Maharashtra
शेंदुर्णी येथे प.पू. हरिप्रसाद महाराज पुण्यतिथी संगीत रजनीसह उत्साहात साजरी
शेंदुर्णी ता.जामनेर,येथे कमल किसन नगरात दादासाहेब संजयरावजी गरुड यांच्या निवासस्थानापासून परमपूज्य कै.हरिप्रसाद महाराज यांच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी,हरिप्रसाद महाराज यांच्या पणती विजया वाजपेयी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रथमतःपालखी सोहळ्याचे पूजन व माल्यार्पण पंडित दादा गरुड, दादासाहेब संजयरावजी गरुड, ताईसो सरोजिनी गरुड,राहुल गरुड,शिवराज गरुड,स्नेहदीपजी गरुड,प्रियानंदा गरुड,रक्षंदा गरुड,माधुरी चव्हाण मॅम,कोमल देशमुख मॅम,यांच्या समवेत महेश भदाणे व सौ.उमा भदाने यांच्या हस्ते पूजन व मल्ल्यार्पण करण्यात आले.याप्रसंगी ढोल ताशांच्या गजरात दिंडी सोहळ्याची मिरवणूक वाजत गाजत संपूर्ण गावभर काढण्यात आली.या अनुषंगाने लेझीम पथक,टिपरी पथक,वृक्षदिंडी,एनसीसी कॅडेट पथक,यासह संत ज्ञानेश्वर,मुक्ताई, सोपानदेव निवृत्ती यांनी चालविलेली निर्जीव भिंत वेशभूषा आरास देखावा त्याचबरोबर विठ्ठल रुक्माई वेशभूषा देखावा या सर्वांचे,आरास देखावाउभारण्यात आले.या सर्व दिंडी सोहळ्याची सांगता वीस देवडी जवळ करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत दादासो यु.यु.पाटील, शांताराम बापू गुजर, सुधाकर आण्णा बारी,शिवपूजे मॅडम,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.चौधरी सर, गरुड प्राथमिक च्या मुख्याध्यापिका सौ.दामिनी गरुड, पर्यवेक्षक व्ही.एम.शिरपुरे,विनोद पाटील इत्यादी उपस्थित होते. या निमित्ताने प्राचार्य आर.एस चौधरी यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कारासह हरिप्रसाद महाराज यांच्या पणती विजया वाजपेयी यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार बरोबर आर एस चौधरी यांनी हरिप्रसाद महाराज यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला.याबरोबर रात्रीच्या कीर्तन सोहळ्यात ह.भ.प.पांडुरंग महाराज आवरकर यांनी त्यांचे अमृत बोल कथन केले. संध्या रजनी कार्यक्रम दादासाहेब संजयरावजी गरुड,काकासो.सागरमल जैन,शांताराम बापू गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत संगीत रजनी कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी संगीत विशारद श्रीमती मीनाक्षी शर्मा,उर्मिला ताई शिवपुजे,सुरेश भाऊ गर्गे,तबलावादक पांडुरंग पाटील, सोपान पाटील,एडॅ.पारळकर,दिग्विजय सूर्यवंशी व इतर पत्रकार बांधव,गाव परिसरातील,नागरिक,रसिक स्रोते शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक, प्राध्यापिका यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही एम शिरपुरे यांनी केले तर आभार डी.बी पाटील यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे (मि)शाळेत वृक्षारोपण
आज दि २५ जुलै २०२५ रोजी पळासखेडा( मिराचे) तालुका जामनेर येथील नि पं. पाटील विद्यालयात वृक्षारोपण संपन्न झाले.श्रावण मासारंभ चे औचित्य साधून आज विद्यालयात धी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन बापूसाहेब श्री. भीमराव पाटील यांच्या हस्ते व त्याचबरोबर विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक श्री. डी .पी .पाटील सर व गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री पवार बाबा यांचे हस्ते ५० मोठ्या रोपांची लागवड करण्यात आली. मे महिन्याच्या वादळात विद्यालयातील उन्मळून पडलेल्या वृक्षांच्या जागेवर पुन्हा जेसीबीने मोठे खड्डे तयार करून तिथे रोपांची लागवड करण्यात आली.रोपांची लागवड केल्यावर त्या खड्ड्यांमध्ये शेणखत मिश्रित काळी माती टाकण्यात आली.विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी प्रत्येकी एक व त्यापेक्षा जास्त रोपांसाठी आर्थिक योगदान दिले.त्याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या संकल्पनेतून एक शिक्षक, शिक्षिका व चार विद्यार्थी त्या रोपांचे जतन व संवर्धन करतील त्या अनुषंगाने प्रत्येक टीमला एक रोप दत्तक घेण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. व्ही.आर.पाटील सर, विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.जे.आर. पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने व सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने सदर वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
