बुधवार, 3 जून, 2026
जामनेर प्रतिनिधी सुपडू जाधव जामनेर तालुक्यात अवैध गावठी दारू निर्मिती व विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी आणि व्यापक धडक मोहीम राबवत हातभट्टी व्यवसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये सलग छापेमारी करून विभागाने ८ गुन्हे दाखल केले असून जवळपास २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून घटनास्थळीच नष्ट करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून परिसरात कायद्याचा धाक निर्माण झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय उपआयुक्त उषा वर्मा यांच्या आदेशानुसार तसेच जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम
राबविण्यात आली. अवैध मद्यनिर्मिती,
साठवणूक आणि विक्री रोखण्यासाठी
विभागाने विशेष पथकाची नियुक्ती करून
तालुक्यातील संवेदनशील भागांमध्ये
नियोजनबद्ध कारवाई केली. या मोहिमेत राज्य
उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक के. एन.
गायकवाड,

दुय्यम निरीक्षक एस. पी. कुटे
तसेच जवान योगेश राठोड यांनी सक्रिय
सहभाग घेतला. पथकाने २९ मे ते २ जून या
कालावधीत जामनेर तालुक्यातील नेरी, शेंदुर्णी,
पळासखेडा, नाचणखेडा आणि भागदरा या
गावांमध्ये सलग छापेमारी करून अवैध
हातभट्ट्यांचा शोध घेत कारवाई
केली. कारवाईदरम्यान पथकाला मोठ्या
प्रमाणात गावठी दारू निर्मिती सुरू असल्याचे
आढळून आले. छाप्यांमध्ये २८५ लिटर तयार
गावठी दारू जप्त करण्यात आली. याशिवाय
दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे

४ हजार
२६० लिटर कच्चे रसायन (वॉश) देखील जप्त
करण्यात आले. या सर्व मुद्देमालाची एकूण
अंदाजित किंमत १ लाख ९८ हजार ८८० रुपये
इतकी असल्याचे विभागाने स्पष्ट केले
आहे. विशेष म्हणजे, जप्त केलेली गावठी दारू
व कच्चे रसायन यामुळे नागरिकांच्या
आरोग्यास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन संपूर्ण मुद्देमाल घटनास्थळीच नष्ट करण्यात आला. त्यामुळे अवैध मद्यनिर्मितीचे संभाव्य जाळे उद्ध्वस्त करण्यात विभागाला यश आले आहे. या प्रकरणात संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार एकूण ८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू असून अवैध मद्यनिर्मिती व विक्री साखळीतील इतर संबंधितांचा शोध घेण्याचे कामही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने

अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्रीविरोधातील कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ग्रामीण भागात हातभट्टी व्यवसायाला आळा घालण्यासाठी नियमित छापेमारी, गुप्त माहिती संकलन आणि विशेष मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे विभागाने सांगितले. दरम्यान, जामनेर तालुक्यातील या धडक कारवाईमुळे अवैध दारूव्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडूनही या कारवाईचे स्वागत केले जात आहे. कायद्याचे उल्लंघन करून गावठी
दारू निर्मिती करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या यशस्वी मोहिमेमुळे अवैधमद्यनिर्मितीविरोधातील लढ्याला नवीधार मिळाल्याचे मानले जात आहे.
