नि.पं.पाटील विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा
पळासखेडे मिराचे दि १७ जुलै २०२५(प्रतिनिधी ) नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे शाळेत मातृहृदयी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पवार हे होते. सर्वप्रथम कै.आचार्य बापूसो. गजाननराव गरुड व कै. अण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष , संस्था संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक जे.आर.पाटील यांनी कै. आचार्य बापूंना अभिप्रेत असलेला विद्यार्थी याबद्दल मत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षक एस. जे. सोनवणे यांनी मनोगतात संस्थेची स्थापना व व्याप्ती याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी अध्यक्ष भाषणात कै.आचार्य गजाननराव बापूंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक व सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील,चंद्रशेखर काळे,अब्दुल नबी तांबोळी,डी. पी .पाटील, संजू पवार,.शालिक पाटील,अशोक माळी,बळीराम माळी,लता पाटील हे मान्यवर उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्षाली प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक – हितेश वर्जन चव्हाण तृतीय क्रमाक – ओम संतोष चौधरी यांनी मिळविला. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 50 शालेय गणवेश वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने ,सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जी.पी. पाटील यांनी केले तर आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले.
NCMC कार्डच्या पहिल्याच दिवशी गोंधळ; महिलांना भरावे लागले पूर्ण तिकीट!
तांत्रिक बिघाडामुळे अर्ध्या तिकिटाची सवलत मिळेना; महिला प्रवाशांची तारांबळजळगाव | प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेत महिलांना सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्डची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली. मात्र, पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणींमुळे या योजनेचा फटका महिला प्रवाशांना बसला. अनेक महिलांचे NCMC कार्ड मशीनमध्ये रीड होत नसल्याने त्यांना सवलतीच्या दराऐवजी पूर्ण तिकीटाचे भाडे भरावे लागले.महिलांना एसटी प्रवासात सवलतीचा लाभ देण्यासाठी NCMC कार्डचा वापर सुरू करण्यात आला आहे. या कार्डद्वारे प्रवासाचे तिकीट काढताना सवलतीचे भाडे आकारले जाणे अपेक्षित होते. मात्र, जळगाव बसस्थानकासह काही ठिकाणी पहिल्याच दिवशी कार्ड रीड न होणे, मशीनमध्ये एरर येणे आणि कनेक्टिव्हिटीच्या समस्या निर्माण झाल्याचे दिसून आले.सकाळपासूनच महिला प्रवाशांच्या लांबच लांब रांगाNCMC कार्डच्या माध्यमातून सवलतीचा लाभ घेण्यासाठी महिला प्रवासी सकाळपासूनच बसस्थानकावर दाखल झाल्या होत्या. मात्र, कार्ड मशीनमध्ये रीड होत नसल्याने अनेक महिलांना अपेक्षित सवलत मिळाली नाही. परिणामी, काही प्रवाशांना नाइलाजाने पूर्ण तिकीटाचे भाडे भरून प्रवास करावा लागला.एका बाजूला नवीन कार्ड पद्धतीचा पहिलाच दिवस असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते, तर दुसऱ्या बाजूला तांत्रिक अडचणींमुळे महिला प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.७४९ रुपयांची शिल्लक असूनही कार्ड रीड झाले नाहीकाही महिला प्रवाशांच्या NCMC कार्डमध्ये पुरेशी रक्कम शिल्लक असतानाही कार्ड मशीनमध्ये रीड झाले नसल्याची समस्या समोर आली. त्यामुळे कार्डमध्ये पैसे असूनही त्याचा वापर करता न आल्याने प्रवाशांना पूर्ण भाडे भरावे लागले.प्रवाशांची मागणीNCMC कार्डमधील तांत्रिक समस्या तातडीने दूर करून महिलांना सवलतीचा लाभ सुरळीतपणे मिळावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी झालेल्या अडचणींची पुनरावृत्ती होऊ नये आणि पुढील प्रवासात महिलांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू नये, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.दरम्यान, पहिल्या दिवशी काही तांत्रिक अडचणी समोर आल्या असून, संबंधित यंत्रणा आणि कनेक्टिव्हिटीची समस्या लवकरच दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली आहे.NCMC कार्ड म्हणजे काय?NCMC (National Common Mobility Card) हे एकाच कार्डद्वारे बस, मेट्रो, लोकल, टोल आदी विविध सेवांचा वापर करता यावा, या उद्देशाने विकसित करण्यात आलेले कार्ड आहे. एसटी प्रवासात महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि इतर पात्र प्रवाशांना उपलब्ध असलेल्या सवलतींचा लाभ घेण्यासाठीही या कार्डचा वापर केला जाणार आहे.तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर महिलांना सवलतीचा प्रवास सुरळीतपणे करता येईल, अशी अपेक्षा आहे.