माजी सभापतींच्या पतीची आत्महत्या; चिठ्ठ्या सापडल्याने गूढ वाढले
जामनेर, ता.२२ (प्रतिनिधी) जामनेर शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनबर्डी परिसरातील एका निर्जनस्थळी माजी सभापती सुनंदाबाई पाटील यांचे पती प्रल्हाद पाटील (वय ६२, रा. मोयखेडा, ता. जामनेर) यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली असून, मयत प्रल्हाद पाटील यांच्या खिशात काही चिठ्ठ्या सापडल्याची प्राथमिक माहिती मिळत असल्याने आत्महत्येमागील गूढ वाढले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मोयखेडा येथील रहिवासी असलेले प्रल्हाद पाटील यांनी आज संध्याकाळी सोनबर्डी परिसराच्या मागील बाजूस असलेल्या एका निर्जनस्थळी झाडाला गळफास लावून आपले जीवन संपवले. प्रल्हाद पाटील हे व्यवसायाने शिक्षक होते आणि त्यांनी २०२१ साली स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्याच सुमारास त्यांच्या पत्नी सुनंदाबाई पाटील जामनेर पंचायत समितीच्या सभापती म्हणून कार्यरत होत्या.घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्रल्हाद पाटील यांनी आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठ्यांमुळे आत्महत्येमागे काही कारण असावे असा पोलिसांना संशय आहे. जामनेर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.प्रल्हाद पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून आणि तीन नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येने मोयखेडा आणि जामनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तालुका क्रीडा नियोजन बैठक ठरली फलदायी; प्रा. समीर घोडेस्वार, ऋग्वेद पेडगांवकर व कार्तिकी लामखेडे यांचा सन्मान
जामनेर, ता.१६ जुलै:महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि पंचायत समिती, जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या नियोजनासाठी सहविचार सभा दिनांक १६ जुलै रोजी दुपारी ११ वा. पंचायत समिती, जामनेर येथे उत्साहात संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी क्रीडा अधिकारी सचिन निकम, विशाल बोडके, गटशिक्षणाधिकारी विष्णू काळे, विस्तार अधिकारी संजय पाटील, स्पर्धा समिती सचिव जी.सी. पाटील, मुख्याध्यापक शेख जलाल, गटसाधन केंद्र समन्वयक पंकज रानोटकर यांसह तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी डॉ. आसिफ खान यांनी चालू शैक्षणिक वर्षातील विविध क्रीडा योजना, क्रीडा शिक्षकांच्या योगदानाचे सन्मान, ‘लाईफटाईम अचीवमेंट’ पुरस्कार, व विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या शाळांचा गौरव अशा महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर माहिती दिली. याशिवाय तालुक्यातील १० प्रमुख खेळांची नियोजनपूर्वक आखणी व शालेय पत्रिकेविषयी चर्चा झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी ‘माझी शाळा – सुंदर पटांगण’ ही अभिनव संकल्पना मांडून, शाळांमध्ये खेळांच्या अद्ययावत सुविधा व उत्स्फूर्त सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी उपस्थित शिक्षकांच्या शंकांचे निरसनही त्यांनी केले. या प्रसंगी विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा गौरव करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक श्रीपाद पेडगावकर यांचे चिरंजीव ऋग्वेद यांनी इ.८ वी स्कॉलरशिप परीक्षेत तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल तर वाकी बुद्रुक येथील सरपंच व क्रीडा शिक्षक ललित लामखडे यांच्या कन्या कार्तिकी हिने इ.१० वी बोर्ड परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आले. तसेच इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. समीर घोडेस्वार यांना जिल्हास्तरीय सुलभक म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सभेचे सूत्रसंचालन डॉ. आसिफ खान यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा.समीर घोडेस्वार यांनी केले.या बैठकीस तालुक्यातील ७२ क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेच्या यशस्वीतेसाठी डी के चौधरी, नरेंद्र पाटील, व्ही एन पाटील, आनंद मोरे, पी डी पाटील, शाहिद शेख जहीर खान, देवा पाटील आदी.परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि शालेय गणवेश वाटप करून तोंडापूर विद्यालयात संस्था वर्धापन दिन उत्साहात संपन्न….
