नि.पं.पाटील विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा
पळासखेडे मिराचे दि १७ जुलै २०२५(प्रतिनिधी ) नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे शाळेत मातृहृदयी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पवार हे होते. सर्वप्रथम कै.आचार्य बापूसो. गजाननराव गरुड व कै. अण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष , संस्था संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक जे.आर.पाटील यांनी कै. आचार्य बापूंना अभिप्रेत असलेला विद्यार्थी याबद्दल मत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षक एस. जे. सोनवणे यांनी मनोगतात संस्थेची स्थापना व व्याप्ती याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी अध्यक्ष भाषणात कै.आचार्य गजाननराव बापूंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक व सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील,चंद्रशेखर काळे,अब्दुल नबी तांबोळी,डी. पी .पाटील, संजू पवार,.शालिक पाटील,अशोक माळी,बळीराम माळी,लता पाटील हे मान्यवर उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्षाली प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक – हितेश वर्जन चव्हाण तृतीय क्रमाक – ओम संतोष चौधरी यांनी मिळविला. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 50 शालेय गणवेश वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने ,सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जी.पी. पाटील यांनी केले तर आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले.
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
दर्शनाच्या रांगेत अचानक प्रकृती बिघडली; जयदीप मेघराज नेमाडे यांचा दुर्दैवी अंत जळगाव/मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जयदीप मेघराज नेमाडे असे मृत तरुणाचे नाव आहे. १७ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ११.४० वाजता ही घटना घडली. जयदीप नेमाडे हे मित्रांसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आले होते. दर्शनाच्या रांगेत असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती समोर आली. प्रकृती अधिक खालावल्यानंतर त्यांना तातडीने मदत कक्षामार्फत रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार, जयदीप यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत काळाचौकी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूचे निश्चित वैद्यकीय कारण अधिकृत अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. जयदीप हे जळगाव शहरातील शिरसोली रोड परिसरातील जीवनमोती सोसायटीतील रहिवासी होते. त्यांचे वडील मेघराज सुभाष नेमाडे हे नेमाडे ट्रान्सपोर्टचे संचालक असल्याचे वृत्त आहे. जयदीप हे कुटुंबातील एकुलते एक पुत्र होते. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग तसेच एमबीएचे शिक्षण पूर्ण केले होते आणि ते पुण्यात नोकरी करत होते. या आकस्मिक घटनेने नेमाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून जळगाव शहरातही हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबीयांनी दर्शन व्यवस्थेबाबत गर्दीच्या ठिकाणी अधिक योग्य नियोजन व पुरेशी वैद्यकीय सुविधा उपलब्ध असण्याची गरज व्यक्त केली आहे.
जळगाव रेल्वे स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगचे काम; १२ गाड्या रद्द
१९ ते २४ सप्टेंबरदरम्यान रेल्वे वाहतुकीवर परिणाम; काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेतही बदल जळगाव : जळगाव रेल्वे स्थानकावर जळगाव–भुसावळ पाचव्या मार्गिकेच्या कामाच्या अनुषंगाने यार्ड रिमॉडेलिंगचे महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे १९ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार असून, प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने काही गाड्या रद्द करण्यासह काही गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे. यार्ड रिमॉडेलिंगच्या कामासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंगची कामे करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर २३ सप्टेंबर रोजी पाच तर २४ सप्टेंबर रोजी सात अशा एकूण १२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. २३ सप्टेंबरला पाच गाड्या रद्द २३ सप्टेंबर रोजी पुढील गाड्यांचे संचालन रद्द राहणार आहे : • १९००७ सुरत–भुसावळ एक्स्प्रेस• १९१०५ उधना–भुसावळ एक्स्प्रेस• १९१०६ भुसावळ–उधना एक्स्प्रेस• ११११४ भुसावळ–देवळाली मेमू• ६११३० बडनेरा–नाशिक रोड मेमू २४ सप्टेंबरला सात गाड्या रद्द २४ सप्टेंबर रोजी पुढील सात गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत : • १९००८ भुसावळ–सुरत एक्स्प्रेस• ५९०७५ नंदुरबार–भुसावळ पॅसेंजर• ५९०७६ भुसावळ–नंदुरबार पॅसेंजर• ११११९ इगतपुरी–भुसावळ मेमू• १११२० भुसावळ–इगतपुरी मेमू• ११११३ देवळाली–भुसावळ मेमू• ६११२९ नाशिक–बडनेरा मेमू लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेतही बदल या कामाचा परिणाम काही लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसवरही होणार आहे. २४ सप्टेंबर रोजी १२७८० हजरत निजामुद्दीन–वास्को द गामा एक्स्प्रेस सुमारे १ तास ४० मिनिटे, १२१०४ लखनौ–पुणे एक्स्प्रेस १ तास ३५ मिनिटे आणि १५०१८ गोरखपूर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १ तास १५ मिनिटे उशिराने धावणार आहे. तसेच १९ सप्टेंबर रोजी १९०४६ थावे–सुरत एक्स्प्रेस १ तास ४० मिनिटे, तर १२३३५ भागलपूर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १ तास ३५ मिनिटे उशिराने धावणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रवाशांनी वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा यार्ड रिमॉडेलिंगच्या कामामुळे रेल्वे वाहतुकीत करण्यात आलेल्या या बदलांचा प्रवाशांना फटका बसू शकतो. त्यामुळे संबंधित तारखांना प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या गाडीचे अद्ययावत वेळापत्रक आणि गाडी सुरू आहे की रद्द झाली आहे, याची खात्री करूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जामनेरमध्ये पाच दिवसांच्या गणेशोत्सवाची शांततेत सांगता
भक्तिमय वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप; पोलिसांचा चोख बंदोबस्त जामनेर : शहरासह तालुक्यात पाच दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात विराजमान झालेल्या गणरायाला आज भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. विविध गणेश मंडळे तसेच घरगुती गणपतींचे विसर्जन शांततेत आणि उत्साहात पार पडले. गणेशोत्सवादरम्यान शहरातील विविध भागांमध्ये गणेश मंडळांकडून धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आरती, भजन, कीर्तन तसेच विविध उपक्रमांमुळे गेल्या पाच दिवसांपासून जामनेर शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. आज गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांवर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. ढोल-ताशांच्या गजरात, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणरायाला निरोप देण्यात आला. अनेक भाविकांनी पारंपरिक पद्धतीने मिरवणुका काढून बाप्पाचे विसर्जन केले. गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी जामनेर पोलिसांकडून शहरातील प्रमुख चौक, विसर्जन मार्ग आणि गर्दीच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठीही आवश्यक नियोजन करण्यात आले होते. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पाचही दिवसांत नागरिकांनी शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवत उत्सव साजरा केला. प्रशासन, पोलीस यंत्रणा, गणेश मंडळांचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे जामनेरमध्ये पाच दिवसांचा गणेशोत्सव शांततेत पार पडला. शहरात पाच दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात विराजमान झालेल्या गणरायाला आज भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. शहरातील रुबी स्टार हॉस्पिटल, जामनेर बसस्थानक, प्रकाशचंद जैन फार्मसी कॉलेज यांसह विविध ठिकाणी गणेश विसर्जनाचा कार्यक्रम शांततेत पार पडला. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत गणरायाला भावपूर्ण निरोप देताना अनेक भाविकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
🌙 झोपण्याआधी हा लेख नक्की वाचा…
