Jalgaon
तालुका क्रीडा नियोजन बैठक ठरली फलदायी; प्रा. समीर घोडेस्वार, ऋग्वेद पेडगांवकर व कार्तिकी लामखेडे यांचा सन्मान
जामनेर, ता.१६ जुलै:महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि पंचायत समिती, जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या नियोजनासाठी सहविचार सभा दिनांक १६ जुलै रोजी दुपारी ११ वा. पंचायत समिती, जामनेर येथे उत्साहात संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी क्रीडा अधिकारी सचिन निकम, विशाल बोडके, गटशिक्षणाधिकारी विष्णू काळे, विस्तार अधिकारी संजय पाटील, स्पर्धा समिती सचिव जी.सी. पाटील, मुख्याध्यापक शेख जलाल, गटसाधन केंद्र समन्वयक पंकज रानोटकर यांसह तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी डॉ. आसिफ खान यांनी चालू शैक्षणिक वर्षातील विविध क्रीडा योजना, क्रीडा शिक्षकांच्या योगदानाचे सन्मान, ‘लाईफटाईम अचीवमेंट’ पुरस्कार, व विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या शाळांचा गौरव अशा महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर माहिती दिली. याशिवाय तालुक्यातील १० प्रमुख खेळांची नियोजनपूर्वक आखणी व शालेय पत्रिकेविषयी चर्चा झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी ‘माझी शाळा – सुंदर पटांगण’ ही अभिनव संकल्पना मांडून, शाळांमध्ये खेळांच्या अद्ययावत सुविधा व उत्स्फूर्त सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी उपस्थित शिक्षकांच्या शंकांचे निरसनही त्यांनी केले. या प्रसंगी विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा गौरव करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक श्रीपाद पेडगावकर यांचे चिरंजीव ऋग्वेद यांनी इ.८ वी स्कॉलरशिप परीक्षेत तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल तर वाकी बुद्रुक येथील सरपंच व क्रीडा शिक्षक ललित लामखडे यांच्या कन्या कार्तिकी हिने इ.१० वी बोर्ड परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आले. तसेच इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. समीर घोडेस्वार यांना जिल्हास्तरीय सुलभक म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सभेचे सूत्रसंचालन डॉ. आसिफ खान यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा.समीर घोडेस्वार यांनी केले.या बैठकीस तालुक्यातील ७२ क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेच्या यशस्वीतेसाठी डी के चौधरी, नरेंद्र पाटील, व्ही एन पाटील, आनंद मोरे, पी डी पाटील, शाहिद शेख जहीर खान, देवा पाटील आदी.परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि शालेय गणवेश वाटप करून तोंडापूर विद्यालयात संस्था वर्धापन दिन उत्साहात संपन्न….
तोंडापूर येथील श्रीमती र. सु.जैन माध्यमिक विद्यालयात शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा 81 वा वर्धापन दिन, एस.एस.सी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून व वस्तीगृहातील सर्व विद्यार्थी तसेच इतर गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.नामदेव पल्हाळ हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीस ईशस्तवन व स्वागत गीत सादर करून प्रतिमांचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.डी.रोनखेडे यांनी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा इतिहास व शाळेने वर्षभरात केलेली उज्वल कामगिरी आपल्या प्रास्ताविकातून सादर केली. तद्नंतर वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची मनोगते सादर करण्यात आली. त्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. एस.एस.सी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, भेटवस्तू व बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून संस्थेबद्दल ऋण व्यक्त केले. क्रीडा स्पर्धेतील खेळाडू व सीड्स बॉल तयार करण्याच्या स्पर्धेतील विजेत्यांचा गुणगौरव यावेळी करण्यात आला.याप्रसंगी जामनेर येथील दातृत्व लाभलेले व्यक्तिमत्व महेंद्र सोनवणे व ज्योती सोनवणे या दांपत्याकडून सालाबाधाप्रमाणे वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांना व शाळेतील इतर गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना तब्बल 20 हजार रुपये किमतीचे गणवेश मान्यवरांच्या शुभ हस्ते वितरित करण्यात आले. यावेळेस सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलून आलेला होता.स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष दिगंबर पाटील तसेच कुंभारी येथील माजी सरपंच सुरता जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण नामदेव पल्हाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.सी.लोडते यांनी केले तर आभार प्रदर्शन एस. एस.देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते शालेय प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.
