नि.पं.पाटील विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा
पळासखेडे मिराचे दि १७ जुलै २०२५(प्रतिनिधी ) नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे शाळेत मातृहृदयी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पवार हे होते. सर्वप्रथम कै.आचार्य बापूसो. गजाननराव गरुड व कै. अण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष , संस्था संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक जे.आर.पाटील यांनी कै. आचार्य बापूंना अभिप्रेत असलेला विद्यार्थी याबद्दल मत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षक एस. जे. सोनवणे यांनी मनोगतात संस्थेची स्थापना व व्याप्ती याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी अध्यक्ष भाषणात कै.आचार्य गजाननराव बापूंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक व सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील,चंद्रशेखर काळे,अब्दुल नबी तांबोळी,डी. पी .पाटील, संजू पवार,.शालिक पाटील,अशोक माळी,बळीराम माळी,लता पाटील हे मान्यवर उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्षाली प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक – हितेश वर्जन चव्हाण तृतीय क्रमाक – ओम संतोष चौधरी यांनी मिळविला. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 50 शालेय गणवेश वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने ,सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जी.पी. पाटील यांनी केले तर आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले.
निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार एस.एस.सी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
पळसखेडे मिराचे, प्रतिनिधी : धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी, शेंदुर्णी संचलित निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय, पळसखेडे मिराचे येथे फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेत सेमी व मराठी माध्यमातून प्रथम पाच क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज दि. 9 मे रोजी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री व्ही. आर. पाटील सर प्रमुख उपस्थित होते. तसेच इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक श्री व्ही. डी. पाटील सर, श्री जी. पी. पाटील सर, श्री पी. के. राजपूत सर, श्री व्ही. ए. पाटील सर, सीनियर क्लार्क श्री के. आर. सोनवणे भाऊसाहेब तसेच ग्रंथपाल श्री डी. एस. बोरसे सर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. यावेळी विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी मुख्याध्यापक आदरणीय नानासाहेब यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत यशाची परंपरा कायम राखण्यासाठी मेहनत, सातत्य व शिस्त यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते.
जिकरा न्यू उर्दू विद्यालयाचा दहावीला 98.40 टक्के निकालकु. मिसबाह शेख विद्यालयात प्रथम; यशाबद्दल सर्वत्र कौतुक
जामनेर, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात जिकरा एज्युकेशन सोसायटी संचलित जिकरा न्यू उर्दू माध्यमिक विद्यालय, जामनेर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयाचा एकूण निकाल 98.40 टक्के लागल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परीक्षेत कु. मिसबाह आसिफ शेख हिने 84.80 टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला. कु. अहेनिश नईम खान हिने 83.40 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर मोहम्मद अकदस निसार अहमद यांनी 83.20 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक संपादन केला. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रहीम शेख तसेच सचिव जाकीर शेख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे प्राचार्य इरशाद खान सर व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन करून त्यांच्या यशात मोलाचा वाटा उचलला. तसेच संस्थेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला असून परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गरुड विद्यालयाची एसएससी परीक्षेत गरुड झेपशेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधीविद्यालयाची गौरी शिनकर तालुक्यातून द्वितीय,सेमी विभागाचे प्रथम पाच विद्यार्थी शेंदुर्णी केंद्रातून प्रथम