टेंशन आणि आजचा तरुण आजचा तरुण दिसायला आत्मविश्वासू असला, तरी मनाच्या कोपऱ्यात अनेक प्रश्न, अपेक्षा आणि चिंता घेऊन जगताना दिसतो. विशेषतः २२ ते २५ वर्षांचा काळ हा अनेक तरुण-तरुणींसाठी आयुष्याला दिशा देणारा आणि त्याचवेळी मानसिक तणाव वाढवणारा ठरतो. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर करिअरची चिंता, नोकरीचा प्रश्न, आर्थिक स्थैर्य, नातेसंबंध आणि भविष्याची अनिश्चितता यामुळे मनात सतत विचारांचे वादळ सुरू असते. “माझं पुढे काय होणार?”“मला चांगली नोकरी मिळेल का?”“माझं करिअर योग्य दिशेने चाललंय का?”“इतरांपेक्षा मी मागे तर पडत नाही ना?” असे प्रश्न अनेकदा मनाला अस्वस्थ करून जातात. भविष्याचा विचार करता करता वर्तमानातील छोट्या-छोट्या आनंदाकडे दुर्लक्ष होऊ लागते. टेंशनपासून पळू नका; त्याला सामोरं जा! आयुष्यात अडचणी येणारच आहेत. प्रत्येक समस्येपासून दूर पळण्यापेक्षा तिच्याकडे शांतपणे पाहण्याची गरज आहे. कारण अनेकदा समस्या जितकी मोठी वाटते, तितकी ती प्रत्यक्षात नसते. आपण एखाद्या कठीण परिस्थितीत अडकलो की, “यातून बाहेर कसं पडायचं?” याचा विचार करण्याऐवजी “हे माझ्यासोबतच का घडतंय?” असा विचार करत राहतो. यामुळे समस्या सुटण्याऐवजी तणाव अधिक वाढतो. परिस्थिती स्वीकारून एक-एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला, तर मार्ग नक्कीच सापडतो. पैसा महत्त्वाचा आहे; पण तोच आयुष्य नाही! आजच्या तरुणांच्या तणावामागे आर्थिक स्थैर्याची धडपडही मोठी आहे. चांगली नोकरी, मोठा पगार, स्वतःचं घर, गाडी आणि सुख-सुविधा मिळवण्याची इच्छा चुकीची नाही. मात्र पैसा कमावताना स्वतःचं मानसिक स्वास्थ्य, कुटुंब, मित्र आणि आयुष्यातील आनंद गमावू नका. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एका ठराविक वयातच मिळाली पाहिजे, असा कोणताही नियम नाही. कुणाचं यश लवकर येतं, तर कुणाला त्यासाठी थोडा अधिक वेळ लागतो. महत्त्वाचं म्हणजे आपला प्रवास थांबू नये. तुलना करणं थांबवा… सोशल मीडियामुळे दुसऱ्यांचं यश, त्यांचा प्रवास आणि त्यांचं सुंदर आयुष्य सतत आपल्या डोळ्यांसमोर येत असतं. त्यातून स्वतःच्या आयुष्याशी तुलना करण्याची सवय लागते. पण लक्षात ठेवा—आपण इतरांच्या आयुष्यातील दिसणारा भाग पाहत असतो; त्यामागचा संघर्ष नाही. म्हणून स्वतःची तुलना दुसऱ्याशी करण्यापेक्षा कालच्या स्वतःपेक्षा आज आपण किती पुढे आलो, हे पाहा. आजची रात्र शांत करा… झोपण्यापूर्वी दिवसभरातील चिंता मनात घेऊन झोपू नका. उद्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच मिळाली पाहिजेत, असं नाही. स्वतःला एक प्रश्न विचारा— “आज मी माझ्या परीने जे शक्य होतं, ते केलं का?” उत्तर हो असेल, तर स्वतःला थोडी विश्रांती द्या. आणि उत्तर नाही असेल, तरी स्वतःला दोष देत बसू नका. कारण उद्या पुन्हा प्रयत्न करण्याची संधी आहे. आयुष्याची शर्यत मोठी आहे. त्यामुळे प्रत्येक वळणावर घाई करण्याची गरज नाही. टेंशनमधून मुक्त होण्यासाठी परिस्थिती बदलण्यापेक्षा अनेकदा परिस्थितीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे अधिक महत्त्वाचे ठरते. म्हणून… आज शांत झोपा…मनावरील ओझं थोडं बाजूला ठेवा…आणि उद्याची सुरुवात नव्या उमेदीने करा! 🌿 ✍🏻 एकमन संतोष भिसे
सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जामनेर पोलिसांची धडक कारवाई
५ ठिकाणी छापे; ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त जामनेर : सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जामनेर पोलिसांनी अवैध गावठी हातभट्टी दारूविरोधात धडक कारवाई केली. दिनांक १७ व १८ सप्टेंबर २०२६ रोजी जामनेर पोलीस स्टेशनच्या पथकाने गारखेडा, शहापूर व सामरोद परिसरात एकूण पाच ठिकाणी छापे टाकून तब्बल ८७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे सुमारे १ हजार ६०० लिटर गूळ व नवसागर मिश्रित कच्चे रसायन पोलिसांनी जप्त केले. सदर कच्च्या रसायनाला आंबट व उग्र वास असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. तसेच ४५ लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू देखील जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ८७ हजार ५०० रुपये असल्याची माहिती जामनेर पोलिसांनी दिली. जप्त केलेला मुद्देमाल नियमानुसार नष्ट करण्यात आला आहे. सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू निर्मिती व विक्रीला आळा घालण्यासाठी जामनेर पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या कारवाईमुळे अवैध हातभट्टी व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये पाच आरोपींविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. दरम्यान, सण-उत्सव काळात शांतता व कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी अवैध दारू, जुगार तसेच इतर बेकायदेशीर प्रकारांविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
🚨 दोन दिवसांत दोन अपघाती घटना; प्रशासन आणखी किती अपघातांची वाट पाहणार?