तोंडापूर येथील श्रीमती र. सु.जैन माध्यमिक विद्यालयात शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा 81 वा वर्धापन दिन, एस.एस.सी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून व वस्तीगृहातील सर्व विद्यार्थी तसेच इतर गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.नामदेव पल्हाळ हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीस ईशस्तवन व स्वागत गीत सादर करून प्रतिमांचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.डी.रोनखेडे यांनी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा इतिहास व शाळेने वर्षभरात केलेली उज्वल कामगिरी आपल्या प्रास्ताविकातून सादर केली. तद्नंतर वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची मनोगते सादर करण्यात आली. त्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. एस.एस.सी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, भेटवस्तू व बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून संस्थेबद्दल ऋण व्यक्त केले. क्रीडा स्पर्धेतील खेळाडू व सीड्स बॉल तयार करण्याच्या स्पर्धेतील विजेत्यांचा गुणगौरव यावेळी करण्यात आला.याप्रसंगी जामनेर येथील दातृत्व लाभलेले व्यक्तिमत्व महेंद्र सोनवणे व ज्योती सोनवणे या दांपत्याकडून सालाबाधाप्रमाणे वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांना व शाळेतील इतर गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना तब्बल 20 हजार रुपये किमतीचे गणवेश मान्यवरांच्या शुभ हस्ते वितरित करण्यात आले. यावेळेस सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलून आलेला होता.स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष दिगंबर पाटील तसेच कुंभारी येथील माजी सरपंच सुरता जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण नामदेव पल्हाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.सी.लोडते यांनी केले तर आभार प्रदर्शन एस. एस.देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते शालेय प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.
नि.पं.पाटील विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा
पळासखेडे मिराचे दि १७ जुलै २०२५(प्रतिनिधी ) नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे शाळेत मातृहृदयी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पवार हे होते. सर्वप्रथम कै.आचार्य बापूसो. गजाननराव गरुड व कै. अण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष , संस्था संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक जे.आर.पाटील यांनी कै. आचार्य बापूंना अभिप्रेत असलेला विद्यार्थी याबद्दल मत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षक एस. जे. सोनवणे यांनी मनोगतात संस्थेची स्थापना व व्याप्ती याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी अध्यक्ष भाषणात कै.आचार्य गजाननराव बापूंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक व सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील,चंद्रशेखर काळे,अब्दुल नबी तांबोळी,डी. पी .पाटील, संजू पवार,.शालिक पाटील,अशोक माळी,बळीराम माळी,लता पाटील हे मान्यवर उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्षाली प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक – हितेश वर्जन चव्हाण तृतीय क्रमाक – ओम संतोष चौधरी यांनी मिळविला. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 50 शालेय गणवेश वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने ,सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जी.पी. पाटील यांनी केले तर आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले.
