नि.पं.पाटील विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा
पळासखेडे मिराचे दि १७ जुलै २०२५(प्रतिनिधी ) नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे शाळेत मातृहृदयी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पवार हे होते. सर्वप्रथम कै.आचार्य बापूसो. गजाननराव गरुड व कै. अण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष , संस्था संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक जे.आर.पाटील यांनी कै. आचार्य बापूंना अभिप्रेत असलेला विद्यार्थी याबद्दल मत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षक एस. जे. सोनवणे यांनी मनोगतात संस्थेची स्थापना व व्याप्ती याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी अध्यक्ष भाषणात कै.आचार्य गजाननराव बापूंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक व सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील,चंद्रशेखर काळे,अब्दुल नबी तांबोळी,डी. पी .पाटील, संजू पवार,.शालिक पाटील,अशोक माळी,बळीराम माळी,लता पाटील हे मान्यवर उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्षाली प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक – हितेश वर्जन चव्हाण तृतीय क्रमाक – ओम संतोष चौधरी यांनी मिळविला. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 50 शालेय गणवेश वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने ,सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जी.पी. पाटील यांनी केले तर आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले.
वाकडी केंद्रस्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेत उदय शिंदे प्रथम
वाकडी, दि. ४ सप्टेंबर : जि.प. केंद्रशाळा वाकडी येथे शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी केंद्रस्तरीय स्पेलिंग बी (स्पेलिंग पाठांतर) स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वाकडी केंद्रातील एकूण अकरा शाळांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची व स्मरणशक्तीची कसोटी पाहणारी ही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. मोठ्या गटातून जि.प. शाळा चिंचखेडे ता. वा. येथील इयत्ता पाचवीचा अत्यंत गुणी व हुशार विद्यार्थी उदय सुरेश शिंदे याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. उदयच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशामध्ये त्याचे वर्गशिक्षक श्री. सोपान किसन पारधी सर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. तसेच जि.प. शाळा चिंचखेडे येथील सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती तसेच संपूर्ण गावातून उदयचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी केंद्रसमन्वयक श्री. संदीप पाटील सर, केंद्रप्रमुख श्री. नामदेव पाटोळे सर तसेच वाकडी केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते. स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून वाकडी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री. चौधरी सर यांनी उत्कृष्टपणे काम पाहिले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणाऱ्या अशा स्पर्धांमुळे त्यांच्यातील आत्मविश्वास, स्मरणशक्ती आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित होत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
जामनेर : एकुलती गावात दारूबंदीसाठी महिलांचा आक्रमक पवित्रा; पोलिस ठाण्यावर मोर्चाचा इशारा
जामनेर | प्रतिनिधीजामनेर तालुक्यातील एकुलती गावात अवैध दारूविक्रीविरोधात महिलांनी आक्रमक भूमिका घेतली असून, गावात दारूबंदी लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अवैध दारूविक्रीमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.गावातील काही भागात अवैध पद्धतीने दारूविक्री सुरू असल्याने त्याचा मोठा परिणाम कुटुंबांवर आणि विशेषतः महिलांवर होत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. घरातील वस्तू व धान्य विकून दारू पिण्याचे प्रकार तसेच तरुणांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेमुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.