलाइन झालं…आज मोबाईलच्या एका क्लिकवर संपूर्ण जग आपल्या हातात आलं आहे. बाजारात जाण्यापासून ते खरेदी करण्यापर्यंत, शिक्षणापासून मनोरंजनापर्यंत आणि नातेवाईकांशी संवाद साधण्यापासून शुभेच्छा देण्यापर्यंत सगळं काही ऑनलाइन झालं आहे.आज सेल्फी, स्टेटस, रील्स, व्हिडिओ कॉल आणि सोशल मीडिया हे जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. आपण दिवसभर ऑनलाइन असतो; पण कधी कधी आपल्या जवळच्या माणसांसाठी मात्र वेळ नसतो.पूर्वी एखाद्या मित्राला भेटण्यासाठी आपण त्याच्या घरी जायचो. आज त्याच्या ऑनलाइन असण्याचा हिरवा दिवा पाहूनच समाधान मानतो. पूर्वी सणाच्या दिवशी घराघरात भेटी व्हायच्या; आज शुभेच्छांचा एक मेसेज काही सेकंदांत शेकडो लोकांपर्यंत पोहोचतो.तंत्रज्ञानाने जीवन नक्कीच सोपं केलं आहे. ऑनलाइन जगामुळे वेळ वाचला, अंतर कमी झालं आणि अनेक सुविधा आपल्या हाताशी आल्या. पण या सगळ्या सुविधांच्या गर्दीत आपण माणसांमधला संवाद आणि नात्यांमधली उब हरवू नये, हेही तितकंच महत्त्वाचं आहे.थोडं पुन्हा ‘ऑफलाइन’ जगूया…जुना काळ परत येणार नाही. ते दिवस, ते खेळ, ती अंगणातली गप्पा, मित्रांची टोळी आणि सणांची लगबग पुन्हा तशीच अनुभवता येणार नाही. पण त्या काळातील साधेपणा, माणुसकी, आपुलकी आणि नात्यांची किंमत आपण आजही जपू शकतो.कधीतरी मोबाईल बाजूला ठेवूया. कुटुंबासोबत बसूया. मित्रांना प्रत्यक्ष भेटूया. मुलांना मैदानात खेळू देऊया. सण फक्त स्टेटसवर न ठेवता तो आपल्या माणसांसोबत साजरा करूया.कारण शेवटी आयुष्याची खरी आठवण मोबाईलच्या गॅलरीत नसते; ती आपल्या मनात जपलेली असते.ऑनलाइन जगणं गरजेचं आहे, पण कधीतरी थोडं ‘ऑफलाइन’ जगणंही तितकंच आवश्यक आहे…!
🌿 प्रसिद्धी हवीच… पण कोणत्या मार्गाने?
समाजात प्रत्येक व्यक्तीला आपली एक वेगळी ओळख निर्माण व्हावी, लोकांनी आपल्याला ओळखावे, आपल्या कामाची दखल घ्यावी आणि आपल्याला प्रसिद्धी मिळावी, अशी इच्छा असणे स्वाभाविक आहे. प्रसिद्धीची ही इच्छा चुकीची नाही; मात्र ती प्रसिद्धी मिळवण्यासाठी आपण कोणता मार्ग निवडतो, हे सर्वस्वी आपल्या हातात असते. प्रसिद्धी मिळवण्याचे दोन मार्ग असतात—एक चांगल्या कर्माचा आणि दुसरा वाईट कर्माचा. एखादी व्यक्ती प्रामाणिकपणे काम करते, समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करते, गरजूंच्या मदतीला धावून जाते, अन्यायाविरुद्ध आवाज उठवते, समाजाला योग्य दिशा दाखवते आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करते, तेव्हा मिळणारी प्रसिद्धी ही तिच्या चांगल्या कर्माची पावती असते. अशी प्रसिद्धी मिळवण्यासाठी कदाचित वेळ लागतो, संघर्ष करावा लागतो; पण तिच्यामागे समाधान, आदर आणि विश्वास असतो. याउलट काही जण प्रसिद्धी मिळवण्यासाठी चुकीचे मार्ग स्वीकारतात. समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेतात, खोटी माहिती पसरवतात, लोकांना भ्रमित करतात किंवा त्यांच्या भावनांशी खेळतात. काही काळासाठी अशा व्यक्तींना प्रसिद्धी मिळू शकते; लोकांचे लक्षही त्यांच्याकडे वेधले जाऊ शकते. पण लोकांचे लक्ष वेधून घेणे आणि लोकांच्या मनात आदर निर्माण करणे यात खूप मोठा फरक असतो. आजच्या काळात आपण आजूबाजूला पाहिले तर हे चित्र स्पष्टपणे दिसते. कुणी आपल्या चांगल्या विचारांनी समाजाला जागृत करण्याचे काम करत आहे, तर कुणी समाजाला अंधारात ठेवून त्याच अज्ञानाचा फायदा घेत आहे. कुणी लोकांना सत्याचा मार्ग दाखवत आहे, तर कुणी स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांची दिशाभूल करत आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे—फसवणूक करून मिळवलेली प्रसिद्धी मनाला कधीच खरे समाधान देऊ शकत नाही. कारण पैसा, प्रसिद्धी आणि लोकांचे कौतुक काही काळासाठी मिळू शकते; पण मनःशांती आणि समाधान विकत घेता येत नाही. चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या यशाच्या मागे कायम भीती, अस्वस्थता आणि सत्य समोर येण्याची चिंता असते. म्हणून प्रसिद्धी मिळवायचीच असेल, तर ती अशी मिळवा की तुमच्या अनुपस्थितीतही लोक तुमच्याबद्दल चांगले बोलतील. तुमचे नाव ऐकल्यावर लोकांच्या मनात आदर निर्माण होईल. तुमच्या कामामुळे एखाद्याचे जीवन बदलले असेल, एखाद्याला मदत मिळाली असेल किंवा समाजाला योग्य दिशा मिळाली असेल, तर त्यापेक्षा मोठी प्रसिद्धी दुसरी कोणतीही नाही. कारण प्रसिद्धी किती मिळाली यापेक्षा ती कोणत्या कर्मातून मिळाली, हे अधिक महत्त्वाचे आहे. आज आपण काय कमावतोय यापेक्षा उद्या लोक आपल्याला कशासाठी लक्षात ठेवतील, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. शेवटी एवढेच… चांगल्या कर्माने मिळालेली प्रसिद्धी माणसाला उंचावते,तर चुकीच्या मार्गाने मिळालेली प्रसिद्धी माणसाला आतून पोखरत जाते. म्हणून मार्ग निवडताना प्रसिद्धीचा विचार करण्यापेक्षा आपल्या कर्माचा विचार करा.कारण प्रसिद्धी क्षणिक असू शकते, पण चांगल्या कर्माची छाप कायमची असते. ✍🏻 एकमन संतोष भिसे
🚨 जामनेर शहरात वाहतूक शिस्तीला वेग; PI निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा कडक बंदोबस्त
चौकाचौकात पोलिसांची नजर; ट्रिपल सीट, विनालायसन्स, विनानंबर प्लेट वाहनचालकांवर कारवाईचा बडगा जामनेर प्रतिनिधी | JBN महाराष्ट्र NEWS शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी जामनेर पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख चौक तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे.शहरातील वाढती वाहनांची वर्दळ, चौकांमध्ये होणारी गर्दी आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ट्रिपल सीट वाहनचालक, विनालायसन्स वाहन चालविणारे, विनानंबर प्लेट वाहने तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर पोलिसांची करडी नजर आहे.विशेषतः दुचाकीवरून नियमबाह्य पद्धतीने प्रवास करणाऱ्या तरुणांवर पोलिसांकडून कारवाई केली जात असून, वाहन चालवताना आवश्यक कागदपत्रे व वैध परवाना जवळ बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.चौकाचौकात पोलिसांची उपस्थितीजामनेर शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलीस कर्मचारी तैनात करून नियमभंग करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे.“वाहतूक नियम पाळा, सुरक्षित प्रवास करा” हा संदेश देत पोलिसांकडून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पोलिसांच्या या मोहिमेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असून, नियम पाळणाऱ्या नागरिकांकडूनही या कारवाईचे स्वागत होत आहे.PI निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईला वेगपोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलिसांनी शहरातील वाहतूक शिस्तीला प्राधान्य दिले आहे. नियम मोडणाऱ्यांना कोणतीही सवलत न देता कायद्यानुसार कारवाई करण्याची भूमिका पोलिसांनी घेतल्याचे दिसून येत आहे.शहरात शिस्त हवी असेल तर नियम पाळावेच लागतील, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून जामनेर पोलिसांनी दिला आहे. आगामी काळातही वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई सुरू राहण्याची शक्यता आहे.
