खान्देशचा झेंडा थेट ‘बिगबॉस मराठी ६’ मध्ये; शेंदुर्णीचा अहिराणी सुपरस्टार सचिन कुमावत यांची ऐतिहासिक एन्ट्री

शेंदुर्णी (ता. जामनेर | जि. जळगाव) –कलर्स मराठीवरील बहुचर्चित रिअॅलिटी शो ‘बिगबॉस मराठी – सिझन ६’ मध्ये खान्देशच्या मातीतून घडलेल्या एका कलाकाराने थेट महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या मनोरंजन मंचावर झेप घेत इतिहास रचला आहे. अहिराणी भाषेला राज्यभर ओळख मिळवून देणारे खान्देशचा आवाज – सचिन विठ्ठल कुमावत यांनी काल (११ जानेवारी) भव्य उद्घाटन सोहळ्यात बिगबॉसच्या घरात प्रवेश करत संपूर्ण खान्देशचा अभिमान वाढवला.अभिनेता रितेश देशमुख यांच्या होस्टिंगमध्ये सुरू झालेल्या या सिझनच्या पहिल्याच दिवशी सचिन कुमावत यांच्या दमदार आणि आत्मविश्वासपूर्ण एन्ट्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ग्रामीण भागातून आलेला कलाकार अहिराणी भाषेचा अभिमान जपत मंचावर उभा राहिल्याने सोशल मीडियावरही त्यांच्या एन्ट्रीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेंदुर्णीसारख्या ग्रामीण भागातून कोणतेही राजकीय किंवा कौटुंबिक पाठबळ नसताना स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे सचिन कुमावत आजही आपल्या गावाशी, मित्रपरिवाराशी घट्ट नाळ जपून आहेत. साधेपणा आणि मातीशी नातं टिकवून ठेवणं हीच त्यांची ओळख आहे.सन २००५ मध्ये ‘आरं दाजीबा’ या पहिल्या अल्बमपासून संगीत प्रवासाला सुरुवात करणाऱ्या सचिन कुमावत यांनी गेल्या दोन दशकांत खान्देशी लोककलेला आधुनिक व्यासपीठावर नेले. ‘केसांवर फुगे’, ‘लगनमा मचाडू धूम’, ‘सावन महिना मा’, ‘पोरी तुना गजरा’, ‘वाडी वाडी चंदन वाडी’, ‘टमटम’, ‘मनी डार्लिंग’, ‘मामी तुमची मुलगी लय सुंदर’, ‘खान्देशनी जत्रा’ यांसारखी असंख्य गाणी सुपरहिट ठरली आहेत.विशेष म्हणजे ‘केसांवर फुगे’ या गाण्याने यूट्यूबवर २८७ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळवत अहिराणी–मराठी संगीत क्षेत्रात नवा इतिहास रचला. आज त्यांच्या यूट्यूब चॅनेलला एकूण १.२ बिलियनहून अधिक (१२० कोटींपेक्षा जास्त) व्ह्यूज मिळाले असून, ग्रामीण भागातून एवढे मोठे डिजिटल यश मिळवणारा ते पहिले खान्देशी कलाकार ठरले आहेत.आतापर्यंत २५० पेक्षा अधिक लाईव्ह स्टेज शो, ५०० हून अधिक खान्देशी-अहिराणी व्हिडीओ अल्बम, तसेच Music Marathi, 9X Marathi, मायबोली यांसारख्या वाहिन्यांवर सातत्याने सादरीकरण असा त्यांचा कलात्मक प्रवास थेट बिगबॉसच्या घरापर्यंत पोहोचला आहे. याशिवाय लवकरच प्रदर्शित होणारा “ज्याची करावी कीव तोच घेतो जीव” हा त्यांचा आगामी चित्रपटही प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत आहे.खान्देश भूषण, गिरणा गौरव, गोदा सन्मान, महाराष्ट्राचा Reel Star Award यांसारख्या अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या सचिन कुमावत यांच्या कारकिर्दीत बिगबॉस मराठी हे आणखी एक सुवर्णपान जोडले गेले आहे.सचिन कुमावत यांची ही एन्ट्री केवळ एका कलाकाराचे यश नसून, संपूर्ण खान्देश आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रतिभेचा विजय असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