दारूविक्री बंद करण्याबाबत यापूर्वीही संबंधित यंत्रणेकडे अर्ज व तक्रारी करण्यात आल्याचे महिलांनी सांगितले. मात्र, अपेक्षित कारवाई होत नसल्याने महिलांनी आता थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.महिलांच्या म्हणण्यानुसार, पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दारूबंदीबाबत कारवाई करण्यासाठी दोन दिवसांची अल्टिमेटम देण्यात आली आहे. या कालावधीत गावातील अवैध दारूविक्री बंद न झाल्यास पोलिस ठाण्यासमोर साडी-चोळी व बांगड्यांचा भेट देत आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.यासोबतच शेंदुर्णी क्षेत्रातील ‘सुतार’ नामक कर्मचाऱ्याच्या पाठबळाने हा अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप महिलांनी केला असून, संबंधित कर्मचाऱ्याची तातडीने पोलिस मुख्यालयात बदली करण्याची मागणीही करण्यात आली आहे.दरम्यान, महिलांच्या या आक्रमक भूमिकेमुळे गावातील दारूबंदीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिस प्रशासन या तक्रारींची दखल घेऊन अवैध दारूविक्रीविरोधात काय कारवाई करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
जामनेरच्या बाजारपेठेत ६५ वर्षीय दुकानदारावर हल्ला; लोखंडी फायटरने कपाळावर वार
जुन्या भांडणाचा वाद पुन्हा उफाळला; सहा जणांविरुद्ध जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल* *फायटर, लाठी-काठीने मारहाणीचा आरोप: आरोपी अद्याप मोकाट* *Anchor :* जुन्या भांडणाच्या कारणातून वाद उफाळून येत ६५ वर्षीय किराणा दुकानदारावर लोखंडी फायटर, लाठी-काठीने हल्ला केल्याची घटना जामनेर शहरातील बाजारपेठ परिसरात घडली. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमराव रामजी जाधव हे जामनेर शहरातील बाजारपेठ परिसरात किराणा दुकान चालवतात. २९ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून संशयित आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला. यावेळी संदीप भिमलाल पवार याने लोखंडी फायटरने जाधव यांच्या कपाळावर आणि डाव्या बरगडीवर वार केल्याचा आरोप आहे. तसेच इतर आरोपींनी शिवीगाळ करत लाठी-काठीने मारहाण करून दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी संदीप पवारसह सहा जणांविरुद्ध दंग्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या कोणालाही अटक झालेली नाही. पुढील तपास जामनेर पोलीस करीत आहेत.
सकाळची नवी सुरुवात… नव्या आशा, नवी स्वप्ने!
प्रत्येक सकाळ ही आपल्या आयुष्यातील एक नवीन सुरुवात असते. कालचा दिवस कितीही कठीण गेला असला, कितीही अडचणी आल्या असल्या किंवा काही चुका झाल्या असल्या, तरी सकाळचा उगवता सूर्य आपल्याला पुन्हा एकदा नव्या उमेदीने उभे राहण्याची प्रेरणा देतो. कालच्या चुका हा अनुभव असतो, तर आजचा दिवस ही स्वतःला सिद्ध करण्याची संधी असते.सकाळच्या प्रसन्न वातावरणात मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते. पक्ष्यांचा किलबिलाट, उगवत्या सूर्याची कोवळी किरणे आणि निसर्गातील शांतता आपल्याला सकारात्मक विचार करण्यास शिकवते. म्हणूनच दिवसाची सुरुवात जर चांगल्या विचारांनी, सकारात्मक दृष्टिकोनाने आणि आत्मविश्वासाने केली, तर दिवसभरातील प्रत्येक कामात उत्साह आणि आनंद जाणवतो.आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी निराश होऊ नका. प्रत्येक अडचणीमागे एक शिकवण असते आणि प्रत्येक नवीन दिवस आपल्याला काहीतरी चांगले करण्याची संधी देतो. काल काय घडले यापेक्षा आज आपण काय करणार आहोत, हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे भूतकाळातील चुका विसरून भविष्याची सुंदर स्वप्ने मनात ठेवत वर्तमानातील प्रत्येक क्षण आनंदाने जगायला हवा.सकारात्मकतेचा धरूया हात,नव्या ध्येयाची करूया सुरुवात!हसत-खेळत जगा प्रत्येक क्षण,प्रसन्न राहो सदैव तुमचे तन-मन.आपल्या मनात चांगले विचार असतील, मेहनत करण्याची तयारी असेल आणि स्वतःवर विश्वास असेल, तर कोणतेही ध्येय अशक्य नाही. म्हणून आजच्या या नव्या दिवसाची सुरुवात नवीन आशा, नवीन विचार आणि नवीन स्वप्नांसह करूया.🌞 आजचा उगवलेला दिवस तुमच्या आयुष्यात आनंद, समाधान, उत्तम आरोग्य, नवीन संधी आणि भरभरून यश घेऊन येवो. प्रत्येक क्षण आनंदाने जगा आणि प्रत्येक संधीचे सोने करा.🌺 शुभ सकाळ!आपला आजचा दिवस आनंदमय, उत्साही आणि यशस्वी जावो!