जामनेर शहरातील उघड्या नाल्या आणि असुरक्षित ठिकाणांचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा जामनेर : प्रतिनिधी JBN महाराष्ट्र NEWS शहरात उघड्या नाल्या, अपुऱ्या सुरक्षा उपाययोजना आणि धोकादायक ठिकाणांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे. अवघ्या दोन दिवसांत दोन अपघाती घटना घडल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.एका घटनेत कार उघड्या नाल्यात कोसळली, तर दुसऱ्या घटनेत सोना हॉस्पिटलजवळ पाण्याचा टँकर उलटला. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र, आज जीवितहानी टळली म्हणून हा धोका दुर्लक्षित करण्यासारखा नाही.शहरातील उघड्या नाल्यांभोवती पुरेशी सुरक्षा व्यवस्था, कठडे किंवा स्पष्ट सूचना नसल्यास वाहनचालक तसेच पादचाऱ्यांसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः रात्रीच्या वेळी अशा ठिकाणी अपघाताची शक्यता अधिक वाढते.https://youtu.be/z9J6FzGYB1g?si=w4VOwPOLGAhBGcAeप्रश्न आता थेट प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर उपस्थित होत आहे—धोकादायक ठिकाणांची पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार? एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील सर्व उघड्या व धोकादायक नाल्यांची तातडीने पाहणी करून त्याठिकाणी कठडे, झाकणे, बॅरिकेडिंग आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.“अपघात झाल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा, अपघात होण्याआधी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हीच प्रशासनाची खरी जबाबदारी आहे,” अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे
शिवक्रांती मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
संगीत खुर्चीसह विविध स्पर्धांना बालकांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कुंभारी सिम, दिवपिंपरी ता. जामनेर :जामनेर तालुक्यातील कुंभारी सिम, दिवपिंपरी येथे शिवक्रांती मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावातील नागरिक, महिला, युवक तसेच बालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गणेशोत्सव काळात मंडळाच्या वतीने गणपती बाप्पाची भक्तिभावाने आरती व पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांसाठी विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये संगीत खुर्ची या विशेष कार्यक्रमासह विविध खेळ व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. बालकांसह युवक व ग्रामस्थांनी या कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमादरम्यान सहभागी झालेल्या स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने कार्यक्रमस्थळी आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विविध स्पर्धांमधून सहभागींचे मनोरंजन करण्याबरोबरच गावातील नागरिकांमध्ये एकोपा आणि सामाजिक सलोखा वाढविण्याचा संदेश देण्यात आला. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता त्यातून सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळावी, तसेच गावातील युवक व नागरिकांनी एकत्र येऊन उत्सव साजरा करावा, या उद्देशाने शिवक्रांती मित्र मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचे उपस्थित ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
ऋषीपंचमीनिमित्त अंबिलहोळ येथे प्रकाश पाटील यांचा शेतकऱ्यांशी संवाद
अंबिलहोळ : प्रतिनिधी ऋषीपंचमीनिमित्त अंबिलहोळ येथील केशव बाबा व रामदेव बाबा यांच्या धार्मिक स्थळी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमाला परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी भंडाऱ्यासाठी उपस्थित असलेल्या ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेत त्यांच्या अडचणींबाबत चर्चा केली. यानंतर प्रकाश पाटील यांनी केशव बाबा व रामदेव बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच अंबिलहोळ ग्रामस्थ आणि पक्षाच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची भेट घेऊन विविध स्थानिक विषयांवर चर्चा केली. याप्रसंगी जितेंद्र नाईक (खडकी), दौलत पवार, गोकुळ चव्हाण, रामचंद्र नाईक, विजय चव्हाण, भानुदास चव्हाण यांच्यासह अंबिलहोळ येथील ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
रक्षा खडसेंकडून मिझोरामच्या क्रीडा परिसंस्थेचा आढावा