नि.पं.पाटील विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा
पळासखेडे मिराचे दि १७ जुलै २०२५(प्रतिनिधी ) नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे शाळेत मातृहृदयी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पवार हे होते. सर्वप्रथम कै.आचार्य बापूसो. गजाननराव गरुड व कै. अण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष , संस्था संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक जे.आर.पाटील यांनी कै. आचार्य बापूंना अभिप्रेत असलेला विद्यार्थी याबद्दल मत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षक एस. जे. सोनवणे यांनी मनोगतात संस्थेची स्थापना व व्याप्ती याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी अध्यक्ष भाषणात कै.आचार्य गजाननराव बापूंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक व सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील,चंद्रशेखर काळे,अब्दुल नबी तांबोळी,डी. पी .पाटील, संजू पवार,.शालिक पाटील,अशोक माळी,बळीराम माळी,लता पाटील हे मान्यवर उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्षाली प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक – हितेश वर्जन चव्हाण तृतीय क्रमाक – ओम संतोष चौधरी यांनी मिळविला. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 50 शालेय गणवेश वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने ,सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जी.पी. पाटील यांनी केले तर आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले.
कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप, पहूर येथील कार्यक्रम यशस्वी
कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप, पहूर येथील कार्यक्रम यशस्वी पहूर प्रतिनिधी: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने पहूर येथे गृहपयोगी वस्तू वाटपाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला स्थानिक कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि नियोजनबद्ध कामामुळे शेवटच्या व्यक्तीपर्यंत भांडी पोहोचू शकली, ज्यामुळे कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या दोन-तीन दिवसांत नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने काही प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, स्थानिक कार्यकर्ते, नेते आणि पुढारी यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अहोरात्र मेहनत घेतली. गर्दीचे योग्य नियोजन करून, प्रत्येक पात्र लाभार्थ्याला गृहपयोगी वस्तू मिळाल्याची खात्री केली. ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत भांडी पोहोचवण्यात आली, याचे समाधान लाभार्थ्यांमध्ये स्पष्टपणे दिसत होते.याप्रसंगी खालील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतलीपहूर भारतीय जनता पक्ष कार्यालयांचे प्रमुख राहुल ढेंगाळे, व सरपंचपती शंकर जाधव, उपसरपंच राजू जाधव, चेतन रोकडे,जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख तसेच वासुदेव घोंगडे, रामेश्वर पाटील, समाधान पाटील, राजेंद्र पांडे, शाम सावळे, महेश पाटील, लक्ष्मण गोरे, ईश्वर बारी, सलीम शेख, भारत पाटील, संदीप बेढे, मधुकर बनकर, शिवाजी राऊत, शरद बेलपत्रे, योगेश बनकर, शुभम गोधनखेड़े यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले
प्रविण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
प्रविण दादा गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कार्यवाहीची मागणी!!संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, बामसेफ यांच्यासह परिवर्तन वादी संघटना कडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !!! शिवतीर्थावर प्रवीण गायकवाड यांच्या प्रतिमेस घातला दुग्धाभिषेक!!! ! जळगाव (प्रतिनीधी)जळगाव जिल्हा संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ बामसेफ यांच्यासह परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा.प्रविणदादा गायकवाड यांच्या प्रतिमेस शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाजवळ दुग्धाभिषेक करून प्रविणदादा यांच्यावर झालेला भ्याड हल्ल्याच्या आरोपींना अटक करुन या घटनेची सखोल चौकशी करत कठोर कार्यवाही व्हावी या बाबत खालील आशयाचे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी यांना देण्यात आले रविवार १३ जुलै २०२५ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा. प्रविणदादा गायकवाड यांच्यावर काही गुंड प्रवृतींच्या लोकांनी शाईफेक करून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करत भ्याड हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून हा हल्ला फक्त प्रविणदादा यांच्यावर नसून हा हल्ला या देशातील तमाम शिवराय – फुले – शाहु – आंबेडकर यांच्या समता , बंधुता व न्यायाच्या तत्वांवर चालणाऱ्या विचारवंतांवर असून यापूर्वी देखील या देशात याच मार्गाने अंधश्रद्धा निर्मूलनाचा मंत्र देणारे मा.नरेंद्र दाभोळकर , कॉ.गोविंद पानसरे , पत्रकार गौरी लंकेश व ज्येष्ठ विचारवंत एम.एम.कलबुर्गी यांच्या हत्त्या घडवून आणण्यात आल्या आहेत. प्रसारमाध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला दीपक काटे नावाचा गुंड व त्याच्या आठ ते दहा इतर गुंड साथीदारांनी मिळून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु स्थानिक पोलिसांनी या आरोपींना अटक न करता सोडून दिले आहे. तरी महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने या प्रकरणात बारकाईने लक्ष देत या हल्ल्यातील सर्व आरोपी व त्यांच्या मागे असणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अन्यथा याच पद्धतीने विचारवंतांना संपवण्याचे प्रयत्न सुरु राहिल्यास महात्मा गांधीच्या अहिंसेच्या विचारांवर चालणाऱ्या भारत देशाची प्रतिमा जगात मलीन होऊन हा देश अराजकतेच्या मार्गावर जाण्यास वेळ लागणार नाही. यावेळी संभाजी ब्रिगेड सामाजिक चे प्रदेश संघटक श्याम पाटील , जिल्हाध्यक्ष तुषार सांवत , संभाजी ब्रिगेड राजकीय चे जळगाव पुर्व जिल्हा प्रदिप गायके, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष विजय पाटिल शहर कार्याध्यक्ष मयूर चौधरी , लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे , बामसेफचे मुकुंद सपकाळे , मराठा सेवा संघाचे सुरेश पाटील , सुरेंद्र पाटील , राम पवार , शोभाराम प्रतिष्ठाचे नरेंद्र पाटील , अनिरुद्ध शिसोदे , शुभम पवार , गणेश पाटील,कल्पेश पाटील, भरत पाटील, अविनाश पाटील ,संदीप मांडोळे, सतीश लाठी, राकेश राजपूत, राकेश जैन, संदीप पाटील,रवींद्र पाटील, धवल पाटील,प्रमोद पाटील,राहुल पाटील,संजय चव्हाण,सुमित्र अहिरे, देवानंद निकम,रवींद्र तायडे,देशमुख साहेब यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते
पहूरच्या दोन लेकींचा अपघाती मृत्यू!पिंपळगाव हरेश्वरमध्ये अंत्यसंस्कार; परिसरात शोककळा
पहूर, ता. जामनेर –दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये पहूर येथील दोन लेकींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्यांच्यावर सासरी पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पहिली घटना शनिवारी (ता. १२ जुलै) दुपारी घडली. कल्पना एकनाथ क्षीरसागर (वय ३२, रा. उल्हासनगर) यांचा दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान निधन झाले. दुसरी हृदयद्रावक घटना रविवारी (ता. १३ जुलै) सकाळी आठच्या सुमारास घडली. प्रीती तुकाराम गीते या पिंपळगाव हरेश्वर येथून पहूर येथे नातेवाईकांच्या रक्षाविसर्जनासाठी दुचाकीने येत असताना चिलगाव फाट्याजवळ अपघातात त्यांचे निधन झाले. दोघीही महिलांचा मूळ संबंध पहूर गावाशी असून त्या सध्या सासरी पिंपळगाव हरेश्वर येथे राहात होत्या. या दुहेरी अपघाती मृत्यूच्या घटनेने पहूर व पिंपळगाव हरेश्वर परिसरात शोककळा पसरली आहे.संपर्कात असलेल्या नातेवाइकांत हळहळ व्यक्त केली जात असून, अपघात रोखण्यासाठी अधिक सुरक्षिततेची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