जामठीत अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील वर्तनाचा आरोप; संतप्त जमावाचा उद्रेक, शिक्षकाची कार पेटवली
पोलिसांवर दगडफेक; अश्रुधुराच्या नळकांड्या व सौम्य लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात बोदवड | प्रतिनिधी बोदवड तालुक्यातील जामठी येथे अल्पवयीन विद्यार्थिनीशी खासगी क्लासच्या शिक्षकाने अश्लील वर्तन केल्याच्या आरोपावरून मोठा तणाव निर्माण झाला. या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर संतप्त नागरिकांनी संशयित शिक्षकाच्या घराकडे धाव घेत त्याची कार पेटवून दिली. त्यानंतर जमाव आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला. काही नागरिकांकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक झाल्याने परिस्थिती चिघळली. अखेर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत तसेच सौम्य लाठीचार्ज करत जमावाला पांगवले. उपलब्ध माहितीनुसार, जामठी येथील एक खासगी शिक्षक बोदवड परिसरात पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणी वर्ग घेत असल्याचे सांगितले जाते. संबंधित शिक्षकावर एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याचा तसेच तिच्याकडे अयोग्य मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. घटनेदरम्यान संबंधित शिक्षक विद्यार्थिनीसोबत कारमधून जात असल्याचे तिच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आल्याची माहिती काही वृत्तांतून समोर आली आहे. यानंतर नातेवाईकांनी त्याची विचारणा केली. या प्रकाराची माहिती गावात पसरल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. दरम्यान, संशयित शिक्षकाच्या जामठी येथील घराजवळ नागरिकांचा मोठा जमाव जमला. संतप्त जमावाने त्याच्या कारला आग लावली. काही वाहनांचे नुकसान झाल्याचीही प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांवर दगडफेक; अश्रुधुराचा वापर घटनेची माहिती मिळताच बोदवड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयित शिक्षकाला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणले. मात्र, जमावातील काही नागरिकांनी संशयिताला पोलिसांच्या ताब्यात न देता आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. यावरून पोलिस आणि जमावामध्ये तणाव निर्माण झाला. काही नागरिकांकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि सौम्य लाठीचार्ज करत जमावाला पांगवले. संशयित शिक्षकावर POCSO अंतर्गत कारवाई अल्पवयीन विद्यार्थिनीशी संबंधित प्रकरण असल्याने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. उपलब्ध वृत्तांनुसार, संशयित शिक्षकाविरोधात POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या प्रकरणातील सर्व आरोपांची नेमकी सत्यता तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जामठी येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. गावात सध्या पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.
जळगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा छापा; ४.२४ लाखांचा ट्रॅक्टर-ट्रॉलीसह मुद्देमाल जप्तचंदूअण्णा नगर स्टॉपजवळ कारवाई; एक ब्रास वाळूसह स्वराज ट्रॅक्टर ताब्यात, चालक फरार
जळगाव | प्रतिनिधी : जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. चंदूअण्णा नगर स्टॉपजवळ करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी एक ब्रास अवैध गौण खनिज वाळूसह स्वराज ट्रॅक्टर-ट्रॉली असा एकूण ४ लाख २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुका पोलिसांना परिसरात अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित परिसरात कारवाई करत संशयित वाहनाची तपासणी केली. यावेळी स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉलीमधून वाळूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.पोलिसांनी वाहनाची तपासणी करून आवश्यक कागदपत्रांची चौकशी केली असता वाळू वाहतुकीबाबत समाधानकारक माहिती अथवा आवश्यक परवानगी उपलब्ध नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टर-ट्रॉलीसह एक ब्रास वाळू असा सुमारे ४.२४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.दरम्यान, कारवाईदरम्यान संबंधित वाहनाचा चालक पसार झाल्याची माहिती आहे. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तसेच पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.जळगाव परिसरात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, अशा प्रकारच्या कारवायांमुळे अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांना मोठा इशारा मिळाला आहे.🔻 पुढील तपास जळगाव तालुका पोलीस करीत आहेत.