शेंदुर्णी, प्रतिनिधी : धी. शेंदुर्णी से. एज्युकेशन को-ऑप. सोसायटी संचलित आ.ग.र. गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, शेंदुर्णी येथील एसएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाने 94.90 टक्के इतका उल्लेखनीय निकाल मिळविला आहे. विशेष म्हणजे सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विद्यालयातून एकूण 471 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 447 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेत 201 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य संपादन केले असून 34 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. सेमी माध्यमातून कु. गौरी गोपाल शिनकर हिने 97 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. कु. मानसी अमोल पाटील व कु. गौरी संजय आगे यांनी प्रत्येकी 96.40 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. कु. स्नेहल दगडू घनघाव हिने 96 टक्के गुणांसह तृतीय, कु. वैष्णवी मोहन पाटील हिने 95.60 टक्के गुणांसह चतुर्थ तर चि. दर्शन मनोज कापुरे याने 94.80 टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला. मराठी माध्यमातून चि. हितेश दीपचंद जाधव याने 90.20 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. कु. खुशी सुनील डांबरे हिने 89.60 टक्के गुणांसह द्वितीय, कु. मयुरी गणेश पाटील हिने 89 टक्के गुणांसह तृतीय, कु. हर्षाली अमर सूर्यवंशी हिने 87 टक्के गुणांसह चतुर्थ तर कु. चेतना हिम्मत मोहने हिने 86.60 टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरुड, व्हॉइस चेअरमन आबासो भीमराव शेळके, सचिव काकासो सागरमलजी जैन, सहसचिव दादासो यू.यू. पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसो दीपकजी गरुड, वस्तीगृह सचिव गो.गो. सूर्यवंशी, महिला संचालिका ताईसो उज्वला काशीद तसेच सर्व संचालक मंडळ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती पी.एस. पाटील, उपप्राचार्य बी.एम. कुमावत, पर्यवेक्षक जे.एस. जुबंळे, विनोद पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जामनेर येथे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोहर पाटील यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न…
जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी -सुपडू जाधवजामनेर : येथील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोहर पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार व गौरव सोहळा मोठ्या दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलिस उपअधीक्षक श्री. प्रभाकर रायते हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सेवानिवृत्तीनंतरचा काळ परिवारासोबत घालवताना समाजसेवेतही सक्रिय राहण्याचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शाखाली जनतेची सेवा करत समाजाच्या दुःखात सहभागी होणे हेच खरे कार्य असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष श्री. अशोक शिंदे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्यामागील राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि स्वराज्याच्या विचारांची प्रेरणा यावर भाष्य केले. शिवरायांनंतरही औरंगजेबाविरुद्धचा लढा महाराष्ट्राने स्वराज्याच्या विचारांनीच कायम ठेवला, असे सांगत त्यांनी उपस्थित महिलांना भावी पिढीमध्ये स्वराज्यनिष्ठ विचार रुजविण्याचे आवाहन केले. मनोहर पाटील यांचे कार्य समाजातील अंतिम घटकापर्यंत पोहोचले असून त्यांच्या कुटुंबाचे योगदानही विविध सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण राहिले आहे. त्यामुळेच या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. यावेळी गरीब कुटुंबातील होतकरू युवक राहुल कुमावत यांनी पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदाला गवसणी घातल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठान व आझाद मित्र मंडळाच्या वतीनेही त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी राहुल चव्हाण यांनी आपल्या मनोगतात मनोहर पाटील यांच्या ३२ वर्षांच्या निरंतर पोलिस सेवेचे कौतुक करताना “एखाद्या कार्यात स्वतःला पूर्णपणे झोकून देणे म्हणजे त्या वातावरणाचाच एक भाग होणे,” असे मत व्यक्त केले. “आजच्या कार्यक्रमात प्रत्येक क्षेत्रातील बाप माणूस उपस्थित आहे. प्रत्येकजण आपल्या क्षेत्रात मोठा असतो. मामा यांच्या पोलिस सेवेतील कार्याची साक्ष आज येथे उपस्थित असलेला जनसमुदाय देत आहे,” असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमास मुरलीधर कासार, जितेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष डॉ.प्रशांत भोंडे,नगरसेवक महेंद्र बाविस्कर, मा.नगरसेवक दिपक तायडे,नगरसेवक अतिश झाल्टे, अमोल चव्हाण,डॉ. बेंद्रे, प्रकाश पाटील, सुभाष पवार,जगदीश बैरागी, कमलेश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश पाटील यांनी केले सूत्रसंचालन राजेंद्र भोसले यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार एकेश मनोहर पाटील यांनी मानले.
