Jalgaon
शेंदूर्णी सूतगिरणीला गती देण्यासाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक
मुंबई, दि. ७ एप्रिल (प्रतिनिधी) — जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सहकारी सूतगिरणीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मंत्रालयात मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात ही बैठक झाली.बैठकीत वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार यांनी सूतगिरणीच्या सद्यस्थितीचा आढावा सादर करत कामकाजातील अडचणी व प्रलंबित मुद्द्यांची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सूतगिरणीच्या कार्यपद्धती, तांत्रिक बाबी व उत्पादन क्षमतेसंदर्भात चर्चा केली.सूतगिरणीसमोरील अडचणी दूर करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत मंत्री श्री. महाजन यांनी वस्त्रोद्योग विभागाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यामुळे सूतगिरणीच्या कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.या बैठकीस वस्त्रोद्योग आयुक्त श्री. संजय दैने, मंत्री (वस्त्रोद्योग) यांचे खाजगी सचिव श्री. प्रल्हाद रोडे, मंत्री श्री. महाजन यांचे खाजगी सचिव जयराज कारभारी, प्रादेशिक उपआयुक्त श्री. दीपक खांडेकर, कक्ष अधिकारी श्री. हरीशकुमार कांबळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी ऑनलाइन प्रणालीद्वारे उपस्थित होते.सदर बैठकीत सूतगिरणीच्या प्रगतीसाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला असून, लवकरच ठोस निर्णयांची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पॅरागॉनकडून महिला उत्पाद श्रेणीवर कॅशबॅक ऑफर;आधुनिक फॅशनकडे अधिक भर
मुंबई, एप्रिल २०२६: भारतातील विश्वासार्ह पादत्राणे ब्रँड पॅरागॉन फुटवेअर यांनी महिलां उत्पाद श्रेणीवर कॅशबॅक ऑफर जाहीर केली आहे. या उपक्रमाचा उद्देश महिला ग्राहकांना खरेदीस प्रोत्साहन देणे आणि आधुनिक, फॅशनप्रधान डिझाइन्स अधिक सुलभ करणे हा आहे.या ऑफरअंतर्गत ग्राहकांना सुलभ क्यूआर-आधारित प्रक्रियेद्वारे हमखास रु. ३० तत्काळ कॅशबॅक मिळणार आहे. प्रत्येक उत्पादनाच्या टॅगवर स्क्रॅच-सक्षम क्यूआर कोड दिलेला आहे. हा कोड स्कॅन करून कॅशबॅक पृष्ठावर जाता येते. व्हाउचर कोड आणि आवश्यक माहिती भरल्यानंतर ग्राहक सहजपणे कॅशबॅक मिळवू शकतात. यामुळे खरेदीचा अनुभव अधिक सोपा आणि मूल्यवर्धित होतो.पॅरागॉनची महिला उत्पाद श्रेणी हा आधुनिक ट्रेंडनुसार आणि आकर्षक डिझाइन्सवर आधारित आहे. आजच्या महिला ग्राहकांना केवळ आरामदायक आणि टिकाऊ पादत्राणेच नव्हे, तर विविधता, शैली आणि सध्याच्या फॅशनशी सुसंगतता देखील अपेक्षित असते. या उपक्रमाद्वारे पॅरागॉन आपल्या महिला उत्पाद श्रेणी अधिक व्यापक ग्राहकवर्गापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.सध्या एकूण विक्रीत १५–२० टक्के योगदान देणाऱ्या या विभागाचा वाटा पुढील तीन वर्षांत ४० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. यामुळे या विभागात कंपनीचा वाढता भर अधोरेखित होतो.या उपक्रमाबाबत बोलताना, पॅरागॉन फुटवेअरचे मार्केटिंग आणि आयटी विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष सचिन जोसेफ म्हणाले, “महिला उत्पाद श्रेणी हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शैली, आराम आणि दैनंदिन वापरासाठी उपयुक्तता यांचा समतोल साधणारी उत्पादने देण्यावर आम्ही भर देत आहोत. कॅशबॅक उपक्रमाद्वारे अधिकाधिक ग्राहकांना आमच्या आधुनिक आणि विविध प्रकारच्या पादत्राणांचा अनुभव घेण्यास प्रोत्साहन मिळेल. विविध बाजारपेठांतील महिलांसाठी फॅशनप्रधान पादत्राणे अधिक सुलभ करण्यावर आमचा सातत्याने भर राहील.”*विविध प्रकारच्या उत्पादनांनी सजलेल्या पोर्टफोलिओसह पॅरागॉन ग्राहकांच्या गरजेनुसार उपयुक्त डिझाइन, दैनंदिन आराम आणि विश्वासार्ह गुणवत्ता प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. येत्या काळात महिला उत्पाद श्रेणी हा कंपनीच्या उत्पन्नवाढीसह ब्रँडच्या नव्या प्रतिमेला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