मसाजच्या नावाखाली भलताच प्रकार : जळगावातील ‘स्पा-९९’ वर दामिनी पथकाचा छापा
जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहरातील रिंगरोड परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली संशयास्पद प्रकार सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांच्या दामिनी पथकाने ‘स्पा-९९’ येथे छापा टाकल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मसाज सेंटरमध्ये नियमबाह्य प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रिंगरोड परिसरातील संबंधित स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेगळ्याच प्रकारचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर दामिनी पथकाने अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी स्पामधील परिस्थितीची पाहणी करून संबंधित व्यक्तींची चौकशी केली.पोलिसांच्या अचानक कारवाईमुळे स्पामध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळी मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील चौकशी सुरू केली असून, संबंधितांकडून नियमांचे उल्लंघन झाले आहे का, तसेच मसाज सेंटरच्या आडून अनधिकृत प्रकार सुरू होता का, याचा तपास केला जात आहे.दरम्यान, शहरातील विविध स्पा आणि मसाज सेंटरमध्ये परवानगीच्या नियमांचे पालन केले जाते की नाही, याची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणात पोलिसांच्या तपासानंतर नेमकी काय कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.पोलिस तपासानंतरच या प्रकरणातील संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार असून, संबंधितांवर कोणती कायदेशीर कारवाई करण्यात आली याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
तरुणावर चाकू हल्ला; हल्लेखोराला जामनेर पोलिसांनी घेतले ताब्यात
घटनेनंतर जामनेर पोलीस स्टेशनबाहेर नागरिकांची मोठी गर्दी; गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न जामनेर | प्रतिनिधी जामनेर शहरात एका तरुणावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडल्याने शहरात काही काळ खळबळ उडाली. हल्ल्याची माहिती मिळताच संबंधित तरुणाचे नातेवाईक, मित्र तसेच स्थानिक नागरिकांनी जामनेर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी तसेच पोलीस ठाण्याच्या परिसरात बंदोबस्त वाढवला. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात तरुण जखमी झाल्याचे समजते. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली. संतप्त नागरिकांमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. दरम्यान, चाकू हल्ल्याच्या घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. प्राथमिक तपासानंतर हल्ला करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. संशयिताची चौकशी सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांची गर्दी वाढत असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती आणखी चिघळू न देता नियंत्रणात आणण्यात आली. या घटनेमुळे जामनेर शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून पुढील तपासात हल्ल्यामागील कारण, घटनेतील इतर व्यक्तींचा सहभाग आणि हल्ल्याचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
प्रेम आणि माझा दृष्टिकोन
✍️ विशेष लेख आयुष्य जगत असताना एकदा तरी आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो. प्रेमात पडल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर अनेकदा फक्त ती व्यक्ती असते. त्या वेळी तिची जात, धर्म, वय, पंथ यांचा विचार मनात येत नाही. कारण खरं प्रेम हे जात-धर्म पाहून होत नाही; ते फक्त मन पाहून होतं. म्हणूनच या पवित्र भावनेचा आदर राखणं आवश्यक आहे. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि आपल्या भावना एकमेकांसमोर व्यक्त करतात, तो क्षण खरोखरच सुंदर असतो. मुळात प्रेम म्हणजे काय? तर प्रेम म्हणजे समाधान. या जगात कोणीतरी आपलं आहे, कोणीतरी आपल्याला मनापासून समजून घेतं आणि आपल्यावर प्रेम करतं, ही जाणीवच मनाला मोठा आनंद देऊन जाते. तो आनंद, ते समाधान म्हणजेच प्रेम. भगवान श्रीकृष्णांच्या विचारांचा आधार घेतला तर प्रेम हे मिळवण्यासाठी किंवा गमावण्यासाठी नसून ते जगण्यासाठी आहे, अशी सुंदर भावना त्यातून व्यक्त होते. प्रेम हा आयुष्यातील एक सुंदर अनुभव आहे. मात्र प्रत्येक प्रेमकहाणीचा शेवट विवाहातच होईल असं नाही. ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे, तिच्यासोबत आपलं लग्न होईलच याची खात्री नसते. काही वेळा परिस्थिती, कुटुंब, सामाजिक बंधने किंवा इतर कारणांमुळे दोन व्यक्तींना एकत्र येणं शक्य होत नाही. अशा वेळी योग्य ती तडजोड स्वीकारण्याची मानसिकता असणंही गरजेचं आहे. लग्न होणार नाही म्हणून प्रेम करणं सोडून देणं, हे त्या भावनेचा अपमान करण्यासारखं आहे. प्रेमाचा अर्थ केवळ लग्न किंवा शारीरिक सुख नसून एकमेकांच्या भावनांचा आदर, विश्वास, जिव्हाळा आणि काळजी हा आहे. त्यामुळे जोपर्यंत एखादं नातं आपल्या आयुष्यात आहे, तोपर्यंत ते मनापासून जपण्याचा प्रयत्न करायला हवा. परिस्थिती कठीण झाली तर परिस्थितीशी तडजोड करायला शिकणं आवश्यक आहे. कारण माणसाचं आयुष्यच असं आहे की अनेक गोष्टी स्वीकारल्याशिवाय आणि काही वेळा तडजोड केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. प्रेम मिळालं नाही म्हणून आयुष्यातील आनंद संपतो, असं अजिबात नाही. ज्या व्यक्तीवर कधीतरी मनापासून प्रेम केलं, त्या व्यक्तीच्या चांगल्या आठवणी आयुष्यभर मनात जपून ठेवता येतात. तिच्यासोबत लग्न झालं किंवा नाही झालं, तरी त्या व्यक्तीबद्दल मनात आदर ठेवता येतो. एखाद्या व्यक्तीसोबत लग्न होईल या एकाच आशेने प्रेम करू नका. प्रेम करताना समोरच्या व्यक्तीला मिळवण्यापेक्षा तिला समजून घेणं आणि तिच्या भावनांचा आदर करणं अधिक महत्त्वाचं आहे. आपल्या समाजात विवाह हा अनेकदा कुटुंबाच्या संमतीने आणि परिस्थितीचा विचार करून ठरतो. त्यामुळे प्रेमविवाहाला विरोध असो किंवा परिस्थितीमुळे आलेले अडथळे असोत, प्रेम करणाऱ्या व्यक्तीने वास्तव स्वीकारण्याची ताकदही ठेवायला हवी. ज्याच्यावर प्रेम आहे, त्याच्यासोबत लग्न झालं तर ते नक्कीच सर्वोत्तम असेल आणि त्यासाठी प्रयत्नही केले पाहिजेत. पण ते शक्य झालं नाही, तर समोर येणाऱ्या परिस्थितीला धैर्याने सामोरं जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे. प्रेम टिकवण्यासाठी आयुष्यभर एक गोष्ट जपली तरी ती पुरेशी आहे—त्या व्यक्तीचा मनापासून आदर. प्रेमाबद्दल लिहिण्यासारखं खूप काही आहे. प्रत्येकाच्या प्रेमाची कहाणी वेगळी असते, प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात. मात्र प्रेमाचं खरं सौंदर्य हे कोणाला मिळवण्यात नाही, तर एखाद्या व्यक्तीच्या मनात आपल्यासाठी असलेल्या भावनेचा आदर करण्यात आहे. प्रेम करा, प्रेम जगा आणि प्रेमाचा आदर करा…! 💞
काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! भरधाव कारची चार महिलांना धडक; एकीचा मृत्यू, तिघी गंभीर
काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! भरधाव कारची चार महिलांना धडक; एकीचा मृत्यू, तिघी गंभीरचाळीसगाव | प्रतिनिधीचाळीसगाव तालुक्यातील बिलाखेड येथे भरधाव कारने चार महिलांना जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बिलाखेड परिसरात चार महिला रस्त्यालगत असताना अचानक भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, चारही महिला रस्त्यावर फेकल्या गेल्या. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमी महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.अपघाताची माहिती मिळताच संबंधित पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. भरधाव कार नेमक्या कोणत्या कारणामुळे चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली, तसेच चालकाचा वेग किती होता, याबाबत पोलीस तपास करत आहेत.या घटनेमुळे बिलाखेड परिसरात शोककळा पसरली असून रस्त्यावरील वाढता वेग आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघातातील मृत महिलेची ओळख आणि जखमी महिलांची सविस्तर माहिती पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.