शॉर्टसर्किटमुळे ज्वारीच्या गंजीला आग; शेतकऱ्यांचे मोठे नुकसानरांजणी येथे दुर्दैवी घटना; पंचनाम्यासह तातडीच्या मदतीची मागणी
रांजणी, प्रतिनिधी — रांजणी येथे विजेच्या लोंबकळलेल्या तारांमुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे शेतातील ज्वारीच्या गंजीला आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. या आगीत शेतकरी कौसल्याबाई जगदेव मगरे यांच्या शेतातील नुकतीच कापणी करून पुंज मारून ठेवलेली ज्वारी पूर्णपणे जळून खाक झाली.दुपारच्या सुमारास ही घटना घडली. परिसरातील विजेच्या तारांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ठिणग्या पडून ज्वारीच्या गंजीने पेट घेतला. आग वेगाने पसरल्याने शेतमाल वाचविण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.हाता-तोंडाशी आलेला घास आगीत जळाल्याने मगरे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. शेतीसाठी मोठ्या मेहनतीने व खर्च करून तयार केलेला माल काही क्षणांत नष्ट झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.दरम्यान, परिसरातील अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकलेले असून तारा लोंबकळत असल्याची गंभीर समस्या नागरिकांनी मांडली आहे. अशा धोकादायक परिस्थितीकडे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यातही अशा दुर्घटना घडू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. केवळ वीजबिल वसुलीवर भर देणाऱ्या वीज वितरण विभागाने तातडीने दुरुस्ती व देखभाल कामे करावीत, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
जामनेरात स्विमिंग पुलाच्या आउटलेट असलेल्या चेंबर मध्ये ५ वर्षाच्या मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू.दर्शनपार्क व एकुलती गावावर शोककळा.
जामनेर (प्रतिनिधी):- येथील सोनेश्वर मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या स्विमिंग पुलाच्या आउटलेट असलेल्या हौदात ५ वर्ष वय असलेल्या कार्तिक ऊर्फ उत्कर्ष गणेश पाटील या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दी.३ रोजी संध्याकाळी ठीक ५ ते ६ वाजेच्या सुमारास घडली आहे.त्याचे सविस्तर असे की, मूळचे एकुलती येथील रहिवाशी व हल्ली दर्शन पार्क येथे स्थाईक असलेले व संजय दादा गरूड यांच्या संस्थेत तोंडापूर येथे क्लार्क म्हणून कार्यरत असलेले गणेश पाटील हे आपल्या ५ वर्षाच्या कार्तिक व आपल्या मुलीसह स्विमिंग पुलात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते. संध्याकाळी पोहण्याचा आनंद घेतल्या नंतर ते ओले झालेले कपडे बदलवण्यासाठी आपल्या मुलांना घेऊन रूम मध्ये गेले होते. मात्र कार्तिक हा त्यांची नजर चुकवून आउटलेटचे वाहते पाणी बघून त्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी पुढे पुढे जात आउटलेटचे पाणी ज्या ठिकाणी जमा होते. त्या चेंबर पर्यन्त गेला असता त्याचा चेंबर मध्ये तोल जाऊन तो चेंबर मध्ये असलेल्या पाण्यात बुडाल्याची माहिती स्थानिक रहिवाश्यांनी दिली असून एक मिनिटही न सोडणाऱ्या गणेश पाटील व त्यांच्या फॅमिलिवर मात्र कार्तिकच्या जाण्याने वज्रघात झाला आहे. या ठिकाणी घडलेल्या घटनेची चर्चा होताच कार्तिकला शोधण्यासाठी बरेच लोक स्विमिंग पुलाच्या पाण्यात उतरून शोध घेत होते. मात्र आउटलेटच्या पाण्याकडे कोणाचेही लक्ष न गेल्याने कार्तिकला शोधायला बराच वेळ लागला त्यामुळे त्याला जीवदान देता आले नाही. अशी खंत उपस्थित शोध कार्य करणाऱ्या लोकांनी व्यक्त केली आहे. तरीही त्याठिकाणी सुरक्षितता म्हणून ज्या ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. त्यांचे ट्रेनर वा सिक्युरिटी गार्ड त्या ठिकाणी नसल्याची चर्चा शहरात होतांना दिसून येत आहे. कदाचीत त्यामुळे कार्तिक चा जीव वाचवता आला असता अशी खंत व्यक्त करतांना जामनेर नागरीक दिसून येत आहे.कार्तिक च्या पच्च्यात आई, वडील, काका, आजी, आजोबा, काका,काकू आणि ११ वर्षाची बहीण असा परिवार आहे.