जळगावात पोलिसांची मोठी कारवाई; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त
जळगाव | प्रतिनिधीस्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत एमडी (मेफेड्रोन) तयार करण्यासाठी वापरले जाणारे इफेड्रीन तसेच गांजा असा एकूण ११ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्टच्या रात्री पोलिसांचे पथक संशयित हालचालींवर लक्ष ठेवून असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून एक संशयित व्यक्ती त्या दिशेने येताना दिसला. पोलिसांना संशय आल्याने पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव मोहम्मद अब्दुल सलाम पटेल (वय ५१) असे आहे. त्याच्याकडून इफेड्रीन आणि गांजा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ११ लाख १७ हजार २०० रुपये असल्याची प्राथमिक माहिती आहे.या प्रकरणी पोलिसांनी संशयिताविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली असून, जप्त करण्यात आलेल्या पदार्थांचा नेमका वापर आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.
जळगावात वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; ४ पीडित महिलांची सुटका, ३ आरोपींवर कारवाई
जळगाव | प्रतिनिधीजळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्राळा-हुडको परिसरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकत ४ पीडित महिलांची सुटका केली असून ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा परिसरातील एका ठिकाणी बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खात्री करून पोलिसांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. अचानक झालेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली.या कारवाईदरम्यान पोलिसांनी ४ पीडित महिलांची सुटका केली. तसेच वेश्या व्यवसाय चालविल्याच्या आरोपावरून ३ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.पोलिसांच्या या कारवाईमुळे पिंप्राळा परिसरातील बेकायदेशीर व्यवसायांवर लगाम बसण्यास मदत होणार असून, अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
२,००० वर्षांचा इतिहास जपणाऱ्या पांडवलेणी; दगडात कोरलेला बौद्ध वारसा आजही पर्यटकांना खुणावतो!
नाशिक | प्रतिनिधी नाशिक शहरापासून काही किलोमीटर अंतरावर त्रिरश्मी डोंगरावर वसलेल्या पांडवलेणी या महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाचा अनमोल ठेवा आहेत. त्रिरश्मी लेणी किंवा नाशिक लेणी म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात तब्बल २४ शैलकृती लेणी आहेत. या लेण्यांचा इतिहास दोन हजार वर्षांहून अधिक जुना असून, त्यांची निर्मिती प्रामुख्याने बौद्ध भिक्षूंच्या वास्तव्य, ध्यानधारणा आणि धार्मिक उपासनेसाठी करण्यात आली होती. पांडवलेणी हे नाव कसे पडले? पांडवलेणी हे नाव महाभारतातील पांडवांशी जोडणाऱ्या स्थानिक आख्यायिकेमुळे प्रचलित झाले असले, तरी पुरातत्त्वीय पुराव्यांनुसार या लेण्यांचा मुख्य संबंध प्राचीन बौद्ध परंपरेशी आहे. लेणी परिसरात विहार, चैत्यगृह, स्तूप, शिल्पकला तसेच खडकात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. लेणी क्रमांक ३, १० आणि १८ विशेष महत्त्वाच्या पांडवलेणीतील लेणी क्रमांक ३, १० आणि १८ विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात. लेणी क्रमांक १८ मध्ये चैत्यगृह आणि स्तूप आहे, तर इतर लेण्यांमध्ये सुंदर शिल्पकला आणि प्राचीन शिलालेख आढळतात. या शिलालेखांमधून तत्कालीन समाजजीवन, धार्मिक परंपरा आणि राजकीय इतिहासाची महत्त्वपूर्ण माहिती मिळते. शिलालेखांमधून इतिहासाची साक्ष पांडवलेणीतील शिलालेखांना इतिहासाच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. नहपान, उषवदात आणि गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या काळातील राजकीय व सामाजिक इतिहास समजून घेण्यासाठी येथील शिलालेख अत्यंत उपयुक्त ठरतात. दगडावर कोरलेल्या या लेखांमुळे दोन हजार वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रातील जीवनशैली आणि धार्मिक-सामाजिक परिस्थितीची झलक मिळते. स्थापत्यकलेचा अनोखा नमुना पांडवलेणीमध्ये प्राचीन भारतीय शैलकलेचा उत्कृष्ट नमुना पाहायला मिळतो. डोंगराच्या कठीण खडकात कोरलेले स्तंभ, दालने, चैत्यगृहे, विहार, स्तूप आणि पाण्याच्या टाक्या तत्कालीन कारागिरांच्या कौशल्याची साक्ष देतात. कोणत्याही आधुनिक साधनांशिवाय खडकात साकारलेली ही वास्तू आजही पर्यटकांना आश्चर्यचकित करते. इतिहास, बौद्ध संस्कृती आणि निसर्गसौंदर्याचा संगम आज पांडवलेणी हे नाशिकमधील महत्त्वाचे ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळ बनले आहे. प्राचीन स्थापत्यकला, बौद्ध संस्कृती, शिलालेख आणि निसर्गसौंदर्य यांचा अनोखा संगम येथे पाहायला मिळतो. डोंगरावरून दिसणारे नाशिक शहराचे विहंगम दृश्यही पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरते. इतिहासप्रेमी, पर्यटक, विद्यार्थी आणि अभ्यासकांसाठी पांडवलेणी हे निश्चितच महाराष्ट्राच्या गौरवशाली वारशाचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे. हजारो वर्षांचा इतिहास आपल्या दगडांमध्ये जपणाऱ्या या लेण्या आजच्या पिढीला आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख करून देतात. पांडवलेणी — इतिहासाचा अभिमान, बौद्ध वारशाची अमूल्य ठेव आणि नाशिकच्या पर्यटनाचे आकर्षण!
शेंदुर्णी-पाचोरा मार्गावरील अपघातांना जबाबदार कोण?; रस्ता विकासासोबत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
शेंदुर्णी-पाचोरा | प्रतिनिधी शेंदुर्णी-पाचोरा मार्गावरील सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण व बांधकामाच्या कामामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर यापूर्वी अनेक अपघात झाल्याचा दावा नागरिकांकडून केला जात असून, काही जण गंभीर जखमी झाले, तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्वाला सामोरे जावे लागल्याचे सांगितले जाते. उपचारासाठी मोठा आर्थिक खर्च झाल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे या मार्गावरील अपघातांची कारणमीमांसा करून सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने करण्याची मागणी जोर धरत आहे. रस्ता बांधकामाच्या कामात कंत्राटदाराची भूमिका महत्त्वाची असली तरी कामावर देखरेख करणारे