प्रविण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
प्रविण दादा गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कार्यवाहीची मागणी!!संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, बामसेफ यांच्यासह परिवर्तन वादी संघटना कडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !!! शिवतीर्थावर प्रवीण गायकवाड यांच्या प्रतिमेस घातला दुग्धाभिषेक!!! ! जळगाव (प्रतिनीधी)जळगाव जिल्हा संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ बामसेफ यांच्यासह परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा.प्रविणदादा गायकवाड यांच्या प्रतिमेस शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाजवळ दुग्धाभिषेक करून प्रविणदादा यांच्यावर झालेला भ्याड हल्ल्याच्या आरोपींना अटक करुन या घटनेची सखोल चौकशी करत कठोर कार्यवाही व्हावी या बाबत खालील आशयाचे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी यांना देण्यात आले रविवार १३ जुलै २०२५ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा. प्रविणदादा गायकवाड यांच्यावर काही गुंड प्रवृतींच्या लोकांनी शाईफेक करून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करत भ्याड हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून हा हल्ला फक्त प्रविणदादा यांच्यावर नसून हा हल्ला या देशातील तमाम शिवराय – फुले – शाहु – आंबेडकर यांच्या समता , बंधुता व न्यायाच्या तत्वांवर चालणाऱ्या विचारवंतांवर असून यापूर्वी देखील या देशात याच मार्गाने अंधश्रद्धा निर्मूलनाचा मंत्र देणारे मा.नरेंद्र दाभोळकर , कॉ.गोविंद पानसरे , पत्रकार गौरी लंकेश व ज्येष्ठ विचारवंत एम.एम.कलबुर्गी यांच्या हत्त्या घडवून आणण्यात आल्या आहेत. प्रसारमाध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला दीपक काटे नावाचा गुंड व त्याच्या आठ ते दहा इतर गुंड साथीदारांनी मिळून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु स्थानिक पोलिसांनी या आरोपींना अटक न करता सोडून दिले आहे. तरी महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने या प्रकरणात बारकाईने लक्ष देत या हल्ल्यातील सर्व आरोपी व त्यांच्या मागे असणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अन्यथा याच पद्धतीने विचारवंतांना संपवण्याचे प्रयत्न सुरु राहिल्यास महात्मा गांधीच्या अहिंसेच्या विचारांवर चालणाऱ्या भारत देशाची प्रतिमा जगात मलीन होऊन हा देश अराजकतेच्या मार्गावर जाण्यास वेळ लागणार नाही. यावेळी संभाजी ब्रिगेड सामाजिक चे प्रदेश संघटक श्याम पाटील , जिल्हाध्यक्ष तुषार सांवत , संभाजी ब्रिगेड राजकीय चे जळगाव पुर्व जिल्हा प्रदिप गायके, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष विजय पाटिल शहर कार्याध्यक्ष मयूर चौधरी , लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे , बामसेफचे मुकुंद सपकाळे , मराठा सेवा संघाचे सुरेश पाटील , सुरेंद्र पाटील , राम पवार , शोभाराम प्रतिष्ठाचे नरेंद्र पाटील , अनिरुद्ध शिसोदे , शुभम पवार , गणेश पाटील,कल्पेश पाटील, भरत पाटील, अविनाश पाटील ,संदीप मांडोळे, सतीश लाठी, राकेश राजपूत, राकेश जैन, संदीप पाटील,रवींद्र पाटील, धवल पाटील,प्रमोद पाटील,राहुल पाटील,संजय चव्हाण,सुमित्र अहिरे, देवानंद निकम,रवींद्र तायडे,देशमुख साहेब यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते
कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर दक्षता पथकांची होणार स्थापना
मुंबई, : राज्यातील बांधकाम कामगारांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून त्यांच्याकडून आर्थिक फसवणूक करण्यासह शासनाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या बोगस बांधकाम कामगार आणि दलालांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध भागातून लोकप्रतिनिधी व बांधकाम कामगारांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नोंदणी, कीट वाटप व अन्य बाबतीत गैरप्रकार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून आता राज्यभरात जिल्हास्तरावर कामगारांची पडताळणी करण्यासाठी दक्षता पथके स्थापन करून प्रभावी तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक विभागात, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कार्यालय प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र जिल्हास्तरीय दक्षता पथक गठीत करण्यात येणार आहे. या पथकांचे कार्यक्षेत्र मात्र त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्याऐवजी दुसऱ्या जिल्ह्यावर असेल, जेणेकरून कारवाई अधिक निष्पक्ष