पाचोरा येथे फळ विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू
पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात फळ विकणाऱ्या आनंद भोई या फळ विक्रेत्याचा मृत्यू उष्मघाताने मृत्यू झाल्याचा संशय जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात 32 वर्ष तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून आनंदा भोई असे मृत्यू झालेल्या फळ विक्रेत्या तरुणाचे नाव आहे. उष्माघातामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय हा व्यक्त केला जात आहे. फळ विक्री करताना फळ विक्रेत्या तरुणाची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या त्यास मृत घोषित केले.
अटलांटा प्रकरण मुख्यमंत्र्यांचे फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश
जळगाव (नितीन सोनवणे) : मुंबईतील वर्षा बंगला येथे आज सायंकाळी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत जळगाव महानगरपालिकेशी संबंधित अटलांटा कन्स्ट्रक्शन प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले.जळगाव शहर पोलीस ठाण्यात अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध नगरसेवक अरविंद देशमुख यांनी यापूर्वीच फौजदारी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत महापालिकेची आर्थिक फसवणूक, विश्वासघात आणि कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.आज या पार्श्वभूमीवर नामदार गिरीश महाजन आमदार राजू मामा भोळे, नंदू आडवाणी, मनोज काळे आणि तक्रारदार नगरसेवक अरविंद देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत अरविंद देशमुख यांनी स्वतः दाखल केलेल्या तक्रारीचा सविस्तर संदर्भ मांडत प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट केली.मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण बाब गांभीर्याने ऐकून घेतल्यानंतर तात्काळ दखल घेत जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढोरे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधत सरकारी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले, अशी माहिती समोर आली आहे.या आदेशामुळे अटलांटा प्रकरणातील तपास प्रक्रियेला अधिकृत गती मिळणार असून, महापालिका प्रशासनाकडून थेट कारवाई होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, आधीच नगरसेवक अरविंद देशमुख यांनी दाखल केलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित झाली होती; आता त्याच संदर्भावर शासनस्तरावरून ठोस पाऊल उचलले गेल्याने दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.जळगाव शहरात या घडामोडीमुळे मोठी राजकीय व प्रशासकीय हालचाल निर्माण झाली असून, संपूर्ण प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तोरनाळेनजीक दुचाकीची ट्रॅक्टरला धडकपती-पत्नीचा जागीच मृत्यू,दीड वर्षांची चिमुकली सुदैवाने बचावली
वाकडी.ता.जामनेर.दि.२३/०४/२६ जामनेर । मुलीला डॉक्टरांकडे दवाखान्यात दाखवून घराकडे परत जात असलेल्या दुचाकीवरील पती-पत्नीचा बुधवारी रात्री जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना तोरनाळे गावाजवळ घडली. सुदैवाने दीड वर्षाची मुलगी बचावली आहे. जामनेर देऊळगाव गुजरी रस्त्यावर हा अपघात झाला. गोपाल वासुदेव खडके (३६) व सोनाली गोपाल खडके (३० रा. सावळतबारा, ता. सोयगाव) हे पती पत्नी फत्तेपुर येथुन सावळतबारा गावाकडे परत जात असतांना तोरनाळे गावाजवळ रस्त्यावर उभे असलेल्या नादुरुस्त ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. यात खडके दांपत्याचा जागीच मृत्यु झाला. जामनेर येथील आरोग्यदुत जालमसींग राजपुत यांनी त्यांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात रात्री आणले. या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली असुन गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे.तोरणाळा येथील स्मशानभूमी जवळ झालेल्या या भीषण अपघगातात एक वर्षाची चिमुकली मुलगी चमत्कारिकरित्या बचावली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, धडक बसल्यानंतर गोपाळ खडके आणि सोनाली खडके हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. गंभीर दुखापत झाल्यामुळे या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या सोबत असलेली त्यांची एक वर्षाची लहान मुलगी देखील होती. मात्र, निसर्गाचा चमत्कार म्हणावा की दैव बलवत्तर, इतक्या भीषण अपघातात या चिमुकलीचे प्राण सुदैवाने वाचले आहेत.