अभियंते, पर्यवेक्षक आणि संबंधित विभागाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. कंत्राटदाराकडून नियमांचे उल्लंघन होत असेल, तर ते रोखण्यासाठी देखरेख करणारी यंत्रणा काय करीत होती, हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे चौकशी झाल्यास ती केवळ कंत्राटदारापुरती मर्यादित न ठेवता कंत्राटदार, पर्यवेक्षक, अभियंते, संबंधित विभागीय अधिकारी आणि सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित सर्व स्तरांची भूमिका तपासणे आवश्यक ठरणार आहे. जुन्या पुलांसह संपूर्ण मार्गाचे स्ट्रक्चरल ऑडिट गरजेचेशेंदुर्णी-पाचोरा मार्गावरील गंभीर प्रश्नांपैकी एक म्हणजे जुन्या पुलांची आणि अन्य संरचनांची सद्यस्थिती. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मार्गाचे आधुनिकीकरण सुरू असले तरी ब्रिटिशकालीन पूल व जुन्या संरचनांची सध्याची स्थिती, त्यांची वाहतूक क्षमता आणि सुरक्षितता याबाबत पुरेशी माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध नाही. वाढती वाहतूक आणि वाहनांचा वेग लक्षात घेता या जुन्या पुलांचे स्वतंत्र स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे. रस्ता रुंदावणे म्हणजे केवळ सिमेंट किंवा डांबराचा पृष्ठभाग तयार करणे नव्हे. रस्त्याचा पाया, भरावाची मजबुती, डांबरीकरणाचा दर्जा, रस्त्याची उंची-खोली, उतार-चढ, वळणे, पूल, मोऱ्या, पाण्याचा निचरा, साईड पट्टे, रोड मार्किंग आणि वाहतूक सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था या सर्व बाबींचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. काम सुरू असताना सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्हरस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याचे मूळ स्वरूप बदललेले दिसते. काही ठिकाणी खोदकाम, उंच-सखल भाग, अपूर्ण काम किंवा जुन्या व नव्या रस्त्याच्या भागातील फरक वाहनचालकांसाठी अडचणीचा ठरू शकतो. विशेषतः रात्रीच्या वेळी पुरेसे बॅरिकेडिंग, रिफ्लेक्टर, चेतावणी फलक, दिशादर्शक व्यवस्था आणि प्रकाशयोजना नसल्यास अपघाताचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत वाहनचालकाचा वेग हा अपघातामागील एक घटक असू शकतो; मात्र प्रत्येक अपघाताचे मूळ कारण केवळ वाहनाचा वेग आहे, असे गृहीत धरणे योग्य ठरणार नाही. रस्ता अपूर्ण होता का? अचानक मार्ग बदलला होता का? रस्त्यावर अडथळे होते का? कामाचे साहित्य पडले होते का? रात्री पुरेशी दृश्यता होती का? सूचना फलक आणि बॅरिकेडिंग होते का? या सर्व बाबींची घटनास्थळाच्या परिस्थितीनुसार तपासणी होणे आवश्यक आहे. पाळधी-जळगाव बायपासच्या घटनांनंतर धडा घेण्याची गरजपाळधी-जळगाव बायपासवरील घटनांनंतर रस्ते बांधकामाच्या दर्जासोबतच सुरक्षाव्यवस्थेची जबाबदारीही चर्चेत आली आहे. मोठी दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा संभाव्य धोके आधीच ओळखून ते दूर करणे ही प्रशासनाची खरी कार्यक्षमता ठरते. त्यामुळे जिल्ह्यातील सुरू असलेल्या रस्ते प्रकल्पांचीही प्रतिबंधात्मक पद्धतीने पाहणी करण्याची आवश्यकता आहे. शेंदुर्णी-पाचोरा मार्गावर आतापर्यंत झालेल्या अपघातांची