जिल्हास्तरीय लोकशाही दिन संपन्न; तक्रार निवारणास गती
महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यांचे त्वरित निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिन उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे नागरिक व प्रशासन यांच्यात थेट संवाद साधला जाऊन तक्रार निवारण प्रक्रियेला गती मिळाली.या वेळी नागरिकांनी विविध शासकीय विभागांशी संबंधित तक्रारी, निवेदने व मागण्या मांडल्या. प्रत्येक अर्जाची अधिकृत नोंद घेऊन तक्रारदारांचे म्हणणे संयमाने ऐकून घेण्यात आले. संबंधित विभागप्रमुख व क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर तक्रारींच्या तातडीने निपटाऱ्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली.प्रलंबित प्रकरणे ठराविक कालावधीत निकाली काढण्याचे तसेच संबंधित नागरिकांना त्याची माहिती देण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले. तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता, नियमबद्धता आणि तटस्थता राखण्यावर विशेष भर देण्यात आला.लोकशाही दिन हा केवळ तक्रारी मांडण्याचा मंच नसून सुशासन आणि लोकसहभाग यांचा प्रभावी दुवा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. प्रशासन नागरिकांच्या समस्या संवेदनशीलतेने हाताळून त्यांचे वेळेत निराकरण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. “नागरिकांच्या समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहून त्यांचे विहित कालावधीत निराकरण करणे हे प्रशासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. लोकशाही दिनामुळे प्रशासन थेट जनतेच्या संपर्कात येऊन कामकाज अधिक गतिमान होत आहे,” असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
जळगावात गॅस सिलेंडर वितरणावर निर्बंध; ‘घरपोच’ सेवेला प्राधान्य देण्याचे निर्देश
जळगाव (प्रतिनिधी) : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून, याचा परिणाम देशांतर्गत गॅस वितरण व्यवस्थेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गॅस सिलेंडरच्या पॅनिक बुकिंग आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत.जिल्ह्यातील काही गॅस एजन्सींकडून थेट कार्यालय किंवा गोडाऊनमधून सिलेंडर वितरण केले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी गर्दी होत असून सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. तसेच, प्रतीक्षा यादीत फेरफार होऊन काळाबाजाराला खतपाणी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.याच पार्श्वभूमीवर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या जळगाव येथील सेल्स ऑफिसरना सूचना देण्यात आल्या आहेत.महत्त्वाचे निर्देश पुढीलप्रमाणे :गॅस एजन्सी कार्यालय किंवा गोडाऊनवरून थेट सिलेंडर वितरण तात्काळ बंद करावे. सर्व ग्राहकांना केवळ ‘घरपोच’ (Home Delivery) पद्धतीनेच सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत.वितरण प्रक्रियेत पारदर्शकता ठेवून कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी.नियमबाह्य काम करणाऱ्या एजन्सींवर तातडीने तपासणी करून कठोर कारवाई करावी.या निर्णयामुळे ग्राहकांना सुरक्षित आणि सुव्यवस्थित पद्धतीने गॅस पुरवठा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे संभाव्य गोंधळ, काळाबाजार आणि गर्दीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार आहे.