जळगाव जिल्हा ठरतोय सक्षम भागीदार$1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रकल्प व कार्यक्रम व्यवस्थापन युनिट (DPPMU) मार्फत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. महाराष्ट्राच्या $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या ध्येयपूर्तीसाठी जिल्हा जळगावातील यंत्रणांच्या कामगिरीचा सखोल आढावा या बैठकीत घेण्यात आला. आजच्या बैठकीतील प्रमुख मुद्दे:• कृषी, आरोग्य, पर्यटन, वैद्यकीय सुविधा, उद्योग, वीज, जलव्यवस्थापन, शिक्षण आदी १६ क्षेत्रांतील प्रगतीचा तालुका स्तरावर आढावा.• जिल्हास्तरावर संस्थात्मक बांधणी (Institution Building) आणि गुणवत्तापूर्ण सेवा केंद्रांची निर्मिती या दिशेने मार्गदर्शन.• विभागीय समन्वय वाढवणे, कामांच्या वेळेत पूर्ततेसाठी नियोजन, व संकल्पनांची अंमलबजावणी यावर भर.• डेटा आधारित धोरणनिर्मितीसाठी विश्लेषण व प्रगती निर्देशांक तयार करण्याचे निर्देश. महत्त्वाच्या आगामी बैठका:• District Innovation Council ची बैठक – नाविन्यपूर्ण उपक्रमांची निवड व प्रोत्साहन.• Skill & Employment Conclave – कौशल्य विकास संस्था, उद्योग व तरुण यांच्यात समन्वय.• Export Branding Workshop – जळगावातील केळी, सोने, कापूस, प्लास्टिक यांचा आंतरराष्ट्रीय ब्रँडिंगसाठी विशेष योजना.• Infrastructure Taskforce बैठक – वीज, पाणी, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, वाहतूक व पायाभूत सुविधा या क्षेत्रांवर लक्ष. प्रगतिपथावर असलेले महत्त्वाचे उपक्रम:• जळगाव वैद्यकीय हब – आरोग्य सेवांमध्ये खाजगी गुंतवणूक व तांत्रिक पायाभूत सुविधा निर्माण.• केळी क्लस्टरचा विकास – निर्यातक्षम व प्रक्रिया आधारित सुविधा उभारणी.• पशुसंवर्धन क्लिनिक आणि डायल 1962 सेवा – पशु वैद्यकीय आपत्कालीन सेवा अधिक प्रभावी करणे.• MSME व SHG सक्षमीकरण – वित्त, प्रशिक्षण, मार्केट लिंक यामध्ये सहकार्य.• पर्यटन विकास – सापुतडा डोंगररांगा, धार्मिक व सांस्कृतिक स्थळांचा विकास.• शाश्वत शेती व जल व्यवस्थापन – सूक्ष्म सिंचन, जलसंधारण, आणि नवा जल व्यवस्थापन मॉडेल. 📊 DPPMU (District Project & Program Monitoring Unit) मार्फत या सर्व योजनांचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. यातूनच “Vision to Action” चा खरा अर्थ पूर्णत्वास जातो आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक, संस्था, उद्योजक आणि तरुणांनी या परिवर्तनामध्ये आपली भूमिका बजावावी. तुमचे कल्पक विचार, सहकार्य आणि पुढाकारच जिल्ह्याला राज्यात आदर्श बनवतील.
२५ वर्षांपासून सुरू असलेला शेत रस्त्याचा वाद सामोपचाराने मिटला!– मौजे हिंगणे (न.क.), ता. जामनेर येथे आदर्श समन्वयाची दखल
जामनेर तालुक्यातील मौजे हिंगणे (न.क.) येथे तब्बल २५ वर्षांपासून सुरू असलेला शेत रस्त्याचा वाद अखेर तहसील कार्यालय, जामनेर येथे दिनांक ०३ जुलै २०२५ रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान सामोपचाराने व आपसी समजुतीने निकाली काढण्यात आला. सदर वाद सन २००० पासून विविध न्यायालयात, तसेच मा. उच्च न्यायालयात देखील सुरू होता. या वादात गट क्र. २८ चे धारक प्रमिलाबाई विजयसिंग पाटील व इतर व गट क्र. ५३ चे प्रतिवादी कवरसिंग दयाराम पाटील यांच्यात शेत रस्त्याच्या वहिवाटीबाबत दीर्घकाळ संघर्ष सुरू होता. स्थानिक पातळीवर पोलीस पाटील सुभाष जुलालसिंग पाटील, तसेच जामनेर नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर यांनी मध्यस्थीचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडून दोन्ही पक्षकारांमध्ये समेट घडवून आणला. या सामोपचाराच्या निमित्ताने तहसीलदार जामनेर (नानासाहेब आगळे) यांच्या हस्ते दोन्ही पक्षकारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व गावातील नागरिकांनी याचे विशेष कौतुक केले. 🟩 प्रशासनाकडून विशेष आवाहन:जामनेर तालुक्यातील इतर शेतकरी बांधवांनी देखील शेत शिवारातील पानंद रस्ते, शेत रस्त्यांचे वाद व वहिवाट विषयक प्रश्न सामोपचारातून सोडवावेत, जेणेकरून न्यायालयीन खर्च, वेळ व मनस्ताप वाचेल आणि गावांमध्ये सामाजिक सलोखा व विकासास चालना मिळेल. अशा प्रकारचे समंजस निर्णय हा इतर गावांसाठीही आदर्श ठरेल
युवानेते विश्वजीत पाटील यांची जळगाव ग्रामीण राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी निवड, पक्षवाढी साठी व युवकांच्या विकासाच्या दृष्टीने जोमाने काम करणार विश्वजीत पाटील.