अधिकृत माहिती संकलित करून अपघातस्थळांचे नकाशीकरण करावे. प्रत्येक ठिकाणी अपघाताची कारणे, रस्त्याची स्थिती, वाहतुकीचे प्रमाण, वळणे, पूल, प्रकाशव्यवस्था आणि कामाची सद्यस्थिती यांचा स्वतंत्र अभ्यास करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कामाची गुणवत्ता आणि कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणीरस्ता बांधकामाच्या मंजूर आराखड्याची प्रत, कामाची मुदत, कामाची प्रगती, गुणवत्ता तपासणीचे अहवाल आणि सुरक्षा मानकांचे पालन याबाबत संबंधित विभागाने पारदर्शक माहिती सार्वजनिक करावी, अशीही नागरिकांची अपेक्षा आहे. कामाच्या ठिकाणी आवश्यक सूचना फलक, बॅरिकेडिंग, रिफ्लेक्टर आणि रात्रीची प्रकाशव्यवस्था आहे का, याची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. वाहनचालकांना पुढील रस्त्याची स्थिती स्पष्टपणे दिसेल, अशा पद्धतीने सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात. चौकशी निष्पक्ष आणि तांत्रिक असावीदोषी कोण आहे, हे चौकशीतून स्पष्ट झाले पाहिजे; मात्र चौकशीपूर्वीच कोणालाही दोषी ठरवणे योग्य नाही. तपासात कंत्राटदाराची निष्काळजीपणा, कामातील तांत्रिक त्रुटी, सुरक्षाव्यवस्थेतील कमतरता किंवा संबंधित अधिकाऱ्यांची कसूर आढळल्यास कायद्यानुसार जबाबदारी निश्चित करून कारवाई झाली पाहिजे. त्याचवेळी रस्त्याचे काम तांत्रिक निकषांनुसार आणि आवश्यक सुरक्षा उपायांसह सुरू असल्याचे तपासात स्पष्ट झाल्यास वाहनचालकाची चूक, अतिवेग, वाहनाची तांत्रिक अवस्था किंवा इतर कारणांचाही निष्पक्षपणे तपास होणे आवश्यक आहे. मात्र “अपघात झाला आणि वाहनाचा वेग कारणीभूत होता” एवढ्या एका निष्कर्षावर संपूर्ण प्रकरण थांबवणे योग्य ठरणार नाही. अपघातामागील सर्व घटकांचा वैज्ञानिक, तांत्रिक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास होणे गरजेचे आहे. ‘आणखी किती अपघात झाल्यावर प्रशासन जागे होणार?’आज एखादा नागरिक जखमी होतो, उद्या त्याला कायमचे अपंगत्व येते, उपचारासाठी लाखो रुपये खर्च होतात आणि संपूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडते. एखाद्या कुटुंबातील कमावता सदस्य गमावला तर त्या कुटुंबाचे आयुष्यच उद्ध्वस्त होते. त्यामुळे “आणखी किती अपघात झाल्यावर प्रशासन जागे होणार?” हा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शेंदुर्णी-पाचोरा हा परिसरातील महत्त्वाचा मार्ग असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी, मालवाहू आणि प्रवासी वाहतूक होत असते. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण व आधुनिकीकरण निश्चितच आवश्यक आहे; मात्र विकासकामामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही, याची जबाबदारी संबंधित यंत्रणेचीच आहे. रस्ता विकासाचा मार्ग असला पाहिजे; तो निष्पाप नागरिकांच्या बळीचा मार्ग ठरता कामा नये. त्यामुळे शेंदुर्णी-पाचोरा मार्गावरील कामाची स्वतंत्र, निष्पक्ष, तांत्रिक आणि वस्तुनिष्ठ चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी आणि भविष्यातील अपघात टाळण्यासाठी तातडीने ठोस सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.