आचार्य गरुड विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी सौ.पी.सी.पाटील यांची नियुक्ती
शेंदुर्णी ता.जामनेर (प्रतिनिधी) धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी संचलित आ.ग.र. गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, शेंदुर्णी येथे सौ. प्रतिभा चंद्रशेखर पाटील यांची प्राचार्य/मुख्याध्यापक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरुड यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली. नुकत्याच आयोजित कार्यक्रमात सेवानिवृत्त प्राचार्य आर. एस. चौधरी यांनी पदभार सौ. पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी संस्थेचे सहसचिव दादासो यू. यू. पाटील उपस्थित होते. त्यांनी सौ. पाटील यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सौ. पाटील यांना 30 वर्षांचा प्रदीर्घ शैक्षणिक अनुभव असून, या अनुभवाचा उपयोग विद्यार्थी हितासाठी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, माजी सहसचिव कै. आप्पासाहेब पी. एस. पाटील यांच्या संस्कारांचा तसेच वडील माजी को-ऑपरेटिव्ह ऑफिसर कै. एस. के. पाटील यांच्या शिस्तबद्ध मार्गदर्शनाचा प्रभाव त्यांच्या कार्यपद्धतीत दिसून येईल. तसेच संस्थेचे पदाधिकारी दादासाहेब गरुड, आबासाहेब भीमराव शेळके, सचिव काकासो सागरमलजी जैन, सहसचिव दादासो यू. यू. पाटील, कार्यालयीन सचिव दीपकजी गरुड, वस्तीगृह सचिव गो. गो. सूर्यवंशी व संचालक मंडळ यांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, त्यांच्या या पदोन्नतीबद्दल त्यांचे पती व किमान कौशल्य विभागाचे माजी प्राध्यापक चंद्रशेखर पाटील यांनी संस्थेचे आभार मानले. सौ. प्रतिभा पाटील यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व परिसरातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पंढरपूरात राज्यस्तरीय पुरस्कारांचा जल्लोषविविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव – भगवंत पांडुरंगाच्या साक्षीने सोहळ्याला उत्साहाची उधाण – वाकडी च्या बाळु जोशी याना सन्मानित
वाकडी.ता.जामनेर.दि.२/०४/२६सांस्कृतिक, सामाजिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ३१ मार्च २०२६ रोजी पंढरपूर येथे “राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२६” मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित भव्य सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले त्यात बाळू जोशी वाकडी ता जामनेर दैनिक सकाळ चे पत्रकार यांना हि सन्मानित करण्यात आले . या सोहळ्याचे खास आकर्षण ठरल्या त्या प्रसिद्ध निवेदिका ऐश्वर्या चासकर ! आपल्या ओघवत्या, प्रभावी आणि हृदयस्पर्शी निवेदन शैलीने महाराष्ट्रभर प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या ऐश्वर्या चासकर यांना या मंचावर सन्मानित करण्यात आले. त्यांच्या आवाजातील जादू, मंचावरील आत्मविश्वास आणि प्रत्येक कार्यक्रमाला उंची देण्याची कला यामुळे त्या आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांच्या सन्मानावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना भरभरून दाद दिली. या सोहळ्यात महाराष्ट्र समाज भूषण, आदर्श पत्रकार, आदर्श शिक्षक, सेवा धन्वंतरी भूषण, कृषी भूषण, कलारत्न भूषण, गानसम्राज्ञी, साहित्यभूषण, अभियंता भूषण, भारत भूषण, आदर्श माता, शौर्य पुरस्कार, पर्यावरण पुरस्कार, साहित्यरत्न, काव्य भूषण, आदर्श लेखक, वृक्षमित्र, आरोग्यदूत, क्रीडारत्न, नारिशक्ती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महाराष्ट्र रत्न, जीवन गौरव, उत्कृष्ट सरपंच, आदर्श शेतकरी, संत तुकाराम महाराज जीवन गौरव पुरस्कार, महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार, यांसारख्या अनेक मानाच्या पुरस्कारांनी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात आला. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, अध्यात्मिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, कृषी वैद्यकीय, पत्रकारिता, पोलिस सेवा तसेच देशसेवेसाठी योगदान देणारे सैनिक, युवा वर्ग आणि शौर्य दाखवणाऱ्या बालकांनाही या सोहळ्यात राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन संतराज पॅलेस, विसावा मंदिराशेजारी, बुलेट शोरूम समोर, पुणे रोड, पंढरपूर येथे करण्यात आले होते. भगवंत पांडुरंगाच्या पवित्र भूमीत झालेल्या या सोहळ्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच आध्यात्मिक उंची लाभली. उपस्थितांना पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभघेता आला तसेच कार्यक्रमानंतर स्वादिष्ट भोजनाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. या प्रसंगी श्री संत शिरोमणी सावता महाराजांचे 19 वे वंशज सावता महाराज वसेकर, पंढरपूरच्या नगराध्यक्ष प्रणिती भालके, वनरक्षक अधिकारी अनिता शिंदे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अॅड. प्रणव परिचारक, द युवा ग्रामीण पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख, ऐकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनंत कराड राष्ट्रीय महिला अध्यक्षा कल्पना पवार, राज्याध्यक्ष शकील मनियार, सचिव बाळासाहेब कोठुळे, महिला सचिव मंगलताई सासवडे, महाराष्ट्राची भूमी मुख्य संपादक आनंद बारवकर, सोलापूर जिल्हा कार्यकारणी, पुणे जिल्हा कार्यकारणी, सांगली जिल्हा कार्यकारिणी, जळगाव जिल्हा कार्यकारिणी, यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नसून, समाजातील कर्तृत्वाला सलाम करणारा, प्रेरणा देणारा आणि नवचैतन्य निर्माण करणारा ठरला. विशेषतः ऐश्वर्या चासकर यांच्या निवेदनामुळे कार्यक्रमाला एक ग्लॅमर आणि अभिमानाची झळाळी प्राप्त झाली.
गरुड विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी यांना निरोप
गरुड विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी यांना निरोप धी.शेंदुर्णी से.एज्यु.को-ऑप सोसायटी संचलित,आ.ग.र.गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी यांच्या शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीतील प्रदीर्घ अशा सेवेनंतर वयो काल मर्यादे नुसार सरांना सेवापूर्तीनिमित्त निरोप देण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव काकासो.सागरमलजी जैन यांच्या समवेत संस्थेचे सहसचिव दादासो यु यु पाटील, शेंदुर्णी शहराचे प्रथम नागरिक गोविंद जी अग्रवाल,माजी शिक्षक आमदार सुधीरजी तांबे,प्रमुख व्याख्याते माजी शिक्षणाधिकारी निळकंठजी गायकवाड,युवा नेतृत्व भैय्यासाहेब स्नेहदीपजी गरुड,ज.जि.माध्य. शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष एस.डी भिरुड, महिला संचालिका उज्वलाताई काशीद,ज.जि माध्यमिक पतपेढी माजी अध्यक्ष संभाजी पाटील मार्गदर्शक जुक्टो संघटना बापूसो.