जामनेर तालुक्यातील पाळधी येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवानेते विश्वजीत मनोहर पाटील यांची खासदार शरदचंद्र पवार यांच्या आदेशाने तसेच प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या मान्यतेनुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी विश्वजीत मनोहर पाटील यांची नियुक्ती केली आहे. यावेळी निवडीचे पत्र देताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, युवकचे प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख हे उपस्थित होते. यावेळी जळगाव ग्रामीण चे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विश्वजीत पाटील यांनी बोलतांना सांगितले की, खा.शरदचंद्र पवार यांच्या विचारानुसार पक्षाचे ध्येय धोरणे घराघरात पोहचविण्याचे कार्य करणार असून पक्षाला बळकटी देऊन पक्ष वाढविण्याचे काम करणार आहे.तसेच युवकांचे प्रश्न व सर्वसामान्य युवकांच्या विकासाच्या दृष्टीने काम करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या निवडीचे जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संपर्क प्रमुख डॉ.मनोहर पाटील,ज्येष्ठ नेते दिलीप खोडपे,दिगंबर दादा पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हार्दिक अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर दक्षता पथकांची होणार स्थापना
मुंबई, : राज्यातील बांधकाम कामगारांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून त्यांच्याकडून आर्थिक फसवणूक करण्यासह शासनाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या बोगस बांधकाम कामगार आणि दलालांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध भागातून लोकप्रतिनिधी व बांधकाम कामगारांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नोंदणी, कीट वाटप व अन्य बाबतीत गैरप्रकार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून आता राज्यभरात जिल्हास्तरावर कामगारांची पडताळणी करण्यासाठी दक्षता पथके स्थापन करून प्रभावी तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक विभागात, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कार्यालय प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र जिल्हास्तरीय दक्षता पथक गठीत करण्यात येणार आहे. या पथकांचे कार्यक्षेत्र मात्र त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्याऐवजी दुसऱ्या जिल्ह्यावर असेल, जेणेकरून कारवाई अधिक निष्पक्ष आणि प्रभावी राहील. दक्षता पथकांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे होणारी नोंदणी, नोंदणीसाठी पैसे मागण्याचे प्रकार तसेच खोटे दाखले सादर करून मिळविले जाणारे लाभ या बाबींवर लक्ष केंद्रित करून तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. संबंधित दलालांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल. या मोहिमेसाठी क्षेत्रीय कार्यालयांना वाहन भाडेतत्वावर घेण्याची परवानगी देण्यात आली असून, तपासणीसाठी आवश्यक इतर खर्चही प्रशासकीय निधीतून नियमानुसार करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय दक्षता पथक प्रमुखांनी त्यांच्या कारवाईचा सविस्तर अहवाल विभागीय प्रमुखांना सादर करावयाचा आहे. विभागीय प्रमुख सर्व जिल्ह्यांचे अहवाल एकत्र करून आपल्या अभिप्रायासह मंडळ मुख्यालयास सादर करतील.ही विशेष तपासणी मोहीम प्रथम टप्प्यात १० जुलै, २०२५ अखेरपर्यंत राबविली जाणार आहे. या तपासणी दरम्यान ज्यांना काही तक्रारी असतील त्यांना त्या दक्षता पथकाकडे देता येतील. प्रत्येक पथकाने दरमहा किमान एक तपासणी करणे बंधनकारक असून, त्या तपासण्यांचे संकलित अहवाल मंडळास दरमहा सादर करणे आवश्यक राहील. या निर्णयामुळे राज्यातील बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर प्रभावी आळा बसेल, अशी अपेक्षा कामगारमंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली आहे.