आणि प्रभावी राहील. दक्षता पथकांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे होणारी नोंदणी, नोंदणीसाठी पैसे मागण्याचे प्रकार तसेच खोटे दाखले सादर करून मिळविले जाणारे लाभ या बाबींवर लक्ष केंद्रित करून तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. संबंधित दलालांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल. या मोहिमेसाठी क्षेत्रीय कार्यालयांना वाहन भाडेतत्वावर घेण्याची परवानगी देण्यात आली असून, तपासणीसाठी आवश्यक इतर खर्चही प्रशासकीय निधीतून नियमानुसार करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय दक्षता पथक प्रमुखांनी त्यांच्या कारवाईचा सविस्तर अहवाल विभागीय प्रमुखांना सादर करावयाचा आहे. विभागीय प्रमुख सर्व जिल्ह्यांचे अहवाल एकत्र करून आपल्या अभिप्रायासह मंडळ मुख्यालयास सादर करतील.ही विशेष तपासणी मोहीम प्रथम टप्प्यात १० जुलै, २०२५ अखेरपर्यंत राबविली जाणार आहे. या तपासणी दरम्यान ज्यांना काही तक्रारी असतील त्यांना त्या दक्षता पथकाकडे देता येतील. प्रत्येक पथकाने दरमहा किमान एक तपासणी करणे बंधनकारक असून, त्या तपासण्यांचे संकलित अहवाल मंडळास दरमहा सादर करणे आवश्यक राहील. या निर्णयामुळे राज्यातील बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर प्रभावी आळा बसेल, अशी अपेक्षा कामगारमंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली आहे.
खाजगी क्लासमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; राज्य महिला आयोगाने घेतली तात्काळ दखल
बीड (प्रतिनिधी):बीड जिल्ह्यातील एका खाजगी क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा दोन प्राध्यापकांनी विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने संबंधित पोलिसांना तातडीचे निर्देश दिले आहेत. राज्य महिला आयोगाने बीड पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून, संबंधित क्लासचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ ताब्यात घ्यावे, आरोपींना अटक होईपर्यंत क्लासची इमारत सील करावी, आणि इतर विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडूनही अशा प्रकारच्या तक्रारी असल्यास त्याचा संवेदनशीलतेने तपास करावा, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच पीडित मुलीच्या तक्रारीची गंभीरतेने दखल घेऊन तिचे समुपदेशन करण्यात यावे, अशी ही शिफारस आयोगाने केली आहे. आयोगाच्या अध्यक्षा यांच्या निर्देशानुसार हे पत्र पाठवण्यात आले असून, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना या प्रकरणी त्वरित कारवाई करून अहवाल आयोगाकडे पाठवण्यास सांगितले आहे. राज्य महिला आयोगाच्या सचिव दुर्गा माळी यांनी पाठवलेल्या या पत्रात, महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील अशा घटनांमध्ये तत्काळ आणि नियमबद्ध कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी तपास पथक तयार करण्यात आले आहे.
“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत बस पास योजना” अंतर्गत शालेय विद्यार्थिनींना बस पास वाटप – जामनेर आगार आपल्या दारी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
जामनेर, ता. २६ जून – महाराष्ट्र शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत बस पास वाटप योजने” अंतर्गत आज मोराड, बिलवाडी आणि मेणगाव या गावांमध्ये “जामनेर आगार आपल्या दारी” या अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थिनींसाठी बस पासचे वाटप करण्यात आले. स्नेहदीप गरुड फाउंडेशन आणि जामनेर बस आगार यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या उपक्रमात गावोगावी विद्यार्थिनींसाठी मोफत बस पास वितरणाची व्यवस्था करण्यात आली. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी आवश्यक असणारी सुरक्षित व सुलभ प्रवास सेवा मिळणार आहे. कार्यक्रमास युवानेते स्नेहदीपभाऊ संजय राव गरुड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्यासोबत गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, पोलीस पाटील, तसेच गरुड महाविद्यालयाचे मुख्याध्यापक र.एस. चौधरी सर व सहकारी शिक्षक, गावातील प्रतिष्ठित पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जामनेर बस आगार तसेच शेंदुर्णी बस स्थानकाचे प्रतिनिधी श्री. भारुडे व मनोज पाटील यांनी विद्यार्थिनींना योजना आणि प्रवास व्यवस्थेबाबत माहिती दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना शिक्षणात अधिक संधी प्राप्त होणार असून, शासनाच्या या उपक्रमाचा ग्रामीण भागात सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