Read More

माजी सभापतींच्या पतीची आत्महत्या; चिठ्ठ्या सापडल्याने गूढ वाढले

जामनेर, ता.२२ (प्रतिनिधी) जामनेर शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनबर्डी परिसरातील एका निर्जनस्थळी माजी सभापती सुनंदाबाई पाटील यांचे पती प्रल्हाद पाटील (वय ६२, रा. मोयखेडा, ता. जामनेर) यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली असून, मयत प्रल्हाद पाटील यांच्या खिशात काही चिठ्ठ्या सापडल्याची प्राथमिक माहिती मिळत असल्याने आत्महत्येमागील गूढ वाढले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मोयखेडा येथील रहिवासी असलेले प्रल्हाद पाटील यांनी आज संध्याकाळी सोनबर्डी परिसराच्या मागील बाजूस असलेल्या एका निर्जनस्थळी झाडाला गळफास लावून आपले जीवन संपवले. प्रल्हाद पाटील हे व्यवसायाने शिक्षक होते आणि त्यांनी २०२१ साली स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्याच सुमारास त्यांच्या पत्नी सुनंदाबाई पाटील जामनेर पंचायत समितीच्या सभापती म्हणून कार्यरत होत्या.घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्रल्हाद पाटील यांनी आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठ्यांमुळे आत्महत्येमागे काही कारण असावे असा पोलिसांना संशय आहे. जामनेर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.प्रल्हाद पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून आणि तीन नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येने मोयखेडा आणि जामनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Read More

रेल्वे अपघातात जवानाचा दुर्दैवी मृत्यू ,मूळ गावी दोंदवाडे (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडला

प्रतिनिधी श्रीरामपूर – भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले वीर जवान गणर जयवंत दिलीप परदेशी (आर्मी क्रमांक- 21022154X) यांचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 16 जानेवारी 2025 रोजी रात्री 8.00 वाजता घडली. जयवंत परदेशी हे श्रीरामपूर येथे आपल्या आजी-आजोबांच्या भेटीसाठी आले असताना अचानक समोरून येणाऱ्या गाडीची धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची नोंद घेतली. जवानाचे पार्थिव शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, श्रीरामपूर येथे पाठवण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर भारतीय सैन्यदलाने त्यांच्या पार्थिवाला सन्मानपूर्वक त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. गणर जयवंत दिलीप परदेशी हे कलकत्ता येथे सैन्यदलात कार्यरत होते. सुट्टीसाठी श्रीरामपूर येथे आले असताना रेल्वे अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 7.15 वाजता त्यांच्या मूळ गावी दोंदवाडे (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे शासकीय इतमामात आणि चालीरीतीनुसार अंत्यविधी पार पडला. त्यानंतर आज 25 जानेवारी 2025 रोजी दशक्रिया विधी कार्यक्रम संपन्न झाला असून तेरवीचा बछडीचा कार्यक्रम मंगळवार, 22 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. घटनेनंतर नामदार गिरीश महाजन यांच्या पत्नी साधनाताई महाजन यांनी कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि कुटुंबाला धीर दिला. वीर जवान जयवंत दिलीप परदेशी हे कुटुंबातील एकमेव कमावते होते. त्यांच्या पश्चात आई-वडील व एक बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली असून कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

Read More

मोठी बातमी! पुढच्या वर्षापासून देशात जनगणना सुरू होऊ शकते; केंद्र सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत

केंद्र सरकारकडून करण्यात येत असलेल्या जनगणनेची (Census) माहिती समोर आली आहे. पुढील वर्षापासून देशात जनगणना सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जनगणना 2025 पासून सुरू होईल आणि 2026 पर्यंत चालेल. 2021 मध्ये जनगणना होणार होती. परंतु, कोविड महामारीमुळे जनगणना पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे देशात पुढच्या वर्षात जनगणना करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत मोदी सरकार आहे, अशी माहिती मिळत आहे. पुढच्या वर्षापासून देशात जनगणना केली जाणार असून आता आता जनगणनेचे चक्रही बदलणार आहे. आत्तापर्यंत 1991, 2001, 2011 इत्यादी दशकाच्या सुरुवातीला दर दहा वर्षांनी जनगणना केली जात होती. पण, आता 2025 नंतर पुढील जनगणना 2035, 2045, 2055 अशी केली जाणार आहे. जनगणना पूर्ण झाल्यानंतर लोकसभेच्या जागांचं सीमांकन सुरू होईल, 2028 पर्यंत सीमांकन प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. अनेक विरोधी पक्षांकडून जात जनगणनेची मागणी होत आहे, मात्र सरकारनं अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. जनगणनेत धर्म आणि वर्ग विचारले जातात. सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि जमातीची गणना केली जाते. यावेळी लोकांना ते कोणत्या पंथाचे अनुयायी आहेत, हे देखील विचारलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ, कर्नाटकात, लिंगायत, जे सामान्य श्रेणीतील आहेत, ते स्वतःला एक वेगळा पंथ मानतात. त्याचप्रमाणे अनुसूचित जातींमध्ये वाल्मिकी, रविदासी, असे विविध पंथ आहेत. म्हणजेच धर्म, वर्ग आणि पंथाच्या आधारावर जनगणना करण्याच्या मागणीवर सरकार विचार करत आहे, अशी माहिती मिळत आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!