सुनील गरुड वस्तीगृह सचिव गो.गो.सूर्यवंशी , ज जि माध्यमिक पतपेढी माजी अध्यक्ष आर एच बाविस्कर, अध्यक्ष मुख्याध्यापक संघ जळगांव गोपाल पाटील,जि प्रे सो चेअरमन दगडू विष्णू पाटील, शेदुणी संस्थेचे सह सचिव यु यु पाटील चेअमन वस्तीगृह किशोर मानसिंग पाटील, शेंदुणी संस्था संचालक विजयराव ज्ञानदेवराव गरुड जिल्हा मुख्याध्यापक संघ सचिव आर ए पाटील मुख्याध्यापक जामनेर तालुका अध्यक्ष प्रमोद खलसे, माजी उपसभापती सुधाकर अण्णा बारी माजी पचायत सदस्य डाॅ किरण सुर्यवंशी, प्रदिप धनगर, प्राचार्य संजय भोळे, एस के पाटील जुक्टो संघना जळगांव शैलेश राणे, ए ए पटेल, जैन चाॅरिटीजचे व्यवस्थापक विनोद सिंह राजपूत, ज जि माध्यमिक पतपेढी संचालक सिध्देश्र्वर वाघुळदे, जे पी सपकाळ, जावळेसर, भावेश अहिरवार, आबा पाटील, नाईक सर आरिफ सर या मान्यवरांसह अनेक मान्यवर व्यास मंचावर उपस्थित होते.प्रथमतः कार्यक्रमाचे प्रास्ताविक किमान कौशल्य विभागाचे प्रमुख शैलेंद्र शेळके यांनी प्रास्ताविकात चौधरी सरांच्या जीवन प्रवासाबद्दल माहिती कथन करत.सरांचे वडील प्राथमिक शिक्षक होते तर पाचवीत असतानाच पितृछत्र हरपल्याने संघर्षमय जीवन जगत असताना त्यांच्या मातोश्री अंजनाबाई या नाचनखेडा गावात सतत दहा वर्ष वि. का. सोसा. संचालिका म्हणून कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं शेंदुर्णी संस्थेत 1991 पासून तर आजतागायत 34 वर्ष 7 महिने एवढा मोठा कालावधी शिक्षक, पर्यवेक्षक, उप मुख्याध्यापक प्राचार्य कमऀचारी प्रतिनिधि,इथपर्यंत इमाने इतबारे सरांनी पार पाडला.विद्यार्थी हित कर्तव्य म्हणजे राज्य पातळी ते राष्ट्रीय पातळीपर्यंत सरांचे विद्यार्थी खेळामध्ये चमकलेत. त्यांच्या धर्मपत्नी चित्राताई तसेच मुलगा दिनेश व मुलगी प्रियंका या आपल्या कुटुंबाला वेळ देत त्यांनी सामाजिक कार्य तसेच शिक्षक संघटनांच्या माध्यमातून शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम सरांनी केले.तसेच समाजाशी एकरूप होऊन सामाजिक बांधिलकी त्यांनी जोपासल्याचे प्रास्ताविकातून शेळके सरांनी व्यक्त केले.तद्नंतर,बऱ्याच मान्यवरांनी सरांच्या जीवनकार्याची यशोगाथा सांगितली त्यात,गोविंदजी अग्रवाल,निळकंठजी गायकवाड,सुधीरजी तांबे,संभाजी पाटील, सुनिल गरड, यु यु दादा पाटील या मान्यवरांसह विद्यार्थी मनोगतात भाग्यश्री नाईक,अथर्व पाटील यांनी सरांच्या आठवणींना उजाळा दिला.तसेच सत्कारार्थी मनोगतात सरांनी देखील आपल्या भावनांच्या वाटा मोकळ्या करत आपल्यावर प्रेम करणाऱ्या प्रेमी जणांचे तसेच संस्थेचे श्रद्धास्थान आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड अण्णासाहेब भास्करराव गरुड, तसेच दादासाहेब संजय रावजी गरुड व संस्था यांच्या ऋणात राहून मी सदैव संस्थेच्या हित जोपासण्यासाठी तत्पर असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केले. तद्नंतर अध्यक्षीय मनोगतात शेंदुणी संस्थेचे सचिव काकासो.सागरमल जैन यांनी देखील आपले भावनिक विचार मांडले, प्रमुख उपस्थित मान्यवरांसह उपनगराध्यक्ष शरद बारी,नगरसेवक शांताराम बापू गुजर,टी.