रामेश्वर कॉलनीतील घरफोडीचा छडा; दोन सख्ख्या भावांना अटक
उज्जैन येथे दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाचे बंद घर फोडून चोरी; एमआयडीसी पोलिसांची २४ तासांत यशस्वी कारवाई, ३१ लाख २६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगतजळगाव | प्रतिनिधी :जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक करून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल ३१ लाख २६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, त्यामध्ये २०८ ग्रॅम सोने आणि २८ ग्रॅम चांदीचा समावेश आहे. रामेश्वर कॉलनी, जळगाव येथील एक कुटुंब उज्जैन येथे दर्शनासाठी गेले असताना त्यांच्या बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. घर बंद असल्याची संधी साधत घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आले. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६९७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(A), ३३१(३), ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला. तपासादरम्यान विशाल मुरलीधर दगडे (वय २५) आणि जितेंद्र मुरलीधर दगडे (वय २७) या दोन सख्ख्या भावांचा सहभाग समोर आला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेला मोठ्या प्रमाणातील ऐवज हस्तगत केला. त्यामध्ये गंठन, मणी पाटली, फॅन्सी पाटली, काळमणी पाटली, टॉप्स, अंगठ्या, नथ तसेच विविध सोन्याचे दागिने आणि चांदीचे जोडवे यांचा समावेश आहे. हस्तगत केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ३१ लाख २६ हजार ८०० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या कारवाईमुळे रामेश्वर कॉलनीतील घरफोडीचा गुन्हा अत्यंत कमी वेळेत उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे. या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गिते आणि जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गाणपुरे यांचे मार्गदर्शन लाभले. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धुमके तसेच एमआयडीसी पोलीस पथकाने तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. अवघ्या २४ तासांत घरफोडीचा छडा लावत मोठ्या किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याने एमआयडीसी पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; चौघे गंभीर जखमी
पहाटेच्या सुमारास आसोदा-मुरबाड बायपासवर भीषण अपघातजळगाव | प्रतिनिधी : आसोदा ते मुरबाड बायपास रस्त्यावर सोमवारी पहाटे सुमारे ३ वाजेच्या सुमारास तवेरा आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात रावेर तालुक्यातील एका शेतमजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.शांतराम केशव पाटील (वय ५८, रा. शिंदखेडा, ता. रावेर) असे मृत शेतमजुराचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तवेरा वाहनातून काही मजूर प्रवास करीत असताना आसोदा-मुरबाड बायपासवर समोरून अथवा मार्गावरील ट्रकची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की तवेरा वाहनातील प्रवासी गंभीर जखमी झाले.या अपघातात शांतराम पाटील यांच्यासह रामचंद्र महाजन, ईश्वर महाजन, निखिल पाटील व चालक जितेंद्र रुपलकर हे जखमी झाले. अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, शांतराम पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच �जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली तसेच अपघातामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली. प्राथमिक तपासानंतर ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.मृत शांतराम पाटील हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने शिंदखेडा गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून शोककळा पसरली आहे.
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू; कथित छळ-धमकीच्या आरोपांनी खळबळ