साई ऐझॉल केंद्राला भेट; खेळाडू व प्रशिक्षकांशी साधला संवाद, ईशान्य भारतातील क्रीडा प्रतिभेला अधिक संधी देण्यावर भर ऐझॉल, दि. १५ सप्टेंबर २०२६ : केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी ऐझॉल येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) केंद्राला भेट देत मिझोराममधील क्रीडा पायाभूत सुविधा, खेळाडूंचे प्रशिक्षण आणि क्रीडा विकासाचा आढावा घेतला. यावेळी मिझोरामचे क्रीडा व युवा सेवा मंत्री पु. लालंघिंगलोवा हमार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी रक्षा खडसे आणि मिझोरामचे क्रीडा व युवा सेवा मंत्री यांच्यात राज्यातील क्रीडा विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वय अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा झाली. तसेच SAI केंद्रातील खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांशी रक्षा खडसे यांनी संवाद साधला. खेळाडूंचा प्रशिक्षण अनुभव, विविध स्पर्धांमधील सहभाग आणि भविष्यातील उद्दिष्टांबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे सहाय्यक संचालक श्री. शिवम यादव यावेळी उपस्थित होते. ईशान्य भारतातील युवा खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षणासोबतच क्रीडा विज्ञान, पुनर्वसन, पोषण आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यावर रक्षा खडसे यांनी भर दिला. खेलो इंडिया उपक्रमातून क्रीडा सुविधांना बळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील क्रीडा संस्कृती अधिक व्यापक करण्यासाठी तसेच तळागाळातील प्रतिभावान खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ‘खेलो इंडिया’ उपक्रमाच्या माध्यमातून विविध प्रयत्न सुरू आहेत. मिझोरामसह ईशान्य भारतातील क्रीडा प्रतिभेला या माध्यमातून अधिक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर रक्षा खडसे यांनी भर दिला. ऐझॉल येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रशिक्षण केंद्रात खेलो इंडिया अंतर्गत सिंथेटिक हॉकी टर्फ आणि प्रकाशयोजना उभारण्याचा प्रकल्पही क्रीडा पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. लालरेम्सियामी हमारझोटे यांचे उल्लेखनीय उदाहरण मिझोराममधील क्रीडा प्रतिभेचे उदाहरण म्हणून लालरेम्सियामी हमारझोटे यांचा उल्लेख करण्यात आला. थेंझॉल येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अकादमीत प्रशिक्षण घेतलेल्या लालरेम्सियामी या मिझोरामच्या पहिल्या महिला ऑलिम्पियन आणि पहिल्या आशियाई क्रीडा पदकविजेत्या ठरल्या आहेत. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांची अर्जुन पुरस्कार २०२५ साठी निवड झाली आहे. ईशान्य भारतात मोठी क्रीडा प्रतिभा आणि मजबूत क्रीडा संस्कृती आहे. क्रीडा सुविधा, दर्जेदार प्रशिक्षण तसेच केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वय अधिक मजबूत करून या प्रतिभेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे नेण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे रक्षा खडसे यांनी यावेळी अधोरेखित केले.
गणेशोत्सवानिमित्त निळकंठ विद्यालयात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
‘फुगे फोडणे’ स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उत्साहाच्या वातावरणात रंगला उपक्रम जामनेर : प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक अशा ‘फुगे फोडणे’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. फुगे फोडण्याच्या या मनोरंजक खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये चुरस निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मनोरंजनासोबतच खेळाडूवृत्ती, शिस्त आणि सांघिक भावना जोपासण्याची संधी मिळाली. स्पर्धा सुरळीतपणे पार पडण्यासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांच्या सहकार्यामुळे स्पर्धेचे नियोजन व्यवस्थितपणे करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक जयप्रकाश पाटील, पर्यवेक्षक राजेंद्र पाटील, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख जी. पी. पाटील यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांसह क्रीडा कौशल्यांना वाव मिळत आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाडूवृत्ती, आत्मविश्वास, सांघिक भावना आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होत आहे.