जे पाटील, नगरसेविकापती सुनील शिनकर माजी सरपंच नाचणखेडे हर्षल पाटील,सरपंच कैलास पाटील राजेंद्र पाटील सोयब पटेल अरुण कुलकर्णी, संजय गोतमारे,राजेद्र चौधरी, सुनिल चौधरी,,,एन ओ पाटील,सर,सुनंदाताई,बडोला हायस्कूल मुख्याध्यापिका श्रीमती पी एन पाटील,जुक्टो संघटनेचे शैलेश राणे,जे पी सपकाळे,व्ही के चौधरी,एस एस पाटील, एस टी पाटील, पी पी पाटील,एस के पाटील, पी आर गरुड, पी एल पाटील, राठी बापू, एस टी चिचोले,एस आर निकम, ए व्ही पाटील,पत्रकार विलास अहिरे, पंडित सर,एस टी पाटील,संगमनेर येथील महेश दिघे या मान्यवरांसह आप्तेष्ट नातेवाईक व इतर मित्र परिवार तसेच संस्थेतील आजी-माजी मुख्याध्यापक,महाविद्यालयाचे प्राचार्य, संजय भोळे,उप प्राचार्य,श्याम साळुंखे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य बी एम कुमावत, पर्यवेक्षक जे.एस.जुबंळे, विनोद पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सरांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दादासाहेब संजयरावजी गरुड तसेच भाऊसो.दीपक जी गरुड व इतर पत्रकार बांधव, शिक्षक आमदारकिशोरजी दराडे, ग स सोसायटी अध्यक्ष अजबसिंग पाटील या मान्यवरांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा कळविल्याचे समजले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.जी. पाटील यांनी केले तर आभार पी.पी. पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले
प्रभू श्रीरामनवमी निमित्त शेंदुर्णी येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे भव्य शौर्य संचलन उत्साहात संपन्न.
प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सवानिमित्त श्री क्षेत्र प्रति पंढरपूर शेंदुर्णी नगरीत प्रथमच विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने भव्य शौर्य संचलनाचे आयोजन करण्यात आले होते, प्रसंगी संचलनात २०० गणवेश धारक तसेच मंगल वेशातील १५५ पेक्षा अधिक बजरंगी सामील होते. श्रीराम जय राम जय जय राम, भारत माता की जय, वंदे मातरम अशा अनेक घोषणा तसेच देशभक्तीपर गीतांच्या तालावर संपूर्ण शेंदुर्णी नगरीत संचलन उत्साहात पार पडले. तसेच संचलन प्रकट कार्यक्रम हा नगरपंचायत मैदानावर पार पडला, त्यात मंचावर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री सिद्धेश्वरजी बिराजदार प्रांत धर्म जागरण प्रमुख तसेच विश्व हिंदू परिषद जिल्हा सह मंत्री भिका इंदरकर व वरून इंगळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिका इंदरकर यांनी केले ते म्हणाले की “सदर संचालनाचा उद्देश हा सकल हिंदू समाजाला एकत्रित करणे देव देश धर्माचे रक्षण करणे, सेवा सुरक्षा संस्कार या त्रिसूत्रीवर चालणे. तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्यांनी देखील बजरंग दलाच्या स्थापनेपासून ते राम मंदिरांचे आंदोलन असेल तसेच आजपर्यंतचा प्रवास सर्व बजरंगी समोर मांडला. आजच्या या तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवणे. तसेच लव जिहादच्या जाळ्यातून, लँड जिहाद च्या तसेच अनेक जिहादी जाळ्यातून आपला हिंदू समाज सुरक्षित ठेवणे, पंचपरिवर्तन अशा अनेक विषयांना घेऊन या संचालनाचे आयोजन करण्यात आले असे ते म्हणाले. संचलनाचे सूत्रसंचालन मयूर माळी, सांघिक गीत भूषण दामधर, सुभाषित विक्रम माळी, आभार अर्जुन वाघ तसेच घनशाम माळी समरसता मंत्र घेऊन कार्यक्रम समारोप करण्यात आला.या कार्यक्रमासाठी विहिंप बजरंग दल सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले
जामनेर येथे राष्ट्रीय लोकन्यायालयात ३६० प्रकरणांचा निकाल