सायन रेल्वे स्थानकात आत्महत्येचा प्रयत्न; उपचारादरम्यान ३१ ऑगस्टला मृत्यू | BMC MARD कडून स्वतंत्र व निष्पक्ष चौकशीची मागणी फलटण | प्रतिनिधी फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. राजेंद्र रुपनवार यांच्या अकाली निधनाची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. रुपनवार यांनी २७ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईतील सायन रेल्वे स्थानकात आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय उपचार सुरू असतानाच ३१ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, डॉ. रुपनवार यांच्या मृत्यूमागील परिस्थितीची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. धमकी आणि कथित छळाचे आरोप समोर आलेल्या माहितीनुसार, डॉ. रुपनवार यांनी काही व्यक्तींकडून आपल्याला त्रास तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. माजी मंत्री तानाजी सावंत यांचा पीए असल्याचा दावा करणाऱ्या प्रसाद कोंडे देशमुख यांच्यावरही त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. लीला मदने यांच्याकडूनही आपल्याला त्रास दिला जात असल्याचा आरोप डॉ. रुपनवार यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व आरोपांची अधिकृत चौकशी होणे आवश्यक असून, आरोपांची सत्यता तपासातूनच स्पष्ट होणार आहे. यापूर्वीही आत्महत्येचा इशारा? डॉ. रुपनवार यांनी यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या हातावर सुसाईड नोट लिहिल्याचेही सांगितले जात आहे. तसेच २९ ऑगस्टपूर्वी/दरम्यान सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून आत्महत्येचा इशारा दिल्याचा दावा करण्यात आला आहे. आपण केलेल्या तक्रारींकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही, असा आरोपही त्यांच्या बाजूने करण्यात आल्याचे समोर येत आहे. मात्र, या सर्व बाबींची अधिकृत नोंद, तपासातील निष्कर्ष आणि संबंधितांचे म्हणणे समोर आल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. BMC MARD आक्रमक; चौकशीची मागणी डॉ. राजेंद्र रुपनवार यांच्या निधनानंतर बीएमसी मार्ड (BMC MARD) कडून तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील एका तरुण डॉक्टरचा अशा प्रकारे मृत्यू होणे ही अत्यंत चिंताजनक आणि दुर्दैवी घटना असल्याचे संघटनेने म्हटले आहे. कामाच्या ठिकाणी होणारा कथित छळ, धमकी, दबाव तसेच बाह्य किंवा राजकीय हस्तक्षेपाचे आरोप गंभीर असल्याचे नमूद करत BMC MARD ने संबंधित अधिकाऱ्यांकडे या संपूर्ण प्रकरणाची वेळबद्ध, स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. संघटनेने छळ, धमकी, दबाव, जबरदस्ती किंवा बाह्य हस्तक्षेपाच्या सर्व आरोपांची पारदर्शक पद्धतीने चौकशी करून सत्य समोर आणावे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर या घटनेनंतर डॉक्टरांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि सन्मानाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोणत्याही डॉक्टरला भीती, धमकी, छळ किंवा अनुचित हस्तक्षेपाशिवाय आपले कर्तव्य बजावता यावे, यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची गरज BMC MARD ने व्यक्त केली आहे. दरम्यान, डॉ. रुपनवार यांच्या मृत्यूमागील नेमकी कारणे काय होती, त्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेण्यात आली होती का, तसेच त्यांच्या कथित आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, याचा तपास होणे महत्त्वाचे ठरणार आहे. डॉ. राजेंद्र रुपनवार यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, BMC MARD ने त्यांच्या कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त केल्या आहेत.
खरा आनंद नेमका कशात आहे?
आयुष्यात खरंच आनंदी राहायचं असेल, तर सर्वप्रथम आपल्याकडे काय नाही याचा विचार करण्यापेक्षा, आपल्याकडे काय आहे याचं समाधान मानायला शिकलं पाहिजे. कारण सुखाच्या शोधात आपण अनेकदा इतके दूर निघून जातो की, आपल्या जवळ असलेलं छोटंसं सुख, आपली माणसं आणि आयुष्यात मिळालेल्या सुंदर क्षणांकडे दुर्लक्ष करतो. माणसाच्या इच्छा कधीच संपत नाहीत. आज एखादी गोष्ट हवी असते, ती मिळाली की दुसऱ्या गोष्टीची इच्छा निर्माण होते. दुसरी मिळाली की तिसरी हवीशी वाटते. अशा प्रकारे आपण सतत काहीतरी मिळवण्याच्या प्रयत्नात असतो; पण मनाचं समाधान मात्र कुठेतरी मागेच राहून जातं. खरं पाहिलं तर सुख एखाद्या वस्तूमध्ये, पैशामध्ये किंवा मोठ्या यशामध्ये कायमचं लपलेलं नसतं. सुख