जामनेरमध्ये पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी रंगतो पारंपरिक ‘बारा गाड्या’ उत्सव
क्षत्रिय माळी समाजाच्या वतीने सालाबादप्रमाणे आयोजन; उत्सव पाहण्यासाठी समाजबांधवांची मोठी गर्दी जामनेर : शेतकरी बांधवांचा पारंपरिक आणि श्रद्धेचा सण असलेल्या बैलपोळ्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी जामनेर शहरात दरवर्षीप्रमाणे क्षत्रिय माळी समाजाच्या वतीने पारंपरिक ‘बारा गाड्या’ उत्सव साजरा केला जातो. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या उत्सवाला जामनेर शहरासह परिसरातील नागरिक आणि समाजबांधवांचा मोठा प्रतिसाद मिळतो. ‘बारा गाड्या’ हा उत्सव जामनेरच्या पारंपरिक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग मानला जातो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या या पारंपरिक उत्सवाची नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता असते. उत्सवाच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. हा पारंपरिक सोहळा पाहण्यासाठी क्षत्रिय माळी समाजातील समाजबांधवांसह विविध समाजातील नागरिक, महिला, पुरुष, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्यामुळे उत्सवाच्या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते. पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या या उत्सवात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. ‘बारा गाड्या’ उत्सवाच्या माध्यमातून समाजाची एकजूट, श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम केले जाते. पूर्वजांपासून चालत आलेली ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचावी आणि नव्या पिढीला आपल्या पारंपरिक संस्कृतीची ओळख व्हावी, यासाठी या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्सवाच्या आयोजनासाठी क्षत्रिय माळी समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांकडून आवश्यक नियोजन व तयारी केली जाते. उत्सव शांततेत, शिस्तीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठीही आवश्यक खबरदारी घेतली जाते. पोळ्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी जामनेरमध्ये साजरा होणारा हा पारंपरिक ‘बारा गाड्या’ उत्सव नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविणाऱ्या या उत्सवासाठी समाजबांधवांसह नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळते.
जामनेर पोलिसांचा वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना दणका!
PI निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली कडक कारवाई; कर्कश आवाजाच्या बुलेट, ट्रिपल सीट व विनालायसन्स वाहनचालकांवर नजर जामनेर : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासोबतच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आळा घालण्यासाठी जामनेर पोलिसांनी कडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक निवृत्ती भिमराव बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट, ट्रिपल सीट प्रवास तसेच विनालायसन्स वाहन चालविणाऱ्या अल्पवयीनांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. पोलिसांकडून वाहनचालकांची तपासणी करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे. काही वाहनांमध्ये मॉडिफाइड सायलेन्सरचा वापर करून मोठ्या आवाजात वाहने चालविली जात असल्याचे निदर्शनास येते. अशा प्रकारच्या कर्कश आवाजामुळे नागरिकांना त्रास होण्यासोबतच वाहतूक सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच ट्रिपल सीट प्रवास आणि अल्पवयीनांकडून वाहन चालविण्यामुळे अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. “वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई सुरूच राहील,” असा स्पष्ट संदेश जामनेर पोलिसांकडून देण्यात आला आहे. जामनेर पोलिसांच्या या कारवाईमुळे वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांमध्ये धास्ती निर्माण झाली असून, नागरिकांकडून या मोहिमेचे स्वागत केले जात आहे. वाहतूक नियम पाळा… सुरक्षित प्रवास करा!