जामनेर, दि. १४ मार्च २०२६ – मा. उच्च न्यायालय मुंबई तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन जामनेर येथे करण्यात आले. तालुका विधी सेवा समिती जामनेर तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालय जामनेर यांच्या वतीने या लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयात मोठ्या प्रमाणावर पक्षकारांनी उपस्थिती दर्शविली. तहसील कार्यालय, महसूल विभाग, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी पतसंस्था/बँका, बीएसएनएल, नगरपालिका, नगरपरिषद, महावितरण तसेच जामनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. सदर लोकन्यायालयात वादपूर्व प्रकरणे तसेच न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. वादपूर्व प्रकरणांपैकी ३०४ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यामध्ये २,०४,३६० रुपये इतक्या रकमेची तडजोड करण्यात आली. तसेच न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण ५६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. दिवाणी व फौजदारी तडजोडयोग्य प्रकरणांमध्ये ९०,८०० रुपये इतक्या रकमेची तडजोड करण्यात आली. वादपूर्व व न्यायालयीन प्रलंबित अशी मिळून एकूण ३६० प्रकरणे निकाली काढण्यात आली असून दोन्ही प्रकारच्या प्रकरणांमध्ये मिळून २,०५,३७,८८७ रुपये इतक्या रकमेची तडजोड करण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
पुरुषांकडे शक्तीच मातृत्व असलं तरीही जगात मातृत्वाची शक्ती ही महिलांकडेच आहे.म्हणून समाजात वावरतांना महिला म्हणून जबाबदारीने वागा.–अँड.शुभांगी फासे.
जामनेर – प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यापासून तो त्याच्या कर्तृत्वासाठी श्रेष्ठच आहे.मग तो पुरुष असो व स्त्री.उलट काही बाबतीत स्त्रिया या पुरुषांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत.असंख्य क्षेत्रात महिला आज प्रतिनिधित्व करीत आहेत.त्याच बरोबरीने महिलांसाठीचे अधिकार त्यांचे कायदे हे देखील त्यांच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे.आज महिलांवरील अत्याचारांच प्रमाण वाढलेलं आहे,तुम्ही शिक्षणाबरोबर स्वतःच्या संरक्षणासाठी स्वयंसिद्ध प्रशिक्षण घ्या.कोणत्याही नात्यात येतांना स्वतःवर असलेल्या जबाबदारी चं भान ठेवा.आणि तिच्या नकार हा कायम नाहीच असतो, नकाराला होकार समजू नका.जी.एम.नर्सिंग इन्स्टिट्यूट,जामनेर तर्फे महीला दिनानिमित्त विशेष शैक्षणिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी जामनेर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय,जामनेर येथील अधिवक्ता आणि युवा व्याख्याता अँड.शुभांगी विठ्ठल फासे या प्रमुख वक्त्या तसेच अँड.आदित्य देशमुख हे देखिल या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर अॅड.फासे यांनी विद्यार्थ्यांना महीला सक्षमीकरण आणि सामाजिक जीवन मूल्य,कायदेशीर जागरूकता आणि जबाबदार नागरिकत्व या विषयांवर अत्यंत प्रभावी व समजण्यास सोपी अशी माहिती दिली.विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून सक्रिय सहभाग नोंदवला.तसेच अॅड.देशमुख यांनी देखील विद्यार्थ्यांना लहान बालकांसंबंधीचे कायदे (पॉक्सो कायदा) वर मार्गदर्शन केले.महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा.अश्विनी चौधरी यांनी वक्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नागरी जाणीवा व मानवी मूल्यांची दृढ पायाभरणी होत असल्याचे सांगितले.