म्हणजे आपल्या मनाची अवस्था आहे. आपल्याकडे जे आहे त्याची किंमत समजली, आपल्या माणसांची साथ जपली आणि प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद शोधायला शिकलो, तर साधं आयुष्यही खूप सुंदर वाटू लागतं. कधी एखाद्या गरम चहाच्या कपात आनंद असतो, कधी आपल्या माणसांसोबत केलेल्या दोन शब्दांच्या गप्पांमध्ये, कधी आई-वडिलांच्या चेहऱ्यावरच्या हास्यात, तर कधी एखाद्या शांत संध्याकाळी मनमोकळा श्वास घेण्यातही खूप मोठं सुख दडलेलं असतं. सुख मिळालं की आनंदी होईन, असं म्हणत राहिलो तर कदाचित संपूर्ण आयुष्य सुखाच्या प्रतीक्षेतच निघून जाईल. कारण सुखाला शेवट नसतो आणि इच्छा पूर्ण होण्याचीही सीमा नसते. म्हणून जे मिळालं आहे त्यात समाधान मानणं म्हणजे स्वप्नं सोडणं नव्हे; तर स्वप्नांचा पाठलाग करताना वर्तमानातील आनंदही जगणं होय. आयुष्य खूप छोटं आहे. उद्याच्या सुखासाठी आजचा दिवस दुःखात घालवू नका. भविष्यासाठी मेहनत नक्की करा, मोठी स्वप्नं नक्की पहा; पण त्या प्रवासात आजचा आनंद हरवू देऊ नका. शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा—आपल्याला हवं ते सगळं मिळालं तरच आपण आनंदी होऊ, असं नाही; तर आपल्याला जे मिळालं आहे त्यात आनंद शोधता आला, तरच आपण खरंच सुखी होऊ. कारण समाधान असलेल्या मनापेक्षा श्रीमंत माणूस जगात दुसरा कोणीही नाही. आनंद मिळवण्यासाठी आयुष्य बदलण्याची गरज नसते;फक्त आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असते. ❤️🌿
रक्षाबंधन अखेरचं ठरलं! भरधाव ट्रकने दुचाकीला उडवलं; बहीण-भावाचा जागीच मृत्यू
लातूर | प्रतिनिधीरक्षाबंधनाचा सण आटोपून कामानिमित्त बाहेर निघालेल्या बहीण-भावावर काळाने घाला घातला. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांच्यासोबत असलेली आई आणि चिमुकला पुतण्या गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी साडे दोनच्या सुमारास घडली.आजारी मावस बहिणीला भेटण्यासाठी निघाले होतेमिळालेल्या माहितीनुसार, कल्याणी घोबाळे यांची मावस बहीण नंदिनी भोसले आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी रेणापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी प्रतीक क्षीरसागर, त्यांची बहीण कल्याणी घोबाळे, आई आणि चिमुकला पुतण्या असे चौघे दुचाकीवरून लातूरहून रेणापूरकडे निघाले होते.रक्षाबंधनाचा सण नुकताच आटोपला होता. कुटुंबीयांसोबत सण साजरा केल्यानंतर आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी निघालेल्या या कुटुंबावर काही अंतरावरच नियतीने घाला घातला.रुग्णालयाजवळच भीषण अपघातदुचाकी रेणापूर ग्रामीण रुग्णालयाच्या काही अंतरावर पोहोचली असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, प्रतीक क्षीरसागर आणि कल्याणी घोबाळे यांचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर ट्रकने दोघांना जवळपास शंभर फूट अंतरापर्यंत फरफटत नेल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.आई आणि चिमुकला पुतण्या गंभीर जखमीया अपघातात माया क्षीरसागर आणि चिमुकला साई क्षीरसागर गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नागरिकांनी आणि स्थानिकांनी तातडीने मदत करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.रक्षाबंधनासाठी माहेरी आल्या होत्या कल्याणीमृत कल्याणी घोबाळे या काही दिवसांपूर्वी मुंबईहून माहेरी आल्या होत्या. रक्षाबंधनाचा सण साजरा केल्यानंतर आजारी असलेल्या मावस बहिणीला भेटून त्या पुन्हा मुंबईला जाणार होत्या. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. रेणापूरकडे जात असताना झालेल्या भीषण अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.रक्षाबंधनाच्या आनंदानंतर अवघ्या काही तासांतच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यातघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, ट्रकचा वेग किती होता आणि चालकाच्या निष्काळजीपणाची भूमिका होती का, याबाबत तपास केला जात आहे.रक्षाबंधनाचा सण आनंदात साजरा करून आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी निघालेल्या बहीण-भावाचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने रेणापूर परिसरात शोककळा पसरली आहे.