भुसावळमध्ये तरुणाचा खून; १७ वर्षीय अल्पवयीन संशयित ताब्यात
पाटील मळा परिसरातील घटनेने खळबळ; आईशी बोलण्याच्या कारणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील पाटील मळा परिसरात गुरुवारी, १० सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास एका तरुणावर हल्ला करून त्याचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत तुषार गोविंदा सोनवणे (वय ३५) यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, तुषार सोनवणे हे एका महिलेच्या आईशी बोलत असल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर हल्ल्यात झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत १७ वर्षीय अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. अल्पवयीन असल्याने त्याची ओळख कायद्यानुसार जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, या हत्येमागील नेमके कारण काय होते, वाद नेमका कशामुळे झाला आणि हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम काय आहे, याबाबत पोलीस तपास सुरू आहे. आईशी बोलण्याच्या कारणावरून वाद झाल्याची माहिती ही प्राथमिक स्वरूपाची असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे पाटील मळा परिसरासह भुसावळ शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
ज्ञानगंगा विद्यालयात विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
जामनेर येथील ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दि.०९-०९-२०२६ रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आरबीएसके टीम द्वारे सर्व शालेय इ.५ वी ते इ.१२ वी च्या सर्व उपस्थित विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यावेळी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी सर्व डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.त्यावेळी डॉ. राजेश सोनवणे(तालुका वैदयकीय अधिकारी जामनेर यांनी सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सर्व टीमच्या वतीने करण्यात आली.त्यावेळी डॉ. राजेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.डॉ.जितेंद्र वानखेडे,डॉ.अनिता राठोड, प्रियंका वानखेडे, हर्षा गवळे, या सर्व टीमने एकूण ७७६ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून विद्यार्थ्यांना मेडिसिन चे वाटप करण्यात आले.त्यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री राजेंद्र सोनवणे यांनी मार्गदर्शन करताना सर्व विद्यार्थ्यांनी “आरोग्य हीच धनसंपदा” या नुसार स्वतःचे आरोग्य सांभाळावे व डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे आपली दैनंदिन दिनचर्या सुनिश्चित करावी असे आव्हान केले.सदर आरोग्य तपासणीस शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.
गोरनाळे येथे बैल पोळ्याचा मान उखर्डू काशिनाथ पाटील यांच्या बैलास
पोलीस पाटील गोपाल मुळे यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने पूजा; ग्रामस्थांची मोठी उपस्थिती वाकडी, ता. जामनेर, दि. ११ सप्टेंबर २०२६ :शेतकरी बांधवांचा पारंपरिक आणि श्रद्धेचा सण असलेल्या बैल पोळ्यानिमित्त गोरनाळे येथे सालाबादप्रमाणे यंदाही उत्साहात बैल पोळा साजरा करण्यात आला. यावेळी श्री. उखर्डू काशिनाथ पाटील यांच्या बैलास पोळ्याचा मान देण्यात आला. गोरनाळे गावचे पोलीस पाटील श्री. गोपाल सुकदेव मुळे यांच्या हस्ते श्री. उखर्डू काशिनाथ पाटील यांच्या बैलाची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. त्यानंतर बैलास पोळ्याचा मान देण्यात आला. यावेळी मा. सरपंच श्री. आत्माराम दयाराम पाटील, मा. तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री. दिनकर नीना कोळी, PSI महाजन साहेब, पोलीस मुकेश पाटील यांच्यासह गावातील नागरिक, शेतकरी व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोळ्यानिमित्त मानाच्या बैलाला आकर्षक सजावट करण्यात आली होती. पारंपरिक पद्धतीने पूजा, सणाचा उत्साह आणि ग्रामस्थांची उपस्थिती यामुळे गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्याच्या जीवनात बैलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्षभर शेतीच्या कामात शेतकऱ्याला साथ देणाऱ्या या मुक्या जीवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा म्हणून बैल पोळा साजरा केला जातो. या सणाच्या माध्यमातून शेतकरी आणि बैल यांच्यातील अतूट नाते अधोरेखित होते. गोरनाळे येथे वर्षानुवर्षे जपली जाणारी ही परंपरा पुढील पिढ्यांनीही कायम ठेवावी आणि आपल्या ग्रामीण संस्कृती व परंपरांचा अभिमान बाळगावा, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.
उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे अत्याधुनिक ३०० एम.ए. क्ष-किरण यंत्र दाखल!
जामनेर परिसरातील गोरगरीब रुग्णांना मिळणार अद्ययावत आरोग्य सुविधा; इतर शहरांमध्ये जाण्याची धावपळ होणार कमी जामनेर (प्रतिनिधी) : जामनेर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल पडले आहे. उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे नवीन ३०० एम.ए. (300 mA) क्ष-किरण (X-Ray) यंत्र दाखल झाले असून, त्यामुळे परिसरातील रुग्णांना क्ष-किरण तपासणीची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल सांगळे यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे क्ष-किरण यंत्र चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयामार्फत उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे हस्तांतरित करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र चौधरी, एन.क्यू.ए.एस. (NQAS) नोडल अधिकारी डॉ. स्वप्नील कळसकर तसेच डॉ. दीपक जाधव यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. यंत्राच्या मंजुरीपासून ते हस्तांतरणापर्यंत सातत्याने पाठपुरावा करणारे उपजिल्हा रुग्णालय, जामनेरचे क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी श्री. राहुल कोडवते तसेच उपजिल्हा रुग्णालयातील संपूर्ण कर्मचारीवर्गाचेही अभिनंदन होत आहे. गोरगरीब रुग्णांना मोठा फायदा या ३०० एम.ए. क्ष-किरण यंत्रामुळे जामनेर व परिसरातील रुग्णांना आवश्यक क्ष-किरण तपासणीची सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना तपासणीसाठी इतर शहरांमध्ये किंवा खासगी केंद्रांवर जाण्याची गरज कमी होणार असून, त्यांचा वेळ व प्रवासाचा खर्चही वाचण्यास मदत होईल. अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर रुग्णांना स्थानिक पातळीवरच आवश्यक निदानात्मक तपासणीची सुविधा मिळणार असल्याने जामनेरच्या आरोग्य व्यवस्थेला यामुळे आणखी बळकटी मिळणार आहे. अधिकृत अभियंत्यांकडून इन्स्टॉलेशननंतर सुविधा कार्यान्वित सदर क्ष-किरण यंत्र अधिकृत अभियंत्यांमार्फत योग्य पद्धतीने इन्स्टॉल व कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यानंतर ही सुविधा रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल. लवकरच भव्य लोकार्पण सोहळा यंत्राचे इन्स्टॉलेशन व कार्यान्वित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माननीय नामदार श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते या नवीन सुविधेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय परिवाराकडून देण्यात आली आहे. जामनेर परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या दृष्टीने ही सुविधा निश्चितच महत्त्वाची ठरणार असून, उपजिल्हा रुग्णालय, जामनेरच्या आरोग्यसेवेला यामुळे नवी ताकद मिळणार आहे. – उपजिल्हा रुग्णालय परिवार, जामनेर