सकल मराठा समाज बैठक जामनेर येथे उत्साहात पार पडली
जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर प्रतिनिधीजामनेर येथे सकल मराठा समाजाची महत्वाची बैठक उत्साहात व संघटनात्मक वातावरणात पार पडली. आगामी राज्यव्यापी कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर समाजबांधवांना संघटित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.राजमाता जिजाऊ यांच्या माहेरचे वंशज शिवाजी राजे जाधव यांचे मार्गदर्शनशिवाजी राजे जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनात राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज अधोरेखित केली.राजमाता जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा ते स्मृतीस्थळ पाचाड (रायगड) या जिजाऊ अभिवादन यात्रेत जामनेर तालुक्यातून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले. ही यात्रा केवळ श्रद्धेची नसून मराठा समाजाच्या एकतेचे व विचारप्रसाराचे प्रभावी माध्यम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. अशोक शिंदे यांचे विचारअशोक शिंदे यांनी आपल्या भाषणात मराठा समाजाने आपल्या गौरवशाली इतिहासाची जाणीव कायम ठेवावी, असे आवाहन केले.राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांवर आधारित संघटनात्मक कार्य उभारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.छत्रपती शिवाजी ब्रिगेड अन्यायाविरुद्ध ठामपणे आवाज उठवत असून समाजाच्या प्रत्येक प्रश्नात सक्रियपणे हस्तक्षेप करत आहे. समाजातील एकोपा वाढवून न्यायासाठी लढण्याची भूमिका अधिक मजबूत करण्याचे त्यांनी आवाहन केले. अध्यक्षीय भाषण – प्रकाश पाटीलकार्यक्रमाचे अध्यक्ष भाग्योदय कलेक्शनचे श्री. प्रकाश पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठा समाजातील तरुणांना उद्योग-व्यवसाय क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन केले.छोटा असो वा मोठा व्यवसाय, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक तरुण उद्योजकाच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज ठामपणे उभा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक – राहुल चव्हाणकार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल चव्हाण यांनी केले.त्यांनी सांगितले की, १४ जून ते १७ जून दरम्यान होणाऱ्या जिजाऊ अभिवादन यात्रेसाठी ग्रामपातळीवर बैठका आयोजित करून मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. मागील तीन वर्षांपासून आपण यात्रेत सहभागी होत आहोत, मात्र यंदा विक्रमी सहभाग नोंदवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. इतर मान्यवरांची उपस्थितीया बैठकीस अशोक आप्पा जाधव, समाधान वाघ, सुपडू पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.बैठकीत दिलीप खोडपे सर, व्ही.पी. पाटील सर, पप्पू पाटील, कैलास पाटील, ईश्वर पवार, अशोक पाटील, दिलीप पाटील, ईश्वर चवरे, रवि बंडे, सागर पाटील, दिपक पाटील, राहुलरॉय मुळे, सागर मराठे यांच्यासह असंख्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनकार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल ठोंबरे यांनी केले.या बैठकीतून मराठा समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी ठोस दिशा देण्यात आली असून, आगामी जिजाऊ अभिवादन यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात जनसहभाग घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.


